चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार   

विजय चव्हाण

मुंबई : राज्यात ३० लाखांहून जास्त किमतीच्या ई-वाहनांवर कर लावण्याची घोषणा सरकारतर्फे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चारच दिवसांपूवी केली असली तरी लोकमानस लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि अधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन ती करवाढ मागे घेण्याचे निश्चित केले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सभागृहात बुधवारी दिली. तसेच, एसटी महामंडळाच्या सर्व बस टप्प्या-टप्प्याने अपारंपरिक इंधनावर परावर्तित करण्यात येणार आहेत. एसटीच्या बस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
 
आमदार उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. शशिकांत शिंदे, प्रविण दरेकर, अनिल परब, अमित गोरखे आणि मनीषा कायंदे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.फडणवीस म्हणाले की, एसटी महामंडळाकरिता ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी ४५० बस खरेदी केल्या आहेत. तसेच, एसटीच्या सध्याच्या बस एलएनजीमध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत. एलएनजी पुरवठा करण्यासाठी १० वर्षांचा करार करण्यात आला आहे.
 
राज्यात ईव्हीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्ही धोरण आणले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. यंदाच्या अंदाजपत्रकात ३० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या ईव्ही वाहनांवर ६ टक्के कर आकारण्याचे जाहीर केले आहे. परंतु, हा कर मागे घेण्याची घोषणा सभागृहात करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यावर धावणार्‍या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढला की, प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. तसेच, हिंजवडी परिसरातील होणारे प्रदूषण हे मुख्यतः वाहनांमुळे होत असून यासाठी मेट्रो आणि बसची कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात येत आहे. जास्तीत जास्त ईव्ही बस घेण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषणमुक्त असावी, असे सरकारचे धोरण असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
 
सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदारांनाही देण्यात येणार्‍या वाहन कर्जावरील व्याजदरात ईव्हीसाठीच सवलत देण्यात येईल. सर्व मंत्र्यांची वाहनेही ईव्हीमध्ये बदलण्याचे नियोजन आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
 

Related Articles