घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा   

प्रशासनाचे दुर्लक्ष

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशीबेग व चिंचोडी देशपांडे येथील घोडनदी पात्रातून मागील तीन महिन्यापासून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू आहे. कोट्यवधी रुपये किमतीच्या वाळूची चोरी झाली असून प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. ही दोन्ही गावे वाळूचोरी व मुरमचोरीचा अड्डा बनली आहेत.
 
वडगाव व चिंचोडी ही दोन्ही गावे घोड नदीच्या काठावर असून मंचर-घोडेगाव रस्त्यापासून काहीशी लांबवर आहेत. त्यामुळे दोन्ही गावे वाळू तस्करांच्या दृष्टीने फायद्याची ठरत आहे. चिंचोडी येथे वाळूचा भरमसाठ उपसा करून अमाप माया जमवण्यात आली. नदीपात्र अक्षरशा खोदून काढण्यात आले. घोडनदीवरील वडगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याने भरल्यानंतर वाळू माफियांनी आपला मोर्चा बंधार्‍याच्या पुढील बाजूस वळविला व मागील तीन महिन्यापासून दिवस रात्र वडगावच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दिवसभर जेसीबी इतर यंत्रसामग्री तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीतून वाळू काढायची व रात्रभर अवजड वाहनांच्या साह्याने त्याची वाहतूक करण्याचे काम सुरू असते. रात्रभर वाहनांच्या आवाजाने नागरिकही त्रस्त झाले आहे.
 
चिंचोडी येथील घोडनदी पात्रातूनही वाळूचा उपसा सुरूच आहे. अवजड वाहनांनी येथील रस्त्यांची अक्षरशा वाट लागली असून सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे. महसूल प्रशासनाच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. महसूल खात्याचा एकही कर्मचारी या भागात फिरकत नाही. तलाठी, सर्कल यांना दिवसरात्र सुरू असलेला वाळू उपसा दिसत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी झाली आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असून प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. वडगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या पुढील बाजूस नवीन पूल बनवण्यात आला आहे. तिथून जो वाळू उपसा सुरू झाला तो आता ४०० मीटर अंतरापर्यंत सुरू आहे. 
 
घोडनदीमध्ये वाळूचे मोलमोटार जाण्यासाठी रस्ता सुद्धा करण्यात आला आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून जाड वाळूचा ढीग ठीक ठिकाणी दिसून येतो. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व नवीन पूल यांनाही धोका होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर वाळू चोरी रोखली जाईल असे वाटत होते. मात्र वडगाव येथील वाळू चोरीचा प्रकार पाहता प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल केला जातोय. वाळू बरोबरच मुरुम चोरी सुद्धा सर्रास सुरू आहे. रात्रीच्या वेळी ही मुरूम वाहतूक केली जाते. एकूणच वडगाव व चिंचोडी ही दोन्ही गावे वाळूचा चोरीचा हॉटस्पॉट बनला आहे. या वाळू माफियांना कोणीही रोखणारा नसल्याने राजरोसपणे मागील तीन महिन्यापासून वाळू चोरी सुरू आहे.
 
वाळू माफियांची या परिसरात प्रचंड दहशत आहे. मागे एकदा चिंचोडी येथे वाळू उपसा सुरू असताना झालेल्या भांडणात अगदी वाहन पेटवून देण्याचा प्रकार घडला होता.हे प्रकरण त्यावेळी मिटले मात्र तेव्हापासून ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली असून तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही. नजरेसमोर वाळू उपसा सुरू असूनही नागरिक काही करू शकत नाही. दहशतीमुळे आम्ही तक्रार करू शकत नाही. असे एका ग्रामस्थांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. वडगाव ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काहीच का करत नाही असा सवाल केला जातोय.

वाळू माफियांचा आका कोण? 

अशी कुजबुज परिसरात सुरू आहे. एकदा तक्रार आल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गस्त सुरू ठेवा, वाळू चोरी रोखा अशी सूचना प्रांतधिकार्यांनी करूनही वाळू माफियांवर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. महसूल विभागाच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांची वाळू आत्तापर्यंत चोरीला गेली आहे.
 

Related Articles