रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद   

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या १३ बांगलादेशी नागरिकांना रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने ६ महिन्यांच्या साध्या कैदेसह प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुख्य न्यायाधिश निखिल गोसावी यांनी हा निकाल दिला.
   
पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नोव्हेंबरमध्ये १३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. या बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. यानंतर रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ति अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करत मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.याप्रकरणी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ६ महिन्यांची साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  

Related Articles