म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का   

 

तीव्रता ७.७ रिश्टर स्केल; इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या
 
बँकाक : म्यानमार शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले. शेजारील थायलंडला याचे जोरदार धक्के जाणवले. बँकॉकमधील बांधकामाधीन एक उंच इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली. यात तीन जण ठार झाले असून अनेक जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. यासोबतच, मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. भारत, चीन, तैवान आणि बांगालादेशालाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
 
थायलंड आणि म्यॉनमारमधील अनेक शहरांतील इमारती अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये टॉवर्स कोसळले आहेत.समाज माध्यावर भूकंपाचे अनेक चित्रफिती फिरत आहेत. अनेक गगनचुंबी इमारती भूकंपाच्या धक्क्याने हलताना अथवा कोसळताना दिसत आहेत. तर अनेक इमारती झुकल्या आहेत. काही इमारतींवर जलतरण तलाव बांधण्यात आले होते. भूकंपाच्या धक्क्याने त्यातील पाणी धबधब्याप्रमाणे पडताना दिसत आहेत. बहुमजली इमारत कोसळल्यानंतर कित्येक दूर धूळीचा लोट पसरलेला दिसत आहे. तर, नागरिक जिवाच्या आंकाताने पळताना दिसत आहेत. 
 
भूकंपाच्या विध्वसांमुळे थायलंडमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मोठ्या इमारती कोसळल्यामुळे थायलंडमध्ये अनेक नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. 
 
म्यानमारला काल सकाळी बाराच्या सुमारास भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ नोंदवली गेली. त्यानंतर, दहा मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. याची तीव्रता ६.४ इतकी होती. पहिला भूकंप इतका शक्तिशाली होता की, त्याचे झटके शेकडो किलोमीटर दूरवरील थायलंडला जाणवले. 
 
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सांगाइंग शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर भूगर्भात १० किलोमीटर खोलवर होता. म्यानमारमध्ये अजूनही हलक्या स्वरुपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भूकंपामुळे म्यानमारमधील इरावती नदीवर बांधलेला प्रसिद्ध अवा पूल कोसळल्याचे वृत्त आहे. अनेक इमारतींना तडे गेले असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के भारतातील मणिपूर आणि मेघालयासह ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणवले. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात १५-२० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत म्यानमारच्या सर्वतोपरी मदतीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थिती पाहून मी चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करुयात. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या अधिकार्‍यांना तयार राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याबाबतही चर्चा केली आहे, असे मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
 

Related Articles