आता लक्ष्य व्याप्त काश्मीर : जयशंकर   

लंडन : पाकिस्ताने बळकावलेला भारताचा भाग म्हणजेच व्याप्त काश्मीर परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल, असे स्पष्ट मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथे एका मुलाखतीवेळी व्यक्त केले आहे. लंडनमधील थिंक टँक चॅथम हाउसमध्ये ‘भारताचा उदय व वैश्विक भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.
  
जयशंकर यांना काश्मीर खोर्‍यात शांतता निर्माण करण्याबाबत भारताचा फॉर्म्युला काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तीन टप्प्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. आम्ही त्यावर काम करत असून अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात आम्हाला कलम ३७० हटवावे लागणार होते. आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काश्मीरमध्ये शंतता निर्माण करण्यासाठीच आम्ही ते केले. दुसर्‍या टप्प्यात काश्मीरमध्ये विकास व आर्थिक उलाढाल वाढवण्यासह सामाजिक न्याय बहाल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिसर्‍या टप्प्यात काश्मीरमध्ये मतदानाचे प्रमाण वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्याचे काम करण्यात येत आहे. आम्ही नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली आहे. आता पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
खलिस्तानी समर्थकांनी अडवली गाडी 
  
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौर्‍यावर असून, त्यांनी लंडनमध्ये आयोजित केलेल्या थेम्स हाऊस थिंक टँकमध्ये एका विशेष कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम संपल्यावर जयशंकर बाहेर येताच काही खलिस्तानी आंदोलकांनी त्यांना पाहून घोषणाबाजी सुरू केली. एवढेच नाही तर एका आंदोलकाने भारतीय राष्ट्रध्वज हातात घेत जयशंकर यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर लंडन पोलिसांनी या आंदोलक व्यक्तीला ताब्यात घेत जयशंकर यांना तेथून सुखरूप बाहेर काढले. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने ही घटना युकेच्या सरकारसमोर मांडत त्याचा निषेध नोंदवला आहे.
 
तर सर्व प्रश्न सुटतील 
 
काश्मीरचा पाकिस्तानने बळकावलेला भाग परत भारतात कधी येणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. व्याप्त काश्मीर भारतात परत आल्यावर तिथले सर्व प्रश्न सुटतील याची मी तुम्हाला खात्री देतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
अमेरिकेच्या धोरणांचा भारताला फायदा 
   
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत जयशंकर म्हणाले, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकार बहुध्रुवीयतेच्या दिशेने चालले आहे. अमेरिकेचे हे धोरण भारताच्या हिताचेच आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापारी कराराच्या आवश्यकतेवर सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Articles