शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण   

पिंपरी : शेतातील कामे करण्यासाठी आळंदीतून पाच कामगारांचे अपहरण करण्यात आले. कामगारांना कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे शेतातील खोलीत दहा दिवस डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतली. आळंदी पोलिसांनी पाचही कामगारांची सुटका केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ते २५ मार्च या कालावधीत घडली.
 
या प्रकरणी नितीन भाऊसाहेब निंबाळकर (वय-३८), गणेश भाऊसाहेब निंबाळकर (वय-३५), भाऊसाहेब निंबाळकर (वय-५०, तिघे रा. दूरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोहन मारुती वगरे (वय-३०, आळंदी) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
मोहन वगरे, देवानंद सुभाष लांबटोंगळे (रा. यवतमाळ), पप्पू गणेशराव मगर (रा. हिंगोली), मुकुलकुमार डिसुझा (रा. उत्तर प्रदेश), श्रीराम बेंद्रे (रा. परभणी) हे कामाच्या शोधात आळंदी येथे आले होते. मागील काही महिन्यांपासून ते सर्वजण आळंदी येथे राहात होते. 
 
१४ मार्च रोजी आरोपी एका मोटारीतून आले. पाचही कामगार आळंदी येथील नगरपरिषद चौकात कामाच्या शोधात थांबले होते. आरोपींनी या कामगारांना काम असल्याचे सांगून मोटारीत बसवले. त्यानंतर पाचही कामगारांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे नेले. तिथे एका शेतातील खोलीत डांबून ठेवले. दिवसभर कामगारांकडून काम करून घेतले जात होते आणि रात्री डांबून ठेवले जात होते. त्यांच्या कामाचा कोणताही मोबदला दिला जात नव्हता.
दरम्यान, मोहन वगरे यांनी पत्नी आजारी असल्याने तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आरोपींकडे फोन मागितला. त्यावेळी मोहन यांना पत्नी जास्त आजारी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी गावी जाण्याची मागणी केली. मोहन पत्नीला पाहण्यासाठी आळंदीत आले असता त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना त्यांनी  आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ कर्जत येथे धाव घेत कामगारांची सुटका केली. आरोपींचा शोध सुरू आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत. 

Related Articles