टाटा मोटर्स : प्रतीक्षा नव्या भावंडांची   

भाग्यश्री पटवर्धन 

पुण्याच्या औद्योगिक जीवनात मोठे योगदान दिलेल्या टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअरचे विलगीकरण होऊन दोन नव्या कंपन्या अस्तित्वात येणार आहेत. ही बातमी आणि त्याउद्देशाने सुरु झालेल्या प्रक्रियेसाठी सहा मे ही तारीख महत्वाची आहे.
 
चालू आर्थिक वर्षाचा पहिला पंधरवडा गुंतवणूकदारांना धडकी भरवणारा ठरला यात शंका नाही.  कोणाही सामान्य माणसाला शेअर बाजारातील भूकंपाचे बरे वाईट परिणाम सहन करावे लागतील अशी भीती वाटू लागली आहे. मात्र जराही विचलित न होता सध्याच्या वेगवान घडामोडी केवल पाहत रहा आणि निश्चिंत रहा! हे असे म्हणण्याचे कारण देशाची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. महसूल वाढ चांगली आहे. जून महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन आणि सेवा क्षेत्र यांची वाढ बरी आहे. हे नमन यासाठी की, पुण्याच्या औद्योगिक जीवनात मोठे योगदान दिलेल्या टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअरचे विलगीकरण होऊन दोन नव्या कंपन्या अस्तित्वात येणार आहेत ही बातमी आणि त्याउद्देशाने सुरु झालेल्या प्रक्रियेच्या दृष्टीने सहा मे ही तारीख महत्वाची आहे.  
 
वाहन उद्योगात मारुती, हुंदाई, महिंद्रा या भारतात प्रकल्प असलेल्या कंपन्यांसोबत आता टेस्ला येऊ घातली आहे. बीवायडी ही चिनी बनावटीची कार भारतातील रस्त्यावर दिसू लागली आहे. मूळ जर्मन बनावटीची मात्र आता देशी मर्सिडीज बेंझ सर्वपरिचित आहे. थोडक्यात कार बाजारपेठेत स्पर्धा तीव्र आहे आणि तंत्रज्ञानात होत असलेल्या वेगवान बदलांमुळे तसेच इलेक्ट्रिकच्या आकर्षणामुळे ही बाजारपेठ सतत स्पर्धेचे नवे आयाम पुढे आणते आहे. अशा स्थितीत टाटा मोटर्स प्रवासी आणि व्यापारी अशा दोन्ही स्वरूपाच्या वाहन निर्मितीत स्वतःचे स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. याचे नेमके उदाहरण म्हणजे ‘जॅग्वार  लँड  रोव्हर’ ही नाममुद्रा असलेल्या परदेशी बनावटीच्या कार टाटा या छत्राखाली येणे. आज अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा फटका टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांना अधिक जाणवणार असला तरी कंपनीच्या छत्राखाली असलेल्या जॅग्वार लँड रोव्हरला तो जास्त बसणार आहे. यामुळे नवनव्या बाजारपेठ मिळाव्यात यासाठी धडपड करावी लागणार आहे.  
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन महिन्यांकरता शुल्क आकारण्यास स्थगिती दिलेली असल्याने चालू तिमाहीची कंपनीची कामगिरी कशी होते याकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. टाटा कंपनीचे व्यवस्थापन बदलत्या घडामोडींवर लक्ष ठेवून असून जरूर तेव्हा उपाय योजेल असे कंपनीतर्फे मागील आठवड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. स्थगिती तात्पुरती असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनाही निर्यातवाढीसाठी काही धोरणात्मक पावले टाकावी लागणार आहेत. केंद्र सरकारने बैठक घेऊन त्यावर विचार सुरु केलेला असल तरी त्याचे परिणाम दिसण्यास काही काळ जाणार हे नक्की. या सगळ्या घडामोडीत कंपनीचे शेअर गेल्या आठवड्यात सुमारे नऊ टक्के घसरले आहेत. कंपनीच्या शेअरचा कमाल किमान भाव (५२ wk high १,१७९.००  ५२ wk low  ५३५.७५) असा आहे.
 
भारत नेटचा विस्तार आयटीआयच्या पथ्यावर
 
• केंद्र सरकारकडून देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे भारत नेट प्रकल्प. त्यातील तिसर्‍या  टप्प्याच्या विस्तारासाठी कामाचे कंत्राट आयटीआय कंपनीला मिळाले आहे. भारत संचार निगम म्हणजे बीएसएनएलशी सहकार्याने हे कंत्राट अमलात येणार आहे. या बातमीनंतर आयटीआयचा शेअर सुमारे पाच टक्के वधारला आहे. मागील वर्षी अशाच प्रकारे कंपनीला सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे कंत्राट विविध राज्यात मिळाले होते. कंपनीच्या शेअरचा कमाल किमान भाव (५२ wk high, ५९२.७०, ५२ wk low २१०.००) असा आहे. दूरसंचार क्षेत्रातील केंद्राच्या मालकीची ही कंपनी आहे. सरकारी पाठबळ मिळत असल्याने कामगिरीत सातत्य राहील अशी अपेक्षा आहे.
 
• टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी वाढ दिसून आली. बाजाराचे घटक असलेल्या दलाली पेढ्यांपैकी २६ जणांनी आगामी काळात कंपनीच्या शेअरचे लक्ष्य सुमारे ९०० रुपये दिले आहे. याचा अर्थ ६० टक्के वाढ भावात होईल असा अंदाज त्यांनी मांडला आहे.

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

Related Articles