पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप   

सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी आवश्यक

पुणे : वाढत्या उष्णतेमुळे शहरातील पाण्याची मागणी वाढली आहे. पुणेकरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये नागरिकांना जलवाहिन्यांद्वारे आपुरा पाणीपुरवठा होत आहे, असे असताना दुसरीकडे टँकर भरभरुन वाहिले जात आहेत. मात्र नागरिकांपर्यंत ते पोहचतच नसल्याने टँकर नेमके जातात तरी कुठे असा प्रश्न पडला आहे. याबाबतच्या तक्रारी महापालिकेला आल्या आहेत. त्यामुळे आता या टँकरच्या पळवापळविला चाप बसविण्यासाठी टँकर भरणा केंद्रावरील टँकरच्या फेर्‍यांची नोंद केलेल्या नोंदवहीत दरदरोज संबंधित सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी बंधनकारक करण्यात आली आहे. थोडक्यात टँकरच्या दिवसभराच्या फेर्‍यांची जबाबदारी या अधिकार्‍यांवर देण्यात आलेली आहे.
 
शहराच्या उपनगरे आणि मध्यवर्ती भागातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याबाबत तक्रारी करत आहेत. दरम्यान, या वर्षी फेब्रुवारी २०२५ च्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये टँकरची मागणी वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ३८ हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मार्चमध्ये उष्णता वाढली तशी पाण्याचा वापरही वाढला. मार्च २०२५ मध्ये एकूण ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये टँकरची संख्या जवळपास १० हजारांनी वाढली आहे. यावरून शहरातील पाण्याच्या समस्येचा अंदाज येत आहे. मात्र कागदावर दिसणारे पाण्याचे टँकर प्रत्यक्षात गरजू नागरिकांपर्यंत पोहचतच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
 
टँकरला जीपीएस बसविण्यात आले आहे. जीपीएसच्या माध्यमातून टँकर चालकांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या जीपीएस सिस्टिमला देखिले हरताळ महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून फासला जात आहे. पाण्याच्या टँकरची चोरी होत आहे, परंतु टँकर भरणा केंद्रावरील अधिकार्‍यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. यामुळे पुणेकरांच्या हक्काचे पाणी पळवले जात आहे. यावर आता नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. मात्र टँकरला जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याची कोणतीही माहिती पाणीपुरवठा विभागाकडून नवीन आलेल्या अतिरिक्तांना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र ही माहिती मिळकताच आता अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्याकडून याची झाडाझडती घेतली जाणार आहे. सध्या तरी सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी बंधनकारक करण्यात आली आहे.
 
गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची मागणी वाढली असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात आतापर्यंत ४ लाख ४ हजार ३४० टँकरमधून पाणी पुरविण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात खरच पाणी पोहचते का याची पाहणी करण्यासाठी टँकरला जीपीएस बसविण्यात आले आहे. असे असताना देखिल या जीपीएसला केराची टोपली दाखवली जात असून राजकीय नेत्यांकडून तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परस्पर टँकर खाली करुन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचीही तपासणी आता महापालिकेकडून केली जाणार आहे.
 
शहरासह उपनगर भागात नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर आहे. एकीकडे पाण्याची गळती होत असून ती रोखण्यासाठी कसरत करावी लागत असताना, काही राजकीय नेत्यांकडून टँकरला जीपीएस सिस्टीम बसविलेली असताना टँकरती पळवापळवी केली जात आहे. नेमून दिलेल्या ठिकाणी पाणी पोहोचत नसून दुसर्‍याच ठिकाणी पाण्याचे टँकर खाली होत आहे. यावरून महापालिकेच्या डोळ्यासमोरच दुसरीकडे टँकरची चोरी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासोबतच अत्यावश्यक कारणासाठी महापालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. पण दररोज सुमारे ४०० टँकरच्या फेर्‍यांचा हिशोब महापालिका प्रशासनाला लागत नाही. त्यामुळे आता तरी हिशोब लागेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Related Articles