’सौगात’चे वाटप सत्तेसाठी   

उद्धव यांची पंतप्रधानांवर टीका

मुंबई, (प्रतिनिधी) :  ज्या धर्मात विष पेरले, निवडणुकीमध्ये ’एक है तो सेफ है..., ’बटेंगे तो कटेंगे’ ची घोषणा दिली. ते आता मुस्लिमांच्या घरात जाऊन ’सौगात’चे वाटप करणार आहेत. पण, हे ‘सौगात-ए-मोदी’ नसून ’सौगात-ए-सत्ता’ आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी येथे केली. सौगातमुळे हिंदुच्या मंगळसुत्राचे संरक्षण कोण करणार? असा सवाल करतानाच आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणार्‍या भाजपने आता हिंदुत्व सोडून द्यावे, असे थेट आव्हानही उद्धव यांनी यावेळी दिले.ईदच्या निमित्ताने भाजपकडून ’सौगात-ए-मोदी’चा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन यावर टीका केली.
 
लोकसभेत शिवसेनेला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केले आणि मुस्लिम समाज हा आमच्यासोबत येत असल्याचे समजताच यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांना मत दिले तर हा ’सत्ता जिहाद’ आहे असे बोलले गेले. पण, आता ’ईद’ च्या निमित्ताने ‘सौगात-ए-मोदी’ हा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे. यानिमित्ताने ३२ ते ३५ लाख मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी ३२ हजार भाजप कार्यकर्ते मुस्लिमांना अन्न देणार आहेत. हिंदुंना दंगलीसाठी वापरणार आणि हे मात्र सत्तेसाठी गळाभेटी घेत फिरणार, अशी चपराक लगावतानाच ‘सौगात’मुळे बनावट हिंदुत्ववाद्यांची कोंडी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 
नुकत्याच पार पडलेल्या अंदाजपत्रकी अधिवेशनावरही उद्धव यांनी जोरदार टिका केली. आताचे अंदाजपत्रक हे हताश आणि पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेले निरर्थक अंदाजपत्रक होते. ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी थापारुपाने मारल्या होत्या, त्याबद्दल कुठेही वाच्यता अंदाजपत्रकात नव्हती. ही अस्वस्थता, अपयश लपवणारे हे अधिवेशन होते, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. 
 
शिवसेना एकच, दुसरी गद्दार सेना 
 
• बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसत आहे. गेल्या वेळेला या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचे छायाचित्र वापरले; तसे सर्वांनाच बाळासाहेबांचे छायाचित्र वापरण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही, असे ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना एकच आहे, तर दुसरी गद्दार सेना आहे, ती ‘एसएनशी’ गद्दार सेना यांनी शिंदे गटाला लगावला.

Related Articles