वाचक लिहितात   

भारतीय संघाचा पराक्रम!
 
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील दुबई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर ४ गडी राखून मात केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम विजेतेपदावर तिसर्‍यांदा आपले नाव कोरले. अंतिम विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन! विशेष म्हणजे भारताने या स्पर्धेत अपराजित राहत स्पर्धेतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आणि विजेतेपद पटकावले. या आधी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना २००२ मध्ये संयुक्तरित्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर २०१३ मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता १२ वर्षांनंतर भारताने २०२५ मधील ही प्रतिष्ठेची चॅम्पियन्स ट्रॉफी तिसर्‍यांदा जिंकली आहे. भारतीय संघ आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक असून भारतीय संघाने दोनदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (१९८३ आणि २०११), दोनदा आयसीसी टी२० विश्वचषक (२००७ आणि २०२४) आणि तीनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२००२, २०१३ आणि २०२५) असे एकूण सात आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
‘टीम इंडिया’चे अभिनंदन! 
 
२९ जून २०२४ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे, कारण या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार गडी राखत पराभव करून इतिहास घडवला. या स्पर्धेत सुरुवातीपासूनच भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. काहीही करून यावेळी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी करायचेच अशी खूणगाठ कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बांधली होती. खेळाडूंनीही त्यांच्यावर संघ व्यवस्थापनाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताने अप्रतिम कामगिरी करीत हे विजेतेपद मिळवले.
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
 
उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व
 
सध्या आपण जल है, तो कल है असे नुसते म्हणतो; मात्र प्रत्यक्षात त्याची कृती होताना दिसून येत नाही, हे वास्तव आहे. काही ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो; मात्र जबाबदार घटक पाण्याची नासाडी करताना दिसतात. पाणी म्हणजे जीवन आहे, त्याचा वापर योग्य आणि आवश्यक तेवढाच करणे ही काळाची गरज बनली आहे. तपमानाचा पारा वाढतच असल्याने उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळा म्हटले की, डोळ्यासमोर पाणी उभे राहते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि याच दरम्यान पाण्याचे उपलब्ध झरे अटण्याच्या मार्गावर असतात; मात्र आजही काही भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कामधंदा सोडून तासन्तास दाहीदिशा वणवण भटकावे लागते. पाणी जपून वापरणे हे महत्त्वाचे आहे.
 
राजू जाधव, मांगूर जि.बेळगांव   
 
हा तर सत्तेचा माज
 
खंडणीखोरीला विरोध केल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा छळ करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली! या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. एका नेक माणसाची हत्या करणार्‍या क्रूर कर्म्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी समस्त जनतेची मागणी आहे! चित्रपटाच्या कथेलाही लाजवील अशा क्रूर पद्धतीने अन्याय व जुलूमाविरुद्ध प्रामाणिकपणे लढणार्‍या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने समस्त समाजमन कमालीचे अस्वस्थ झाले आहे. सर्वत्र बोकाळलेला हिंसाचार आणि अनाचार गेल्या दशकभरात राजकारणाची जी गटारगंगा झाली आहे त्याचाच हा परिपाक आहे. सत्तेचा माज वा मस्ती किती असावी? त्याला काय परिसीमा? खरेच देव असेल तर त्याला सुद्धा त्याच्या किंकाळ्या का ऐकू जाऊ नयेत? तरीसुद्धा भगवान के घर देर हैं, अंधेर नहीं! अशीच आम्हा पामरांना आजही आशा वाटते!
 
श्रीकांत मा. जाधव, अतीत (जि.सातारा)
 
धोक्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष नको
 
अंधेरी येथे रस्त्याचे खोदकाम सुरु असताना जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस निगमची गॅस पाइपलाइन फुटून झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागण्याच्या घटनेची बातमी वाचनात आली. या घटनेत चार वाहने जळाली व तीन वाहनचालक भाजले. महानगर गॅस कंपनीचे तज्ज्ञ, अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतल्यामुळे आग नियंत्रणात आली आणि पुढचा संभाव्य धोका टळला. मुंबईत बहुतांश भागात महानगर गॅस कंपनीच्या भूमिगत गॅस पाइपलाइन आहेत आणि त्या तिथे असल्याचे सूचनाफलकही लावण्यात आलेले आहेत. अशातच विविध कामांसाठी महापालिकेतर्फे रस्त्याचे खोदकामही सतत सुरुच असते. या खोदकामावेळी महानगर गॅस निगमतर्फे लावण्यात आलेल्या सूचनाफलकानुसार आवश्यक ती काळजी घेऊन गॅस पाइपलाइनला धक्का पोहोचणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. अंधेरीच्या घटनेत नेमके याकडेच दुर्लक्ष झाले असावे असे वाटते.
 
दीपक काशिराम गुंडये, वरळी.

Related Articles