एक शाप, दोन वर   

भावार्थ रामायणातील कथा : विलास सूर्यकांत अत्रे

उदात्त मानवी मूल्यांची जननी असलेल्या, भारतीय संस्कृती व सभ्यतेच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ अशी मान्यता पावलेल्या सर्वाधिक लोकप्रियता लाभलेल्या वाल्मिकी रामायण ग्रंथावरील प्राकृत भाषेत टीका असलेला एकनाथ महाराजांचा भावार्थ रामायण हा ग्रंथ. भावार्थ रामायण एक प्रासादिक महाकाव्य आहे. ग्रंथातील ओवीबद्ध उत्कट प्रसंगातून नाथाच्या दिव्य प्रतिभेची व रामभक्तीची साक्ष ठायी ठायी लक्षात येते. या भावार्थ रामायणातील काही आगळे 
वेगळे प्रसंग.
 
दशरथ राजाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याच्या पित्याचे नाव राजा ‘अज‘. दशरथाला तीन राण्या होत्या. सर्वात मोठी राणी कौसल्या. कौसल्या म्हणजे सद्विद्या, दुसर्‍या राणीचे नाव सुमित्रा, सुमित्रा  म्हणजे शुद्ध मेधा आणि तिसरी राणी कैकयी. कैकयी म्हणजे अविद्या. कैकयी सोबत तिची एक दासी होती. तिचे नाव मंथरा. मंथरा म्हणजे कुविद्या. कैकयी ही दशरथाची लाडकी राणी. तीन राण्या असूनही दशरथाला अपत्य झालेले नव्हते. दशरथाला एक मित्र होता.  त्याचे नाव राजा शांतन उर्फ लोमपद. दशरथाला अपत्य नसल्याने लोमपद राजाने त्याची कन्या शांतना उर्फ शांता ही दशरथाला दत्तक दिलेली होती. दशरथाने तिला मुलीसारखेच सांभाळले होते. जणू काही ती त्याचीच कन्या होती. 
 
असे असले तरी दशरथाला स्वत:चे अपत्य नसल्याने त्याचे मन राजवाड्यात, अलंकारवस्त्रात, स्तुतीस्त्रोतात किंवा राण्यांसोबत लागत नव्हते. तो स्वत:चे मन कुठेतरी रमविण्याचा प्रयत्न करीत असे आणि म्हणून  मनोरंजनासाठी तो शिकार करायला वनात गेला. त्याच वनातून आई वडिलांना कावडीत बसवून श्रावण तीर्थ यात्रेला चालला होता. अंधार पडला होता. श्रावणाच्या आई वडिलांना तहान लागली. पाण्याच्या शोधात आई वडिलांना घेऊन एका सरोवरापाशी तो आला. पाण्याशी कोणी जनावर येईल, शिकार मिळेल म्हणून त्याच सरोवराजवळ राजा दशरथ दबा घरून बसला होता. पाणी घेण्यासाठी श्रावणाने  कमंडलू पाण्यात बुडविले आणि त्याचा आवाज आला. राजा दशरथाला वाटले पाणी पिण्यासाठी कोणता तरी प्राणी सरोवरापाशी आला आहे. शिकार करण्यास तो उतावीळ झाला. दशरथ हा धनुर्विद्येत पारंगत होता.तो शब्दवेधी असल्यामुळे अंधारात नुसत्या आवाजाच्या दिशेने त्याने  बाण सोडला. श्रावणला तो बाण लागला. श्रावणला बाण लागताच त्याला त्याचे आई, वडील, स्वत:च्या देहाची ममता, असे काहीच श्रावणाल आठवले नाही. त्याला आठवल ते फक्ते रामनाम आणि  रामाचे स्मरण करीत करीत त्याने प्राण सोडला. श्रावणाला मुक्ती लाभली. 
 
