E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
भालचंद्र गुजर
यंदाचे ज्ञानपीठ पारितोषिक छत्तीसगढचे प्रख्यात हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना नुकतेच जाहीर झाले आहे. सुमारे पाच दशकांच्या लेखन कारकीर्दीत कविता, कथा आणि कादंबरी या साहित्य प्रकारांत त्यांनी केलेली निर्मिती आधुनिक हिंदी वाङ्मयविश्वात महत्त्वपूर्ण समजली जाते.
विनोद कुमार यांच्या एकूणच सर्व लेखनात वास्तव आणि कल्पनाशक्तीचा एक अद्भुत समतोल दिसून येतो. समकालीनांपेक्षा वेगळ्या धाटणीची लेखनशैली हे त्यांच्या वाङ्मयीन महत्तेचे एक कारण. सखोल संवेदनशीलता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. सकृत्दर्शनी साध्या सरळ वाटणार्या भाषेतून ते गूढ आशय व अनाकलनीय भावना अगदी सहजपणे प्रकट करतात. काही वेळा त्यांच्या लेखनातून ‘जादुई वास्तववाद’ (मॅजिकल रिअॅलिझम) प्रकटतो आणि मग आशयसंपन्न व काहीसे गूढ असलेले त्यांचे लेखन अधिकच व्यामिश्र तसेच गुंतागुंतीचे होत जाते.
विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी सध्याच्या छत्तीसगढ राज्यातील (त्यावेळचे नानगाव संस्थान; नंतर मध्यप्रदेश राज्य) राजनंदगाव येथे झाला. त्यांनी जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालयातून एम. एस्सी. केले आणि नंतर रायपूर येथील कृषि महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ प्राध्यापकाची नोकरी केली. राजनंदगाव येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना ते प्रख्यात हिंदी साहित्यिक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या संपर्कात आले. उपजीविकेसाठी विविध नोकर्या शोधणारे मुक्तिबोध त्यावेळी राजनंदगावच्या दिग्विजय महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुक्तिबोधांच्या असाधारण प्रतिभेने विनोद कुमार प्रभावित झाले आणि काव्यलेखनाने त्यांनी आपल्या साहित्यनिर्मितीस आरंभ केला. ‘लगभग जयहिंद’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७१ मध्ये प्रसिद्ध झाला. ‘वह आदमी नया गरम कोट पहिनकर चला गया विचार की तरह’(१९८१), ‘सब कुछ होना बचा रहेगा’(१९९२), ‘अतिरिक्त नही’(२०००), ‘कविता से लंबी कविता’(२००१), ‘आकाश धरती को खटखटाता है’(२००६) हे त्यांचे आणखी काही कवितासंग्रह. विनोद कुमार शुक्ल यांच्या कवितेवर आरंभी मुक्तिबोध यांचा प्रभाव होता; पण ते लवकरच त्यातून मुक्त झाले. तरीही मुक्तिबोधांचे आपल्यावर ॠण असल्याचे ते मान्य करतात.
विनोद कुमार शुक्ल यांची कविता ही सर्वसामान्य माणसांची, त्यांच्या सुख-दुःखांची आणि अभावग्रस्त तसेच शोषणग्रस्त जीवनाची कविता आहे. काही थोड्या प्रसंगी ती अस्तित्वमूलक दुःखाचे चित्रण करते. मात्र त्यातून विनोद कुमार यांच्या आकलनाच्या प्राथमिक दयाबुद्धीचा नव्हे, तर अपार कारूण्याचा प्रत्यय येतो. ‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था’ या कवितेत ते म्हणतात -
‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था
व्यक्ति को मैं नहीं जानता था-
हताशा को जानता था
इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया -
मैंने हाथ बढाया
मेरा हाथ पकडकर वहा खडा हुआ -
मुझे वह नहीं जानता था
मेरे हाथ बढाने को जानता था -
हम दोनों साथ चले
दोनो एक दुसरे को नहीं जानते थे -
साथ चलने को जानते थे’
समाजातील सर्वसामान्य माणसांप्रमाणेच पददलितांचा यातनामय जीवनक्रम रेखाटणार्या विनोद कुमार शुक्ल यांनी छत्तीसगढच्या परिसरातील आदिवासीही आपल्या आकलनाच्या कक्षेत आणले . आदिवासींचे जगणे, शोषण, विषमता, अन्याय यांचे वस्तुनिष्ठ चित्रण त्यांनी केले आहे. आदिवासींच्या (विशेषतः स्त्रियांच्या) मनात शहरी माणसांविषयी वाटणारी असुरक्षिततेची भावना हाही त्यांच्या एका कवितेचा विषय आहे. आपल्या घरात ज्या मोकळेपणाने वावरावे, त्याच सहजतेने जंगलात एकटी फिरणारी तरुण आदिवासी मुलगी समोर आलेल्या वाघाला किंवा अन्य हिंस्र जनावराला मुळीच घाबरत नाही; पण मोहाची फुले बाजारात विकण्यासाठी ती एकटी शहरात कधीच जात नाही, तर आपल्या नातेवाईकांसोबत जाते. सिमेंटच्या जंगलात राहणार्या आणि स्वतःच्या कथित सभ्यतेचे संकेत पाळणार्या शहरी मंडळींनी आदिवासींची ‘असभ्य’ अशी हेटाळणी करणे, ही नित्याची बाब ! नागरी व आदिवासी संस्कृतीच्या सभ्यतेच्या संकल्पनांतील अंतर्विरोध स्पष्ट करताना विनोद कुमार शुक्ल म्हणतात -
