हिंजवडी पोलिसांनी वाहतूक कंपन्यांची घेतली बैठक   

चालकांबाबत विशेष खबरदारी बाळगण्याची सूचना

पिंपरी : हिंजवडी येथे घडलेल्या वाहतूक बस जळीत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिस ठाण्याने हिंजवडीतील आयटी कंपन्यांना वाहतूक सेवा पुरविणार्‍या कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून बैठक घेतली. चालकाचे मानसिक आरोग्य सांभाळा, चालकाच्या वर्तनातील बदल ओळखायला शिका, आगीची किंवा इतर अपघाताची घटना घडल्यास काय खबरदारी बाळगावी याचे प्रशिक्षण द्यावे, अशा प्रकारच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
 
हिंजवडी येथे बुधवारी एका कंपनीच्या मिनी बसला आग लागून चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तसेच सहा जण गंभीर जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात चालकानेच जुन्या रागातून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. हिंजवडी परिसरात शेकडो आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. तीन शिफ्टमध्ये या कंपन्यांचे काम चालते. त्यामुळे कर्मचार्यांना प्रवासासाठी वाहतूक कंपन्यांकडून किंवा कपंनीच्या स्वत:च्या वाहनांद्वारे प्रवासी सेवा पुरविली जाते. बुधवारी घडलेल्या घटनेमुळे या वाहनांमधून प्रवास करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी वाहतूकसेवा पुरविणार्‍या कंपनींच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला ३५ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
कर्मचार्‍यांशी संवाद वाढवा
 
वाहतूक सेवा पुरविणार्‍या कंपन्यांचे चालक तसेच आयटी कंपन्यांच्या अस्थापनेवरील चालक हे दररोज वाहन चालवत असतात. पुणे ते पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांचा दररोजचा प्रवास असतो. शहरातील वाहतूक कोंडीतून त्यांना वाहन चालवावे लागते. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा मोठ्या वाहनचालकांना इतर वाहनचालकांचे बोलणे खावे लागते. अनेक दुचाकीचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत मोठ्या वाहनचालकांच्या समोर अचानक दुचाकी आडवी घालणे, कट मारणे असे प्रकार करतात. त्यामुळे मोठ्या वाहनांवरील चालकांची चिडचिड होते. तसेच अनेक चालकांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार असतात. त्याचाही त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या परिस्थितीमध्ये जर कंपनी व्यवस्थापन किंवा इतर कर्मचार्यांशी चालकाचे वाद असतील, तर मोठी घटना घडू शकते. त्यामुळे वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या चालकासोबत सातत्याने संवाद साधायला हवा. त्याच्या समस्या, अडीअडचणी समजून घ्याव्यात, असे या बैठकीत सांगण्यात आले.
 
पोलिसांनी दिलेल्या सूचना
 
*चालकाचे मानसिक आरोग्य सांभाळणे
* चालकाच्या वर्तनातील बदल ओळखणे
* कर्मचारी, चालक, वाहक यांच्यासाठी समुपदेशन शिबिर आयोजित करणे
* कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करणे
* एखादा अपघात झाल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण द्यावे
* वाहन, कंपनीतील अग्निशमन यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे
* कोणत्याही अपघाताची शक्यता वाटल्यास वाहन रस्त्याच्या कडेला थांबविण्याची सूचना देणे
* वाहनातील एमर्जिन्सी डोअर, विंडो सुस्थितीत असल्याची खात्री करावी
 
यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेय्या थोरात म्हणाले, हिंजवडी येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सेवा पुरविणार्‍या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला. त्यांना चालकाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. तसेच कंपनीतील कर्मचारी, चालक यांच्याशी संवाद वाढविण्यास सांगण्यात आले. हिंजवडी हे मोठे आयटी पार्क असून येथे हजरोंच्या संख्येने कर्मचारी काम करतात. या कर्मचार्यांच्या सुरक्षीतेसाठी काय उपापयोजना करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related Articles