राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही   

राज्यरंग, भागा वरखडे 

धनंजय  मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तरी विरोधक स्वस्थ बसणार नाहीत.  आमदार सुरेश धस, अंजली दमानियाही कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांचा पाठपुरावा सोडणार नाहीत. वाल्मिक कराडची  चौकशी होत आहे. हार्वेस्टर अनुदान गैरव्यवहारांच्या आरोपांचीही  चौकशी होऊ शकते. त्यामुळे राजीनामा देऊनही मुंडे यांची सहज सुटका होणार नाही.
 
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात बीड जिल्ह्यामधील एक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत राहिले. कालौघात लोकक्षोभ कमी होऊन अशी प्रकरणे शांत होत असतात, पण या प्रकरणी असे काही घडले नाही. प्रकरण तापले. या निमित्ताने पहायला मिळालेला नृशंस हिंसाचार हादरवणारा  ठरला . त्यातूनच सरकार दबले आणि अखेर प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी सख्य राखून असलेले धनंजय मुंडे यांना अपमानास्पद पध्दतीने राजीनामा द्यावा लागला. 
 
लोकसभेत खासदार बजरंग सोनवणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा लावून धरला होता. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना देशमुख खून प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड नागपूरला येऊन गेला होता. या हत्येची  सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याचे कारण बीडमधील बहुतांश पोलिस अधिकारी कधी ना कधी कराडच्या मांडवाखालून गेले होते. कराडचा संपर्क, त्याची उठाठेव आणि त्याला असलेला मुंडे यांचा वरदहस्त यामुळे पोलिसांचे हात जणू बांधले गेले होते.  सुरेश धस यांनी  या प्रकरणात ज्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि पुराव्याची साखळी उभी केली, त्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. बीडच्या जिल्हा पोलिस प्रमुखांची तडकाफडकी बदली करण्यात आली. एवढ्या गंभीर प्रकरणानंतर बीडची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आली. केवळ कराडची पाठराखणच नाही, तर बीड जिल्ह्यातील अनेक कामांमध्ये गैरव्यवहार, कृषी खात्यातील गैरप्रकार  मुंडे यांची पाठ सोडायला तयार नव्हते. . देशमुख खूनप्रकरणी कराडचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले जात होते; परंतु खुनाचा सूत्रधार तोच असल्याचे स्पष्ट झाले. प्रति पालकमंत्री म्हणून मिरवणारा, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता करणारा आणि मुंडे यांच्याशी भागीदारी असणारा कराड अखेर अडकला.ज्या निर्घृण पद्धतीने देशमुख यांची हत्या केली गेली, त्याचे  वर्णन आमदार सुरेश धस आणि देशमुख यांची मुलगी वैभवी हे करत होते. ते अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे सांगितले जात होते; परंतु प्रत्यक्षात देशमुख याच्या मारहाणीची छायाचित्रे  ‘सोशल मीडिया’वर प्रसिदद्ध झाली तेव्हा संतापाची आग पेटली आणि या आगीत मुंडे यांचे मंत्रिपद स्वाहा झाले. त्यांच्या पत्नी करुणा यांनी दोन दिवस अगोदरच धनंजय यांचा राजीनामा झाला आहे. चार तारखेला त्याची घोषणा होईल, असे सांगितले होते. झालेही तसेच. 
 
देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ‘सीआयडी,’ ‘एसआयटी’ने कराडचा ज्या पद्धतीने तपास केला, त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याच्यावर ‘मकोका’ लावला आणि आरोपपत्रात तोच देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे म्हणणे मांडले, त्या मुळे मुंडे यांना आणखी काळ मंत्रिपदी ठेवणे म्हणजे सरकारची प्रतिमा मलीन करणेच होते. महाराष्ट्रातील मुंडे यांच्या प्रतापाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घ्यावी लागली. एका मंत्र्यासाठी संपूर्ण सरकारला वेठीला धरणे, मंत्र्यांची पाठराखण करताना भाजपचीही प्रतिमा मलीन होणे परवडणारे नव्हतेच. याखेरीज मुंडे हे  कृषी  खात्याचे मंत्री असताना पीक विमा तसेच अन्य गैर व्यवहार झाले. त्यावरून सरकारवर आरोप झाले. मंत्रिमंडळाची बैठक झाली नसताना ती झाल्याचे दाखवून निर्णय घेऊन राबवले  गेल्यामुळे त्यांची कारकीर्द वादाच्या भोवर्‍यात सापडली. या सर्व प्रकारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी होत होती. एका समाजाच्या मतांसाठी आणखी किती तडजोड करायची, हा मुद्दा होता. त्यात देशमुख हत्या प्रकरणात कराडचा सहभाग पक्का होत गेला. हे बाहेर आले, तेव्हा अजितदादांनी अप्रत्यक्षपणे मुंडे यांना राजीनामा द्यायचा संकेत दिला; परंतु त्यांनी तो मानला नाही. मुंडे यांचे समर्थन करणार्‍या नामदेव शास्त्री आणि प्रा. लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत काय झाले, हे सर्वज्ञात आहे. देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. आणि मुंडे अडचणीत आले. संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपपत्रात कराडला मुख्य सूत्रधार म्हणून नमूद करण्यात आले आहे. कराड याने ‘अवदा कंपनी’च्या भू-संपादन अधिकार्‍याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. देशमुख यांनी या खंडणीला विरोध केल्यामुळे हत्या करण्यात आली. आरोपींच्या फोनमधील व्हिडिओ आणि फोटोमधून या हत्येची क्रूरता उघड झाली आहे. हत्येचे फोटो सार्वजनिक झाल्यानंतर फडणवीस यांनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याचे समजते. रात्री उशिरा फडणवीस आणि अजित  पवार यांच्यामध्ये तब्बल दीड तास बैठक झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाशी मुंडे यांचा संबंध जोडला जात असल्याने राज्य सरकारची बदनामी होऊ लागल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात होती. भाजप, महायुती आणि जनहितासाठी राजीनामा घेणे महत्त्वाचे आहे, या मुद्द्यावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री फडणवीस सक्षम आहेत, असे दाखवण्यासाठी राजीनामा घेतला गेला. फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. पोलिस विभागाने त्यांना या संदर्भात काही माहिती दिली असेल, याशिवाय कृषी गैरव्यवहाराच्या  आरोपांवर कृषी विभागाच्या सचिवांनी त्यांना काही पुरावे दिले असतील तर ते निश्चितच निर्णय घेतील, असे सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे याबाबत पुरेसे बोलके ठरते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशुद्ध चारित्र्याचा मुद्दा उपस्थित करून राजीनामा देण्यास सुचवले होते, हे ही दखलपात्र.
 
राज्य सरकारने मुंडे यांचा राजीनामा घेऊन आता इभ्रतीचा अधिक पंचनामा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. मुंडे यांनी  राजीनामा दिला असला, तरी देशमुख यांच्या समर्थकांनी ज्या पद्धतीने दबाव वाढवत नेला, ते पाहता ते स्वस्थ बसतील, असे वाटत नाही. अलिकडेच करुणा मुंडे प्रकरणात न्यायालयाने एक निकाल देताना धनंजय मुंडे यांना करुणा यांना  दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. मुंडे यांनी या निर्णयाला आव्हान दिले असले तरी करुणाही शांत बसणार्‍यांपैकी नाहीत. दमानियाही कृषी खात्यातील गैरव्यवहाररांचा पाठपुरावा  सोडणार नाहीत.  धस यांनी कृषी खात्यातील गैरव्यव्वहार उघडकीस आणले. कराड याच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले असून त्याच्याविरोधात आता ज्ञात संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती जमवण्याबद्दल चौकशी सुरु होऊ शकते.  ‘ईडी’, ‘सीबीआय’ चौकशीची मागणी यापूर्वीच झाली आहे. हार्वेस्टर अनुदान गैरव्यवहरातील तील फिर्यादीचीही  चौकशी होऊ शकते. हे सर्व मुंडे यांच्याभोवती संशयाचा भोवरा आणखी निर्माण करणारे आहे. त्यामुळे राजीनामा दिला, तरी त्यांना स्वस्थ बसता येणार नाही. करुणा यांचा एक अर्ज  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा समोर आहे. त्याची सुनावणी  याच महिन्यात होणार आहे. गुन्हे आणि आरोपांची संख्या अधिक असल्याने मुंडे यांना आणखी तपासाला व  असंतोषाला तोंड द्यावे लागणार आहे.

Related Articles