‘जितने सभ्य होते हैं
उतने अस्वाभाविक |
आदिवासी जो स्वाभाविक है
उन्हें हमारी तरह सभ्य होना है
हमारी तरह अस्वाभाविक |
जंगल का चंद्रमा
असभ्य चंद्रमा है
इस बार पुर्णिमा के उजाले में
आदिवासी खुले मे इकठ्ठे होने से
डरे हुए हैं
और पेडोंके अंधेरे मे दुबकी
विलाप कर रहे है |
क्योंकि एक हत्यारा शहर
बिजली की रोशनी से
जगमगाता हुआ
सभ्यता के मंच पर बसा हुआ है |’
विनोदकुमार शुक्ल यांनी कथा-कादंबरीलेखनात प्रेमचंद आणि फणीश्वर नाथ रेणू यांची वाङ्मयीन परंपरा अधिक समृद्ध केली असे समीक्षक समजतात. त्यांच्या ‘नौकर की कमीज’(१९७९), ‘खिलेगा तो देखेंगे‘(१९९६), ’दिवार में एक खिडकी रहती थी’(१९९७), ‘हरी घास की छप्परवाली झोपडी और बौना पहाड’(२०११), ‘एक चुप्पी जगह’(२०१८) या कादंबर्या आणि ‘पेड पर कमरा’(१९८८), ‘महाविद्यालय’ (१९९६), ‘एक कहानी’(२०२१) या कथासंग्रहांना फार मोठ्या प्रमाणावर वाचकप्रियता तसेच समीक्षकमान्यता लाभली. विनोद कुमार शुक्ल यांचे जवळपास सर्वच लेखन मौलिक असले, तरी त्यांचे नाव घेतले की वाचकांना प्रकर्षाने आठवतात त्या ‘नौकर की कमीज’ आणि ‘दिवार मे एक खिडकी रहती थी’ या कादंबर्या.
शुक्ल यांची ‘नौकर की कमीज’ ही निम्न मध्यमवर्गीय माणसांच्या मानसिक घुसमटीची कहाणी आहे. नोकरीखेरीज उपजीविकेसाठी अन्य पर्याय नसलेले संतूबाबू एका कार्यालयात प्रामाणिक कारकून आहेत. भ्रष्टाचाराविषयी त्यांच्या मनात प्रचंड राग आहे. अशा भ्रष्ट व्यवस्थेत एका प्रामाणिक नोकराची आवश्यकता असल्याने वरिष्ठांनी त्याच्यासाठी एक सदरा शिवला आहे. तो संतूबाबूंना नेमका व्यवस्थित बसतो आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना नाईलाजाने तो सदरा घालावाच लागणार आहे. त्यामुळे संतूबाबूची प्रचंड घुसमट होते आणि कादंबरीच्या अखेरीस तिचा अकल्पनीयरीत्या स्फोट होतो. मणि कौल या दिग्दर्शकाने तिच्यावर १९९९ मध्ये चित्रपट बनवला होता.
विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनाचे इंग्रजी व फ्रेंच प्रमाणेच जवळपास सर्वच भारतीय भाषांतून अनुवादित झाल्याने त्यांची प्रसिद्धी विस्तारली. (‘नौकर की कमीज’ व ‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबर्यांचे मराठी अनुवाद निशिकांत ठकार यांनी समर्थपणे साकारले आहेत.) साहित्य अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश शिखर सन्मान, मैथिलीशरण गुप्त राष्ट्रीय पुरस्कार या व अशाच आणखी काही पुरस्कारांनी गौरविले गेलेले विनोद कुमार शुक्ल यांचे लेखनकर्तृत्व ज्ञानपीठ पारितोषिकामुळे आता पुन्हा एकवार ठळकपणे अधोरेखित होत आहे.
Related
Articles
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
उधमपूरमध्ये चकमकीत लष्कराचा जवान हुतात्मा
25 Apr 2025
वाचक लिहितात
25 Apr 2025
महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी विमान व्यवस्था
24 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
उधमपूरमध्ये चकमकीत लष्कराचा जवान हुतात्मा
25 Apr 2025
वाचक लिहितात
25 Apr 2025
महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी विमान व्यवस्था
24 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
उधमपूरमध्ये चकमकीत लष्कराचा जवान हुतात्मा
25 Apr 2025
वाचक लिहितात
25 Apr 2025
महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी विमान व्यवस्था
24 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
उधमपूरमध्ये चकमकीत लष्कराचा जवान हुतात्मा
25 Apr 2025
वाचक लिहितात
25 Apr 2025
महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी विमान व्यवस्था
24 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
2
राज-उद्धव एकत्र येणार?
3
कांगोमध्ये तेलवाहू बोटीवर आगीचा भडका; १४३ बळी
4
बीजेडीच्या अध्यक्षपदी पुन्हा नवीन पटनायक सलग नवव्यांदा निवड
5
कॅनडात भारतीय विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू
6
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट