महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना   

भालचंद्र ठोंबरे

अकोट

पुण्यातील स्वारगेट प्रकरणाच्या घटनेमुळे स्त्रीवरील अत्याचाराचा, तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यात बुधवारी सकाळी साडेपाचच्या दरम्यान घडलेल्या स्वारगेट बस स्थानकावर एका २६ वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पीडित युवतीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दत्तात्रय गाडे (३५) नावाच्या आरोपीला गुरुवारी रात्री शिरूरजवळील गुणाट गावात अटक केली. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या घटनेत महत्त्वाची बाब म्हणजे स्वारगेटसारख्या भर वस्तीत असलेल्या बस स्थानकावर सकाळच्या वेळी अशी घटना घडते हेच मोठे आश्चर्यकारक आहे.
 
या प्रकरणामुळे पुन्हा प्रश्न उद्भवतो तो महिला सुरक्षिततेचा. या ठिकाणी सुरक्षा पथक कार्यरत नाही का? असल्यास ते गस्त घालत नाही का? गस्त घालत असल्यास त्यांना संशयास्पद घटना आढळत नाहीत का? या सर्व बाबींची उत्तरे स्थानकावरील संबंधित अधिकारीच देऊ शकतील व चौकशीदरम्यान या सर्व बाबी समोर येतीलच; परंतु या घटनेमुळे समाजात वावरणार्‍या अशा अपराधिक व्यक्तींच्या विकृत मनोवृत्तीला बळी पडलेल्या महिलेला भोगाव्या लागणार्‍या शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रासाचे परिणाम ती पिडीत व्यक्तीच जाणू शकते. 
 
स्त्री अबला नसून सबला आहे, हे वाक्य म्हणण्यासाठी लिहिण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी कितीही चांगले वाटत असले, तरी वास्तविकतेत प्रत्यक्षात वावरताना स्त्रीला मात्र अत्यंत कठीण परिस्थितीशी तोंड द्यावे लागते. समाजातील समाजकंटकांच्या विषारी नजरा, रस्त्यावरील टिकाटिपणी, प्रवासात आंबट शौकिनांच्या किळसवाण्या स्पर्शाचा सामना करीत व त्यापासून स्वतःचा बचाव करीत आपले जीवन कंठावे लागते. नोकरी पेशातील काही स्त्रियांना सुद्धा त्यांच्या नोकरीच्या काही ठिकाणी अशा प्रकारच्या वृत्तीचा कमी अधिक प्रमाणात सामना करावा लागण्याची शक्यता असते. आज आपण कितीही पुढारलेपणाच्या गप्पा हाकीत असलो तरी आज एकट्या स्त्रीचा प्रवास जिकिरीचा झाला आहे हे कटू सत्य आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढून समाज सुशिक्षित होत आहे; पण संस्काराच्या बाबतीत समाजाची घसरण होत आहे, अधोगती होत आहे, हे सत्य आहे. 
 
समाजात स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा करताना विकृत मनोवृत्तीचे पुरुष सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करतात; मात्र स्त्री संरक्षणाची आपलीही जबाबदारी आहे, याचा जणू त्यांना विसर पडला आहे. समाज रचनेनुसार स्त्रीच्या बालपणी माता-पित्याने तरुणपणी भावाने, विवाहानंतर पतीने तर वृद्धपणी मुलाने तिचे संरक्षण करावे हे अपेक्षित असते; परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणी यांचेकडूनच स्त्रीला धोका झाल्याच्या घटना वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. काही ठिकाणी स्त्रीला घरगुती हिंसाचाराला बळी पडावे लागल्याच्या घटना ऐकावयास मिळतात. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही काही विकृत वृत्तीच्या व्यक्तीमुळे विद्यार्थिनीचे शोषण झाल्याच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. विकृत व्यक्तींच्या अशा विकृत मानसिकतेमुळे दहा वर्षाखालील मुलींचेही शोषण झाल्याच्या घटना वाचण्यात आल्या आहेत. म्हणजे घर, शाळा, कुटुंब, रस्ता, व्यवसायाचे ठिकाण, प्रवास, आदी सर्वच ठिकाणी स्त्रीमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोबाईलच्या युगामुळे आता सायबर गुन्ह्याचाही मोठा धोका उत्पन्न झाला आहे. याद्वारे लुबाडणूक, धमकी देवून पैसे उकळण्यासारख्या गुन्ह्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे प्रभावी सायबर सुरक्षा उपायांची ही आवश्यकता आहे.

