‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी   

अवंतिका मालिकेतील कलाकारांचा २० वर्षांनंतर रंगला सोहळा

पुणे : अवंतिका या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे मी अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही अधिक मोकळी होत गेले. मी अंतर्मुख होते, मी जरा बदलले आणि अधिक धीट व खंबीर बनलेे, असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
 
अवंतिका या २००० च्या दशकात दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होणार्‍या मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेचा कळस गाठणारी व मराठी रसिक मनांवर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणून झी मराठी वरील अस्मिता चित्रनिर्मित ‘अवंतिका’ या मालिकेची ओळख आहे. मार्च २००५ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या घटनेस आता २० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील आशुतोष देशपांडे व प्रसाद कामत यांच्या पुढाकाराने व पीवायसी हिंदू जिमखानाच्या सहकार्याने या मालिकेत काम केलेल्या प्रमुख कलाकारांना एकत्र आणून मालिकेसंबंधी आठवणी जागविणार्‍या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
या सोहळयाला मृणाल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, सुलेखा तळवलकर, सारिका निलाटकर, रोहिणी निनावे, स्वारी राजे, प्रसाद कामत, दीपा लागू, शुभांगी दामले, वंदना वाघनीस, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे, राहुल मेहेंदळे, राधिका काकतकर, अशोक शिंदे, बालकलाकार सार्थक केतकर, श्रीराम पेंडसे, आशुतोष देशपांडे, अनुराधा जोशी आदी पडद्यावरील व पडद्यामागील कलाकार उपस्थित होते. सुत्रसंचालन आर.जे. श्रृती यांनी केले.
 
मृणाल कुलकर्णी अवंतिका मालिकेच्या आठवणी जागवताना म्हणाल्या, आपली फसवणूक आणि प्रतारणा झाल्याचे लक्षात आल्यावर आणि त्या धक्क्यातून बाहेर आल्यावर अवंतिका जेव्हा घर सोडण्याचा निर्णय घेते, तो भाग मला जवळचा वाटतो. तो माझा आवडता दृश्य आहे. या प्रसंगात अवंतिका सेल्फ मेड होते. ती धीट, खंबीर, ठामपणे निर्णय घेणारी होते. या मालिकेतील कुठलीही व्यक्तीरेखा कृष्णधवल रंगात न रंगवता, पटकथाकार रोहिणी निनावे यांनी ग्रे रंगछटेत रंगवल्या होत्या. त्यामुळे कुठल्याच व्यक्तीरेखेला नकारात्मक किंवा खलनायकी छटा नव्हती. त्या काळात मी हिंदी मालिकांमध्ये व्यग्र होते. पण स्मिताताई आणि संजय सूरकर यांनी मला मराठी मालिकेत काम करण्यासाठी तयार केले. ही मालिका लोकप्रिय ठरली, कारण यामध्ये अतिरंजित काहीच नव्हते. सगळे वास्तववादी होते.
 
संदीप कुलकर्णी म्हणाले, या मालिकेच्या निमित्ताने माझी स्मिताताईंशी प्रथमच भेट झाली. मालिकेतील दीपाताई लागू (आईची व्यक्तीरेखा साकारणार्‍या अभिनेत्री) यांच्यासोबतचे प्रसंग मला आजही आठवतात, इतके ते प्रभावी आणि भावणारे होते. या मालिकेने मला ओळख दिली.सुबोध भावे म्हणाले, मला सेटवरचा पहिला दिवस लख्ख आठवतो. मी नवीन होतो. मालिकेतील अनेक ज्येष्ठ कलाकारांचा सहवास, ते वातावरण हे सारे खूप शिकवणारे होते.

Related Articles