जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान   

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा ; सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख 

यांना आरोपीने व्हिडीओही पाठवले 

मुंबई, (प्रतिनिधी) : मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे जाणीवपूर्वक कारस्थान रचण्यात आले होते. या प्रकरणात गुंतवून संबंधित महिला व कथित यूट्यूबर तुषार खरात यांनी त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गोरे यांच्या बदनामीची चित्रफीत तयार केल्यानंतर ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रभाकरराव देशमुख यांना पाठविण्यात येत होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
 
आपण राजकारण करत असतो; पण, कोणाला जीवनातून उठवण्याचे राजकारण करणे योग्य नाही. त्या महिलेला खंडणी घेताना पकडले आहे. याची चौकशी होईलच; पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गृहमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. २०२२ ते २४ तुम्ही मला लक्ष्य केले. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा विक्रमी बहुमत आम्हाला दिले. कुठलीही घटना झाली की, काही लोक माझा सगासोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. कोणी माझा सगासोयरा असला तरी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल उत्तर दिले. अधिवेशन काळात जयकुमार गोरे यांच्यावर आरोप झाले होते. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, खरे तर हे प्रकरण २०१९ मध्येच संपले होते. तेव्हा ते आघाडीसोबत होते. पण, आता हे प्रकरण उकरून काढण्यात आले. त्यासाठी कारस्थान रचले गेले. संबंधित महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी लाच मागितली, पोलिसांची त्या बाबत खात्री पटल्यानंतर ट्रॅप लावला गेला, तिचे संभाषण टेप करण्यात आले. ती पकडली गेली. तुषार खरात हा कथित पत्रकार आणि अनिल सुभेदार यालाही अटक करण्यात आली. गोरेंविरुद्ध ज्यांनी कट रचला त्यात शरद पवार गटाचे लोक होते. त्याचे पुरावे आहेत. प्रभाकरराव देशमुख हे शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार, देशमुख यांच्याकडे गोरे यांच्या बदनामीची चित्रफीत जाहीर करण्याआधी जात असे. आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाही याचे भान ठेवा, या सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.
 
हल्ली काही घडले की त्याचा संबंध गृहमंत्री असल्याने माझ्याशी जोडला जातो, माझे सगेसोयरे आहेत असे सांगितले जाते. पण मी एकच सांगतो, की संविधान माझे सगे आहेत आणि राज्यातील १३ कोटी जनता हेच माझे सोयरे आहेत. माझा कोणी कितीही जवळचा अपराधी असेल तर त्याला सोडणार नाही, असेही  त्यांनी ठणकावले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍यांना माफी नाही  

छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सर्वांचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल अवमानस्पद भाषा वापरणार्‍यांना सोडले जाणार नाही. प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणातून अटक करण्यात आली. तो कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या घरात सापडला हे सांगू का? असे विचारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनाच गर्भित इशारा दिला.
 

Related Articles