कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा करणार्‍यांचाच वक्फला विरोध : रिजिजू   

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या वक्फ मालमत्तेवर कब्जा केलेल्यांकडून वक्फ विधेयकाला विरोध सुरू आहे. हे शक्तिशाली लोक असून, निष्पाप नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. 
 
रिजिजू म्हणाले, विधेयकावर टीका करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे; परंतु त्या टीकेला काही अर्थ असला पाहिजे. वक्फ विधेयकाला विरोध करणारे कोण आहेत? काही शक्तिशाली लोक आहेत, ज्यांनी वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. ते निष्पाप नागरिकांची दिशाभूल करत आहेत.
अनेक संघटनांचा प्रस्तावित विधेयकाला पाठिंबा
 
केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलने (केसीबीसी) वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार्‍या आणि राज्य खासदारांनाही असेच करण्याची विनंती करणार्‍या पत्राबाबत रिजिजू म्हणाले, धार्मिक आधारावर अनेक संघटना केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या विधेयकाला पाठिंबा देत आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत मालमत्तांच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल, असा विश्वासही रिजिजू यांनी व्यक्त केला.

शेकडो नागरिक भीतीच्या छायेत

केरळमध्ये कोचीनजवळील मुनांबम नावाच्या ठिकाणी, शेकडो गरीब कुटुंबांना वक्फकडून त्यांच्या जमिनी जप्त करण्याचा धोका आहे. जमीन जप्तीच्या धमकीविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आंदोलनावर प्रकाश टाकताना, केरळच्या खासदारांना तुष्टीकरणाचे राजकारण करण्याऐवजी संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Related Articles