महिला आणि आर्थिक साक्षरता   

अंतर देशपांडे 

’नारी शक्ती’ हा नारा आर्थिक दृष्टिकोन या बाबतीतही योग्यच आहे. महिला मुळात पैसे वाचवण्यात हुशार असतात आणि ते त्यांच्या प्रकृतीत असते. त्यांना वित्त चांगले समजते. ज्या काळी हे हल्लीचे ’इन्व्हेस्टमेंट गुरु’, ’फंड मॅनेजर’ या संज्ञांचा उदयही झाला नव्हता, तेव्हापासून आपण आपल्या घरी आपल्या आजी, आई यांना अतिशय सचोटीने आणि उत्तमरीत्या घर आणि त्याच्याशी निगडित आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळताना बघितले आहे आणि हे सर्व त्या फक्त पैसे साठवून किंवा बाजूला काढून ठेवून करू शकत होत्या. मग विचार करा की, जर महिलांना योग्य मार्गदर्शन आणि साक्षर केले, तर त्या अजून किती चांगल्या प्रकारे वित्त व्यवस्थापन करु शकतील? बचतीची ही नैसर्गिक प्रवृत्ती, थोडी शिस्त आणि आर्थिक नियोजन यामुळे महिला चमत्कार करू शकतात.
 
गेल्या काही दशकांमध्ये महिलांनी गुंतवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले आहेत. महिला उद्योजकतेच्या वाढीसह आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या वाढत्या सहभागासह, महिलांसाठी आर्थिक साक्षरता सुधारणे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे. महिलांची आर्थिक साक्षरता ही केवळ त्यांच्या क्षमता साध्य करण्यासाठी मदत करणारी गुरुकिल्ली नाही, तर ती आर्थिक विकासाचा एक आवश्यक चालक आहे आणि भारताच्या विकासासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे.महिला जरी सगळ्या क्षेत्रांत आघाडीवर असल्या तरी आपली पुरुषप्रधान संस्कृती असल्याने वित्त आणि गुंतवणूक या बाबतीत अजूनही त्या एक पाऊल मागेच राहतात. एका ऑनलाइन संपत्ती व्यवस्थापन प्लॅटफॉर्मने महिला गुंतवणूकदारांवर गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक ५ गुंतवणूकदारांपैकी फक्त १ महिला आहे. वित्त किंवा गुंतवणूक हा विषय सखोल अभ्यासाचा आहे, तरी काही महत्त्वाचे मुद्दे आपण आज बघुयात. 
 
१) लवकर सुरुवात :लहान वयात, जबाबदार्‍या कमी असताना गुंतवणुकीची सवय लागली की, ती पुढे सुरु ठेवणे खूप सोपे जाते. सुरुवातीला रक्कम कमी असली तरी हरकत नाही; पण गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. 
 
२) सातत्य : एकदा गुंतवणूक केली की, ती सातत्याने नियमितपणे करत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसा महिलांचा स्वभाव धर-सोड करण्याचा नसून हाती घेतलेली गोष्ट तडीस लावण्याचा असतो, त्यामुळे ही शिस्त पाळणे त्यांना फारसे अवघड जात नाही. 
 
३) ध्येय : कोणतेही कार्य करताना आपण काहीतरी साध्य करायचे म्हणून ते करत असतो, तसेच गुंतवणूक करताना ती आपण कशासाठी करतोय, आपल्याकडे किती अवधी आहे, आपले भांडवल किती आहे आणि आपण अपेक्षा नक्की कशाची किंवा कितीची करतोय हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. ध्येय अनेक प्रकारची असू शकतात दीर्घकालीन, अल्पकालीन. मुलांचे शिक्षण, गृहकर्जाचा हप्ता, निवृत्ती, काही अचानक येणार्‍या अडचणींचे नियोजन, आंतरराष्ट्रीय सहल या आणि अशी अनेक ध्येयं आपल्या समोर असतात. हे सगळे जर तक्त्यात मांडून त्याचे नियोजन केले, तर केवळ आर्थिक स्वातंत्र्यच नाही, तर मनाची शांतीदेखील मिळते. आधीच सांगितल्याप्रमाणे हा विषय खूप खोल आणि सखोल अभ्यासाचा आहे, प्रत्येकासाठी वेगळा आहे.

Related Articles