वक्फ’ राज्यसभेतही मंजूर   

विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात ९५ मते

नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ गुरुवारी मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात ९५ मते पडली. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची मोहोर उमटताच विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दुपारी १ वाजता हे विधेयक राज्यसभेत मांडले. त्यावर, सभागृहात १२  तास चर्चा झाली. त्यानंतर, मध्यरात्री मतदान घेण्यात आले. या विधेयकाचा निषेध म्हणून काही खासदारांनी काळे कपडे परिधान केले होते. 
 
सभागृहात चर्चेत सहभागी होताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आरोप-प्रत्यारोपासह प्रस्तावित कायद्यातील बदल कितपत योग्य आणि अयोग्य असल्याचे सांगितले. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर होण्यास अडसर होणार नाही, हे स्पष्ट होते
 
दरम्यान, मुस्लिमांचे हक्क हिरावून घेतले जात असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना रिजिजू यांनी प्रस्तावित कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही किंवा त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतु नाही, असे स्पष्ट केले.
 
लोकसभेने सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर बुधवारी मध्यरात्री हे विधेयक २३२ विरुद्ध २८८ मतांनी मंजूर केले. त्यानंतर, ते काल राज्यसभेत मांडण्यात आले. राज्यसभेत हे विधेयक मांडताना रिजिजू म्हणाले, प्रस्तावित कायद्याचा धर्माशी काहीही संबंध नाही; ते केवळ मालमत्तांशी संबंधित आहे. सर्व मुस्लिम पंथांना वक्फ मंडळात समाविष्ट करण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. या विधेयकाचा उद्देश वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणणे हा आहे.
 
२००४ मध्ये ४.९ लाख वक्फ मालमत्ता होत्या; त्या आता ८.७२ लाख झाल्या आहेत, अशी माहितीही रिजिजू यांनी यावेळी सभागृहाला दिली. हे विधेयक मंजूर करण्यासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनदेखील रिजिजू यांनी यावेळी केले. तसेच, मागील सरकारांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.वक्फकडे जगातील सर्वांत मोठी मालमत्ता आहे, याचा पुनरुच्चार करताना रिजिजू म्हणाले की, या मालमत्तेचे व्यवस्थापन योग्य झाले तर, त्याचा अनेक गरीब मुस्लिमांना फायदा होईल. 

नितीश यांना धक्का; वरिष्ठ नेत्याचा राजीनामा

पाटणा : वक्फ दुरुस्ती विधेयकाचे संयुक्त जनता दलाने समर्थन केले आहे. मात्र, नितीश कुमार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कासीम अन्सारी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अन्सारी यांनी नितीश यांना पत्र पाठवित पक्षाचे सदस्यत्व सोडत असल्याचे म्हटले आहे. कोट्यवधी भारतीय मुस्लिमांचा विश्वास होता की, आपण धर्मनिरपेक्ष विचारधारेचे पुरस्कर्ते आहात. पण, हा विश्वास तुटला आहे. तसेच, त्यांनी हे विधेयक पसमांदा (मागासलेले मुस्लिम) विरोधी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तेव्हा वक्फ विधेयक रद्द करणार : ममता

कोलकाता : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जाईल आणि नवीन सरकार येईल तेव्हा वक्फ दुरुस्ती विधेयक,२०२५ रद्द केले जाईल, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले. भाजपने देशाला तोडण्यासाठी हे विधेयक आणले, असा आरोपही त्यांनी केला. लोकसभेत तृणमूलचच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केले. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी हे विधेयक राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारे असल्याचे सांगितले.
 

Related Articles