राजा दशरथ कोणती शिकार मिळाली आहे हे पहाण्यासाठी सरोवराच्या जवळ गेला तिथे जाताच त्याने पाहिले तर एक तरूण आपला बाण लागून मरून पडला आहे. ते पाहून दशरथ भयकंपित झाला. बाजुला बसलेले वृद्ध दांपत्य पाहून काय घडले असावे हे त्याच्या लक्षात आले. श्रावणाच्या आई वडिलांना राजा दशरथाकडून घडलेली घटना समजली.  दोघांना अतिशय  दु:ख झाले. आयुष्यात जगण्यासारखे मागे काही शिल्लकच राहिले नाही. अतिशय तळतळत  त्यांनी राजा दशरथाला शाप दिला. ‘आम्हाला तू जसे पुत्रदु:ख दिलेस तसेच तुलाही पुत्र वियोगाने मृत्यु येईल,‘ आणि शाप देऊन श्रावणच्या आई वडिलांनी प्रााणत्याग केला. 
 
या श्रावण बाळ त्याचे आई वडील यांच्या पूर्व जन्माची एक कथा आहे. एक सरोवर होते त्या सरोवराकाठी  गिधाडाची (गृध्री) एक जोडी रहात होती. त्या सरोवरात अनेक मासेही होते. त्यातील एका मासा आणि त्या गिधाडाची जोडी यांची  मैत्री झाली. ते अगदी परम मित्र झाले. दुर्दैवाने त्या सरोवराचे पाणी हळूहळू आटायला लागले. आपल्या मित्राचा पाण्या अभावी मृत्यु होणार याची त्या  गिधाडांना काळजी वाटू लागली. त्यांनी विचार केला अपल्या या मित्राला भरपूर  पाणी असलेल्या सरोवरात नेऊन सोडले तर त्याचा जीव वाचेल. तिघांनी विचार केला आणि मासा त्या गिधाडा बरोबर भरपुर पाणी असलेल्या सरोवरामध्ये त्यांच्या बरोबर जाण्यास तयार झाला. त्या माशाला अलगद प्रेमाने उचलून ती  गिधाडे दुसर्‍या सरोवराकडे उडत उडत निघाली.  वाटेत त्यांना प्रचंड पसरलेले एक अरण्य लागले. आणि त्या अरण्यात मोठा वणवा पेटला होता. त्या अरण्यातून जाताना वणव्याच्या झळींनी मासा मरून खाली पडला. त्याचे तुकडे झाले. या गोष्टीचे गिधाडाच्या त्या जोडीला इतके दु:ख झाले की त्या उभयतांनी तिथेच आपला देहत्याग केला. असे त्यांचे भाव संबंध जुळले होते. त्यांचा एकमेकांशी असा काही ऋणानुबंध होता की त्या तिघांचा नवा जन्म मनुष्य योनीत झाला. त्यातील मासा म्हणजे श्रावणबाळ आणि गिधाडांची जोडी म्हणजे त्याचे आई वडील. श्रावणबाळ आणि त्याचे आई वडील. 
 
श्रावणाच्या पित्याने म्हणजे एका ब्राम्हणाने दिलेला शाप खराच होईल या खात्रीने दशरथाला त्या शापाचे  दु:ख न होता  आनंदच झाला. राजा दशरथाचा मृत्यू पुत्र वियोगाने होणार होता तरी निपुत्रीक दशरथाला त्या शापाने निश्च्चित पुत्र लाभ होणार होता. राजा दशरथाने नंतर तिघांचे अंतीम क्रियाकर्म केले.दशरथ अयोध्येला परतला. श्रावणाचा वध म्हणजे ब्रह्महत्याच होती. त्याचे फळ मिळणार होतेच. ब्रह्महत्येचे पातकातून मुक्त होण्यासाठी दशरथाने राजगुरू वसिष्ट यांच्या सांगण्यावरून अश्वमेध यज्ञ केला. यज्ञामुळे दशरथ पापमुक्त झाला. पण ज्या राज्यात ब्रह्महत्या घडते तिथे पाऊस पडत नाही आणि त्यातच  दैत्यांचा गुरू शुक्राचार्य याने दशरथाच्या राज्यात येणारे पाण्याचे साठे  अडवून धरले. पाऊस नाही, पाणी नाही त्यामुळे राज्यात दुष्काळ पडला. अवर्षण पडले. प्रजा अन्नपाण्यावाचून तडफडू लागली. गाईगुरांना गवताची काडी मिळेनासी झाली. हाहाकार माजला.
 