कायद्याची कठोर अंमलबजावणी

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक कायदे व नियम आहेत, जसे हुंडा विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार संरक्षण कायदा, शोषणापासून संरक्षण कायदा, वगैरेंच्या तरीही गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येतच आहेत. त्यामुळे हे कायदे व त्यांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोच्या २०२४ च्या अहवालानुसार महिलांच्या शोषणाबाबतची परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे, तर बलात्काराच्या घटनेत २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये १.१ टक्के वाढ दर्शविली आहे. अपहरणाच्या घटना बाबतीत ५.१ टक्क्याने वाढ झालेली आहे. भारताचा अपराधिक दर एक लाख व्यक्तीत ४४५.९ असा आहे. राज्याच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र व बिहार यांचा अपराधिक दर अधिक आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अपराधाचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या सायबर गुन्ह्याबद्दल अहवालात चिंता व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत १७७ देशांत भारताचा १२८वा नंबर आहे याचा अर्थ सुधारण्याची अत्यंत गरज आहे. 
 
यौन शोषण व बलात्कारासारख्या घटनांची गंभीर दखल घेऊन युद्धपातळीवर कारवाई करून निर्णय घेण्यात यावे. बलात्कार्‍याला फाशी द्यावी. स्त्रीवर अत्याचार करून तिला अपमानास्पद जीवन जगण्यास भाग पाडणार्‍या नराधमाला कोणतीही दया माया न दाखवता फाशी देण्यात यावी. महिलांना व मुलींना शालेय शिक्षणात ज्युदो कराटेचे प्रशिक्षण, तसेच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम अत्यावश्यक व युद्धपातळीवर करावे. बलात्कार पीडित व्यक्तीचे या घटनेमुळे पूर्ण जीवन निराशमय अंधकारमय होते. समाजातील चर्चा व टीका टिपणीमुळे पीडित व्यक्ती क्षणाक्षणाला मरत असते. तिला जीवन असह्य होऊ लागते. यातूनच क्वचित आत्महत्येसारख्या घटनाही घडतात. त्यामुळे बलात्कारसारख्या हीन घटनेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलांना बंदुकीचा परवाना द्यावा, तसेच ती चालविण्याचे प्रशिक्षणही द्यावे. अब्रूचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात तिच्याकडून हत्या झाल्यास ते आत्मसंरक्षण म्हणून तिला माफी द्यावी. समाजमनावर सिनेमाचा प्रभाव जास्त पडतो. तेव्हा सिनेमात बलात्कारांच्या दृश्यावर बंदी असावी. सिनेमातील बलात्कारांची दृश्ये म्हणजे स्त्री जातीच्या अब्रूचे एक प्रकारे धिंडवडेच नव्हेत का? स्त्री संदर्भात घडलेल्या कोणत्याही अपराधाची गंभीरपणे दखल घेऊन त्वरित शिक्षेची कारवाई करावी.

समाज जागृती आवश्यक

स्त्री संरक्षण ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही, तर पूर्ण समाजाचीही आहे, याची जाणीव, तसेच नजरेसमोर एखाद्यावर हल्ला होत असल्याचे दिसताना केवळ बघ्याची भूमिका न घेता मदतीला धावून जाण्याची शिकवण समाजाला देणे आवश्यक आहे. समाजात स्त्री सन्मान, स्त्रीबद्दल आदराची भावना असणे व ती प्रत्यक्ष आचरणात आणणे याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
 
स्त्रियांनीही काही बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शक्यतो रात्री एकटीने प्रवास करू नये. प्रवासात आपल्या घरच्यांशी लोकेशन शेअर करावी. अनोळखी व्यक्तीसोबत स्वतःची कोणतीही माहिती शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागू नये वा स्वीकारूही नये. फेसबुकवर आलेली मैत्रीची कोणतीही विनंती खात्री करूनच स्वीकारावी, ताबडतोब स्वीकारू नये. आणि स्वीकारलीच पाहिजे असे नाही. दुर्दैवाने कठीण प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग आलाच, तर घाबरुन न जाता अत्याचारीच्या डोळा, नाक व अन्य नाजूक भागावर प्रहार करुन संरक्षणाचा प्रयत्न करावा.

Related Articles