मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)   

साबरमतीच्या तीरावर काँग्रेसचे ८४ वे महाअधिवेशन पार पडले. यानिमित्ताने झालेल्या मंथनातून काँग्रेसला नवचैतन्य मिळेल का, मरगळ आलेली काँग्रेस सावरणार का आणि नव्या आव्हानांना सामोरी जाणार का? हा खरा प्रश्न आहे. गुजरातमध्ये ६४ वर्षांपूर्वी १९६१ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्यावेळी संपूर्ण देशभर तळागाळापर्यंत काँग्रेसची मुळे खोल रूजलेली होती. गेल्या काही वर्षांत काँग्रेस कमजोर झाली आहे. गुजरातमध्ये तर तीन दशके काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये महाअधिवेशन कशासाठी असा प्रश्न पडणे स्वाभाविकच. त्यातही गुजरातमध्ये नजीकच्या दोन अडीच वर्षांत निवडणुका नसताना आणि बिहारची निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना बिहारऐवजी गुजरातमध्ये अधिवेशनाची मांडणी काँग्रेसने केली ती लक्षात घेता भाजपला आणि त्यांच्या रणनीतीला हे अधिवेशन प्रत्युत्तर ठरावे. काँग्रेसच्या अधिवेशनात नेहरू-गांधी यांच्या खेरीज अन्य नेत्यांच्या छायाचित्रांना क्वचितच स्थान मिळते. यावेळी मात्र सरदार पटेलांच्या १५० व्या जयंतीवर्षाचे निमित्त साधून काँग्रेसने त्यांना अधिक महत्त्व दिले. सरदार पटेल यांच्या जीवनचरित्राचे पुस्तक सर्वांना देण्यात आले. भाजपने सरदार पटेल हा एकूणच मुद्दा त्यांचा स्वतःचा बनवला आहे. त्याला काँग्रेसने या कृतीतून चपराक दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष खर्गे यांनी नेहरू आणि पटेल यांच्यातील मधुर संबंधाविषयीचा उल्लेख त्यांच्या भाषणातून केला. त्यांनी भाजपच्या राजकीय धोरणावर कठोर टीका केली. मोदी सरकार विशिष्ट उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे राबवीत आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी वक्फ कायद्याच्या विरोधात काँग्रेस ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार खर्गे यांच्या भाषणातून व्यक्त झाला. भाजपने महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका-अफरातफर करून जिंकल्याचा आरोप त्यांनी केला.स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे काहीच योगदान नव्हते, अशा भाजप आणि संघाने सरदार पटेल यांचा वारसा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. महात्मा गांधींच्या जन्मभूमीत काँग्रेस या अधिवेशनाच्या निमित्ताने आपला पाया अधिक विस्तृत करु पाहात आहे.
 
भाजपला आव्हान
 
या अधिवेशनाच्या निमित्ताने झालेले चिंतन आणि मंथन महत्त्वपूर्ण आहे. न्यायपथ, संकल्प, समर्पण आणि संघर्ष ही या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना होती. संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार, विरोधकांची इंडिया आघाडी मजबूत करण्याची कटिबद्धता आणि भाजपला आव्हान देण्याचा संकल्प हा या अधिवेशनाचा निष्कर्ष आहे. भाजपच्या धोरणावर टीका करताना वक्त्यांनी, घटनात्मक संस्थांचा पाया खिळखिळा करून लोकशाहीचा संकोच केला जात असल्याची टीका केली. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढून वंचित घटकांचे, युवकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र तेवढेच पुरेसे नाही याची जाणीव शशि थरूर यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली. केवळ नकारात्मक टीके ऐवजी काँग्रेसने स्वतःला सक्षम आणि भाजपला पर्याय म्हणून सिद्ध केले पाहिजे हे त्यांचे मत चुकीचे म्हणता येणार नाही. काँग्रेस केवळ टीका करणारा पक्ष नाही तर जनतेच्या दृष्टीने तो आशादायक वाटायला हवा या त्यांच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. ओव्हरसीज  काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनीही केवळ ठराव करून काँग्रेसला उज्ज्वल भवितव्य नसल्याचे एका मुलाखतीत सांगितले. काँग्रेसमध्ये आदर्श विचारधारेवर चर्चा होते. मात्र अंमलबजावणी होत नाही. या आधी रायपूर आणि जयपूरमध्ये झालेल्या अधिवेशनातील ठरावांची किती अंमलबजावणी झाली? असा प्रश्न त्यांनी विचारला. एकेकाळी मजबूत असलेली काँग्रेस संघटना खिळखिळी झाली. अनेक जिल्ह्यांत पक्ष नावापुरताच उरला आहे. या दृष्टीने तालुका, जिल्हा पातळीपासून पक्षसंघटना उभी करावी लागेल. केवळ मतदानयंत्राला निवडणुकीतील पराभवाचा दोष देता येणार नाही. देशातील अनेक प्रश्न आहेत. आर्थिक, सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह झाला पाहिजे. भाजपच्या चुकीच्या धोरणांना योग्य पद्धतीने विरोध झाला पाहिजे. आता गुजरातमधूनच भाजपला आव्हान देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. तरीही हे अधिवेशन काँग्रेसला नवी दिशा देणार का, याचेही उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.

Related Articles