भारतचं चॅम्पियन   

न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव 

दुबई : सुरुवातीला वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव यांच्या फिरकीची कमाल... आणि नंतर कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल यांच्या निर्णायक खेळीच्या जोरावर चॅम्पियन चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने रविवारी न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत, आपणच ‘चॅम्पियन’ असल्याचे सिद्ध केले.  भारताने अखेर १२ वर्षांचा दुष्काळ संपविला. याआधी भारतीय संघाने २०१३ च्या चॅम्पियन्स चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर आता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला.
 
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ९ महिन्यांत दुसरा चषक जिंकला आहे. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स चषक उंचाविला. यासह, भारताने २५ वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेतला. यासोबतच त्याने हा चषक सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम केला.
 
सुमारे ९ महिन्यांपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला दुष्काळ संपवला होता. त्या विजयाने केवळ प्रतीक्षा संपवली नाही तर भारतीय संघाची भूकही वाढवली. आणि रोहितच्या संघाने पुन्हा एकदा एकही सामना न गमावता विजेतेपद जिंकले.
संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या फलंदाजीमधून एकही मोठी खेळी झाली नव्हती आणि अंतिम सामन्यांमध्ये तो अर्धशतकही करू शकला नाही. त्याच वेळी, त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ सुरूच होती. रोहित शर्माने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या आक्रमक शैलीने न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच मागे ढकलले. रोहितने जलद अर्धशतक झळकावले आणि नंतर शुभमन गिलसोबत शतकी भागीदारी केली.
 
भारतीय संघाल येथे दोन झटपट धक्के बसले आणि शुभमन गिलनंतर विराट कोहलीदेखील तंबूमध्ये परतला. लवकरच कर्णधार रोहितनेही आपला बळी गमावला.  श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी ६१ धावांची भागीदारी करून संघाला पुनरागमन करून दिले. श्रेयसचे अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेलही काही वेळातच तंबूमध्ये परतला. पण केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. हार्दिक विजयापूर्वीच बाद झाला होता पण राहुलने रवींद्र जडेजासह संघाला जेतेपद जिंकल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
त्याआधी नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करणार्‍या किवींनी रवींद्रच्या चौफेर टोलेबाजीमुळे १० षटकांत एक बाद ६९ अशी वेगवान सुरुवात केली होती. भारतीय फिरकीने मग किवींच्या आक्रमक फलंदाजीला रोखले. रचिन रवींद्रने २९ चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली. केन विल्यमसन फक्त ११ धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला सामन्यात परत येण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. 
मिशेलने ६३ धावा आणि फिलिप्सने ३४ धावा केल्या. शेवटी, मायकेल ब्रेसवेलने नाबाद ५३ धावा करत न्यूझीलंडला २५१ धावांपर्यंत पोहोचवले. ४० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडने ५ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. येथून, पुढील १० षटकांत, न्यूझीलंडने फक्त २ बळी गमावल्या आणि एकूण ७९ धावा केल्या. विशेषतः मायकेल ब्रेसवेलची ५३ धावांची खेळी भारतीय संघासाठी अभ्यास क्रमाबाहेरची होती. त्याने ४ चेंडूत ५३ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. एकेकाळी असे वाटत होते की न्यूझीलंड जास्तीत जास्त २३० धावा करू शकेल. पण ब्रेसवेलच्या खेळीमुळे न्यूझीलंडला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला. चक्रवर्तीने सामन्यात यंग आणि ग्लेन फिलिप्सला आऊट करून २ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही २ बळी घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने लॅथमला तंबूतमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाजांमध्ये शमीने १ बळी घेतला, पण शमी महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकात ७४ धावा दिल्या. 
 
संक्षिप्त धावफलक  :
 
भारत : रोहित शर्मा ७६, शुभमन गिल ३१, विराट कोहली १, श्रेयस अय्यर ४८, अक्सर पटेल २९, के.एल.राहुल नाबाद ३४, हार्दीक पांड्या १८, जडेजा नाबाद ९ एकूण ४९ षटकांत २५४/६
 
न्यूझीलंड : विल यंग १५, रचीन रवींद्र ३७, विल्यमसन ११, डेरियल मिचेल ६३, लेहथमन १४, ग्लेन फिलिप ३४, मिचेल नाबाद ५३, सॅटनर ८, नथन स्मिथ ०, एकूण ५० षटकांत २५१/७

Related Articles