वाचक लिहितात   

वाहने आटोक्यात ठेवा
 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी १० हजार १७० वाहने खरेदी केल्याची नोंद आरटीओत करण्यात आली. मागील वर्षापेक्षा या वर्षी वाहन खरेदीची संख्या ३ हजाराने अधिक आहे. पुणे शहरात वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. त्यात या दहा हजार वाहनांची भर पडली आहे. वाढत्या वाहनांमुळे पुण्यातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. शिवाय पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे, ती ओळख आता पुसली गेली आहे. वाढत्या वाहनांमुळे पुण्यातील प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे. नवीन वाहने विकत घेण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएलचा जास्तीत जास्त वापर करायला हवा; पण पुणेकरांचा पीएमपीएलवर विश्‍वास नाही. पीएमपीएलही पुणेकरांना सक्षम सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. म्हणून जो तो नवीन वाहन घेत आहे. पुण्यातील वाहनांची संख्या कमी करायची असेल, तर पीएमपीएलने आपला कारभार सुधारून पुणेकरांना योग्य सेवा द्यायला हवी. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
 
गुटखा, पानमसाला जाहिराती नको
 
सध्या आयपीएलचे सामने सुरु आहेत. जिओ हॉटस्टारने या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क खरेदी करून त्यांच्या अ‍ॅपवर सामन्यांचे विनामूल्य प्रक्षेपण केले जात असल्याने प्रतिदिन हे सामने आठ ते दहा कोटी लोक लाइव्ह पाहत असतात. प्रत्येक षटक झाल्यावर, खेळाडू बाद झाल्यावर, स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाल्यावर लगेचच जाहिरात सुरु होते. यातील जवळपास सर्वच जाहिराती या गुटखा, पानमसाला आणि कोणत्या ना कोणत्या जुगार खेळण्यास प्रवृत्त करणार्‍या ऑनलाइन अ‍ॅप्सच्या असतात. एरव्ही कधीतरी दिसणार्‍या या अ‍ॅप्सच्या जाहिरातींचा लाइव्ह सामन्यांच्या दरम्यान सातत्याने मारा केला जात आहे, ज्याचा परिणाम हे सामने पाहणार्‍या शालेय विद्यार्थ्यांवर आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींवर होऊ शकतो. गुटखा, तंबाखूयुक्त पानमसाला यांवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बंदी आहे, तरीही ते खाणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. अशा समाजविघातक जाहिरातींमुळे शालेय मुले, तरुण त्यांच्या आहारी जाऊन आपल्यासह आपल्या कुटुंबाची हानी करू शकतात, याचा विचार कोण करणार? 
 
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई 
 
कंत्राटदारांवर अंकुश हवा
 
एकीकडे मुंबईवर दररोज आदळणार्‍या लोंढ्यांमुळे लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्याचवेळी घनकचर्‍याचे प्रमाण वाढत असून कचरा व्यवस्थापन खर्चातही मोठी वाढ होत आहे. सध्या महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा खर्च वर्षाला तीन हजार १४१ कोटी इतका प्रचंड आहे. या खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता घनकचरा निर्मूलन कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरासाठी मासिक १०० रुपये, ५०० चौरस फुटांवरील घरासाठी मासिक ५०० रुपये, ३००० चौरस फुटांवरील घरासाठी मासिक १००० रुपये, तर गेस्ट हाऊससाठी २००० रुपये अशा प्रकारे कर आकारणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍यांवर वाढीव दराने दंड आकारला जाणार आहे. याशिवाय इतर अनेक कचरा करविषयक गोष्टी प्रस्तावित केल्या आहेत. नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेकडूनही घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारले जाते; मात्र मुंबईत कचरा कर वसूल केला जात नाही. त्यामुळे कचरा व्यवस्थापन कर आकारण्याचे मुंबई महापालिकेचे पाऊल योग्यच आहे; मात्र त्याचवेळी शहरातील कचरा वाहून नेऊन डम्पिंग ग्राउंडवर टाकणार्‍या वाहतूक कंत्राटदारांनी प्रचंड भ्रष्टाचार करून गेल्या काही काळात करदात्यांचे कोट्यवधी रुपये लाटल्याची प्रकरणे उघडकीस आली होती, त्यावरही अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
असे विमानतळ काय कामाचे?
 
छोट्या गावांना अनेक ठिकाणी विमानतळ उभारण्याच्या सरकारी निर्णयाला अनेक ठिकाणी कमी प्रवेशामुळे ते गजबजलेले दिसून येत नाहीत. साहजिकच अशी विमानतळे निर्मनुष्य ठिकाणे बनत चालली आहेत असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अशा विमानतळासाठी सरकारतर्फे मोठी गुंतवणूक सुद्धा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर विमानतळ तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी व आंध्र प्रदेशातील कर्नुल विमानतळ ही याची उदाहरणे आहेत. कुशीनगर विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबर २०२१ मध्ये करण्यात आले. एप्रिल २०२४ नंतर या ठिकाणी एकही विमान उतरले नाही. महाराष्ट्रातील सोलापूर विमानतळाची अवस्था सुद्धा विचार करण्यासारखी आहे, ही बातमी नुकतीच वाचली. कुशीनगर विमानतळ हे गया येथील लोकांना जाणे सोयीचे व्हावे म्हणून तयार करण्यात आले होते. चिपी विमानतळ हे गोव्यात जाणे सोयीचे व्हावे म्हणून तयार करण्यात आले होते. २०४७ या दीर्घकालीन धोरणाप्रमाणे भारताने देशातील विमानतळाची संख्या दुपटीने वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एकूणच जरी नवीन विमानतळ वाढविण्याचा निर्णय असेल, तर तो निर्णय चांगलाच आहे; पण सर्व गोष्टींचा विचार करून विमानतळाची उभारणी करावी अशी अपेक्षा आहे.
 
शांताराम वाघ, पुणे 

Related Articles