कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार   

आमदार योगेश टिळेकर यांची माहिती; अधिवेशनाच्या पाश्वर्र्भूमीवर पत्रकारांशी संवाद

पुणे : शहराला समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचे विभाजन, उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून, आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
 
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेश टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रा. सचिन जायभाये, भूषण नाहाटा, बाळासाहेब घुले  उपस्थित होते.टिळेकर म्हणाले, विधानपरिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी, ९ औचित्याचे मुद्दे आणि ७ विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली. कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले. पुण्यातील पाण्याचा प्रश्न, बेकायदेशीर व अनधिकृत प्लॉटिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारतीत सुरु असलेली शाळा या लक्षवेधीना मंत्रिमहोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २८० कोटींचा निधी आला, मात्र, त्याचे काम अद्यापही सुरु झाले नाही, याकडे लक्ष वेधले.
 
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून, त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे. परिणामी मूलभूत सोईसुविधा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. उपनगरांमधील नागरिक कर भारत असूनही त्यांना विकासकामांचा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरु आहे. लवकरच यावर निर्णय होईल. शहरात बकालपणा वाढतो आहे. व्यापार्‍यांकडून, विकासकांकडून बांधकामे सुरु आहेत. ते थांबवण्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, असे ते म्हणाले.
 
टिळेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाशेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, अशी आमची मागणी आहे. ही जागा खासगी विकासकाला देता कामा नये. तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीरगडावरही स्मारक व्हावे, अशी भूमिका मांडली.भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली. संत सावता माळी यांच्या अरण (सोलापूर) येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी मिळावेत व त्याला ’अ’ दर्जा मिळावा, अशी मागणी केली.

Related Articles