मनोज कुमार यांचा जीवनप्रवास   

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे नाव देशभक्तीपर चित्रपटांशी जोडले गेले. यातूनच त्यांची ‘भारत कुमार’ ही ओळख बनली.  
 
बालपण  
 
हरिकिशन गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचे खरे नाव. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. तिथे शरणार्थी शिबिरात त्यांचे बालपण गेले. दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयामधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
 
अभिनय क्षेत्रात प्रवेश 
 
मनोज कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले. 
 
दिलीपकुमार यांचा प्रभाव
 
अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या भूमिकांमुळे  मनोज कुमार प्रभावित झाले होते. ’शबनम’ चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव ’मनोज’ होते. ते नाव त्यांना खूप आवडले. त्यामुळे हरिकिशन यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण करताना आपले नाव बदलून मनोज कुमार असे केले. 
 
चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही छाप 
 
मनोज कुमार यांनी केवळ अभिनयच नव्हे, तर चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही आपली छाप पाडली. त्यांच्या चित्रपटांनी सामाजिक मुद्दे, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि राष्ट्रीय एकता यांना केंद्रस्थानी ठेवले. अभिनय, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि गीतकार अशा विविध भूमिकांमधून भारतीय प्रेक्षकांना निखळ मनोरंजनासोबतच राष्ट्रीय भावना जागृत करणारे संदेश त्यांनी दिले.
 
‘भारत कुमार’ नावाने ओळख 
 
मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली होती. बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव भारत असायचे. चित्रपटांमधून देशभक्ती आणि समाजाचे प्रश्न मांडणार्‍या मनोज कुमार यांना ’भारत कुमार’ ही नवी ओळख मिळाली. ‘मेरे देश की धरती सोना उगले’ आणि ‘भारत की बात सुनाता हूँ’ या सारख्या गीतांनी त्यांना देशभक्तीच्या चित्रपटांचा प्रणेता बनवले. 
 
लाल बहादुर शास्त्रींच्या सांगण्यावरून चित्रपट 
 
१९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. या युद्धानंतर मनोज कुमार यांनी लाल बहादूर शास्त्रींची भेट घेतली. या भेटीदरम्यान शास्त्रींनी मनोज कुमार यांना युद्धामुळे होणार्‍या त्रासाबद्दल चित्रपट काढण्यास सांगितलेे. त्यावेळी मनोज कुमार यांना चित्रपट बनवण्याविषयीचा तेवढा अनुभव नव्हता. तरीही त्यांनी ‘जय जवान जय किसान’ या घोषणेशी संबंधित ‘उपकार’ हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच भावला.  
 
आणीबाणीच्या काळात अडचणीत
 
मनोज कुमार यांचे इंदिरा गांधींशी चांगले संबंध होते; पण आणीबाणीला विरोध करून त्यांनी तत्कालीन सरकारची नाराजी ओढवून घेतली होती. त्याचा परिणाम असा झाला की, जेव्हा मनोज कुमार यांचा ’शोर’ हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. याआधीही तो चित्रपट दूरदर्शनवर आला. याशिवाय ’दस नंबरी’ या चित्रपटावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली होती. त्यामुळे मनोज कुमार यांच्यासाठी आणीबाणीचा काळ खूप कठीण होता. 
 
फाळके पुरस्काराने सन्मानित 
 
अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय त्यांना ७ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. त्यामध्ये १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उपकार’ साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कारांचा समावेश आहे. शहीद चित्रपटासाठी त्यांना एक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
 
गाजलेले चित्रपट
 
• मनोज कुमार यांना हरियाली और रास्ता, उपकार, पूरब औऱ पश्चिम, शोर, वो कौन थी, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, रोटी कपडा और मकान, संन्यासी, सावन की घटा, क्रांती या गाजलेल्या चित्रपटांनी घराघरांत पोहोचवले. शहीद सिनेमातील त्यांच्या भगतसिंहांच्या भूमिकेचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते. १९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटापासून त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. या चित्रपटात माला सिन्हा त्यांच्या नायिका होत्या.  

Related Articles