या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. तो म्हणजे  शुक्राचार्य यांच्याशी युद्ध करणे. शुक्राचार्य स्वर्गात असल्याने दशरथाने स्वर्गावर स्वारी करायची तयारी केली. दशरथाला युद्धाला निघताना पाहून कैकयीने हट्ट धरला की, मी पण तुमच्या बरोबर येणार. दशरथाची ती लाडकी राणी असल्यामुळे दशरथाने कैकयीलाही आपल्या बरोबर घेतले.
 
घनघोर युद्धात दशरथाने दैत्यसेना जर्जर केली, त्यांना पळता भुई थोडी झाली. दशरथाने  त्याचा रथ शुक्राचार्य याच्यापुढे युद्धासाठी आणला असता शुक्राचार्याने बाण मारून दशरथाच्या रथाच्या चाकाची आरी तोडली. रथ जागच्या जागी थांबला. दशरथ जागेवर बद्ध झाला. रथाशिवय त्याचा पराक्रम शून्य झाला. तथापी कैकयी ही धीराची शूरवीर स्त्री होती तिने आपल्या हाताचा उपयोग रथाच्या चाकाच्या आरी साठी केला. त्या मुळे दशरथला पुढे युद्ध सुरू ठेवता आले. त्याने शुक्राचार्यावर बाणांचा इतका भडिमार केला की शुक्राचार्य घाबरून गेले आणि त्यांनी दशरथाला पाठ दाखवून रणातून पलायन केले. दशरथाचा विजय झाला. या विजयाने पाण्याचे साठे मोकळे झाले. देवांना बृहस्पतीला, इंद्राला सगळ्यांनाच आनंद झाला. दशरथावर त्यांनी पुष्पवृष्टी केली. 
 
नारदमुनीं दशरथाला वर देत म्हणाले ‘ दशरथा तुझे सारे मनोरथ पूर्ण होतील. तुला पुत्रसंसती होईल. त्यासाठीचा मार्ग सांगतो. विभांडक नावाचे ऋषी आहेत. त्यांच्या हातून तू अयोध्येत यज्ञ कर. त्यांच्या हातून यज्ञ  केल्यास तुला पुत्रप्राप्ती निच्चित होईल. हे  विभांडक ऋषी मात्र तुला सहजासहजी भेटणार नाहीत. त्यांचा निवास  कायम वनात असतो  पण   विभांडक ऋषी यांना ऋष्यशृंग नावाचा मुलागा आहे. त्याला स्त्री मोहाने तू नगरात आण आणि तो नगरात आला की शांतना हिच्या सोबत त्याचे लग्न लावून दे. एवढे केलेस तर तुझे मनोरथ पुर्ण होतील.‘
 
ऋष्यशृंगला स्त्री मोहात पाडण्यासाठी इंद्राने मदनाचे सैन्य म्हणून अप्सरांना पाठविण्याची तयारी दाखविली. कैकयीच्या पराक्रमाने दशरथ युद्ध जिंकू शकला.  श्रावणाच्या वडीलांनी जरी शाप दिला होता, तरी नारदाच्या अश्वासक बोलण्याने आणि शुक्राचार्य यांच्यावरील विजयाने  दशरथ अत्यंत सुखावला होता. त्या युद्धात कैकयीचा सहभागही मोठा होता.युद्धात कैकयीने केलेल्या मदतीबद्दल दशरथाने तिला कोणत्याही दोन गोष्टी मागण्यास सांगितल्या. तिला तसे दोन वर देऊ केले. कैकयीने हे दोन वर योग्यवेळी मागेन त्या वेळी द्या असे दशरथाला सांगितले. कैकयीचे मागणे दशरथाने क्षणात मान्य केले. कैकयी मागेल त्या दोन  गोष्टी ती मागेल तेंव्हा देईन अशी शपथही त्याने   घेतली. कैकयीला दिलेल्या दोन वरांनी दशरथाने स्वत:ला बांधून घेतले होते. या  एका शापाने आणि दोन वरांनी पुढील सगळे रामायण  घडणार होते.  
 

Related Articles