तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)   

अण्णा द्रमुक पक्षाबरोबर युतीची घोषणा भाजपने केली. ही युती करून भाजपकडून निवडणुकीसाठी महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. युतीसाठी भाजपने आपले प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना हटविले. त्यांच्या जागी नयनार नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्ताकारण, हाच  प्राधान्याचा विषय असल्याने पक्षात जुने निष्ठावंत कोण आणि नंतर आलेले कोण, हे प्रश्‍न आताच्या भाजपसाठी दुय्यम आहेत. नागेंद्रन यांच्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी, हे पक्षाच्या दृष्टीकोनाचे उत्तम उदाहरण. ते मूळचे भाजपचे नव्हेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी अण्णा द्रमुकचे नेते, ही त्यांची ओळख होती. अण्णा द्रमुक सरकारमध्ये ते मंत्रीही होते. दोन्ही पक्षांच्या युतीसाठी ते अनुकूल असल्याने तामिळनाडूमधील आपल्या आक्रमक चेहर्‍याला भाजपने बाजूला केले. प्रादेशिक पातळीवर कधी नव्हे ती तडजोडीची भूमिका भाजपकडून दिसली, याचे कारण राजकीय अपरिहार्यता हेच होय.तामिळनाडूत राजकीय दृष्टीने भाजपची चर्चा सुरु झाली, ती अण्णामलाई यांच्यामुळे. मतांची टक्केवारी त्यांनी वाढवून दाखवली; मात्र अण्णा द्रमुकबरोबर युती करण्यास त्यांचा विरोध होता. पक्षशिस्त त्यांच्याकडून डावलली जाण्याची शक्यता नसली तरी त्यांची अस्वस्थता कायम राहणार आहे. 
 
गरजेपोटी एकत्र
 
पूर्व, पश्‍चिम, उत्तर या दिशांना असलेली जास्तीत जास्त राज्य सरकारे ताब्यात घेताना दक्षिणेची मनापासून साथ नाही, हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे शल्य आहे. आंध्र प्रदेशात तेलगु देसमबरोबर भाजप सत्तेत आहे. कर्नाटकात याआधी सत्तेचा प्रयोग झाला. केरळमध्ये मतांची टक्केवारी वाढविण्यात यश आले तरी सत्तेचा मार्ग फार दूर आहे. अशावेळी तामिळनाडूचे महत्त्व वाटणे अस्वाभाविक नाही. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना अडचणीत आणण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. त्यासाठी आर.एन. रवी यांना राज्यपालपद देत स्टॅलिन यांच्या मार्गात खोडा घालण्याचे काम सुरु करण्यात आले. आपण केवळ घटनात्मक प्रमुख आहोत, याकडे डोळेझाक करून रवी यांनी लोकनियुक्त मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्याने काही काळ त्यांना लगाम बसेल. राज्यपालांमार्फत आपली उद्दिष्टे साध्य करण्यात मर्यादा येतात, हे पश्‍चिम बंगालमध्येही भाजपला कळून चुकले. आता निवडणुकीतून कौल कसा मिळेल, याकडे पक्षाचे लक्ष आहे. 1998 पासून भाजप - अण्णा द्रमुक यांच्यात युती, कधी फारकत, असे चक्र सुरु होते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णा द्रमुक एकत्र होते. निवडणुकीत द्रमुकने बाजी मारली. भाजपमुळे अल्पसंख्याकांची मते गमवावी लागली, असा सूर अण्णा द्रमुकमधून उमटला. तामिळनाडू भाजपचे मावळते अध्यक्ष अण्णामलाई यांनी जयललितांवर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांमध्ये कटुता वाढली आणि युतीचा शेवट झाला. आता गरजेपोटी दोन्ही पक्ष पुन्हा सोबत आले आहेत. लोकसभा मतदारसंघांची फेररचना आणि हिंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी भाजपवर टीकेचा भडिमार चालविला आहे. द्रविड अस्मितेमुळे भाजपला हिंदीच्या मुद्द्यावरून फार टोकाची भूमिका घेता येणे शक्य नाही. प्रादेशिक अस्मिता, हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरल्यास भाजपला मर्यादा येणार, हे तर उघड. यासाठी आता द्रमुक सरकारचा कथित भ्रष्ट कारभार, या विषयाकडे भाजपने आपला मोर्चा वळवला. लोकप्रिय अभिनेता टी. विजय याने ‘टीव्हीके’ या पक्षाची घोषणा केली आहे. या पक्षाचा भरदेखील तामिळ अस्मितेवर राहील. परिणामी सत्ताधारी द्रमुकच्या मतपेटीत फूट पडण्याची भाजपची अपेक्षा आहे. वर्षभरात तामिळनाडूत निवडणूक अपेक्षित आहे. आताच्या विधानसभेत भाजपचे चार आमदार आहेत. अलीकडेच लोकसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली. या निवडणुकीत तामिळनाडूत पक्षाला मिळालेली 11 टक्के मते नगण्य म्हणता येणार नाहीत. भाजपच्या मतांची वाढलेली टक्केवारी अण्णा द्रमुकला दुर्लक्षित करता आली नाही आणि युती आकाराला आली. केंद्रातील सत्तेमुळे भाजपला साधनसामग्रीची कमी नाही. या आव्हानाला द्रमुक कशा रीतीने तोंड देणार, हे नजिकच्या काळात पाहावयास मिळेल.

Related Articles