राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. सध्या राज्यातील १४ जिल्ह्यांतील ७८४ गावे आणि वाड्यांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. या गावांना आणि वाड्यांना २२३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील धरणांमधील पाण्याचा साठा झपाट्याने खालावत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा ४२.८६ टक्क्यांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला तेव्हा राज्यातील १४ जिल्ह्यांतील १७८ गावे व ६०६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी खासगी २०७ आणि १६ शासकीय टँकर धावत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सर्वाधिक टँकर पुण्यात

सध्या सर्वाधिक म्हणजे पुण्यात ६५ टँकर धावत आहेत त्याखालोखाल सातार्‍यात ४० टँकर गावागावात पाणी पुरवठा करीत आहेत. मागील आठवड्यात राज्यात १७८ टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी धावत होते. पण आता हा आकडा वाढला असून सध्या २२३ टँकर पाणी पुरवठा करीत आहे.

धरणातील पाणीसाठा

नागपूर : ४२.८३ टक्के 
अमरावती : ५१.०३ टक्के 
छत्रपती संभाजीनर : ४२.३८ टक्के
नाशिक : ४४.८४ टक्के 
पुणे : ३८.४२ टक्के 
कोकण : ५०.६८ टक्के

जिल्हा आणि टँकरची संख्या

ठाणे : ३०
पालघर : १६
अमरावती : १२
बुलडाणा : २२
 

Related Articles