मोसम ‘आयपीएल’चा   

मडविकेट, कौस्तुभ चाटे 

इंडियन प्रिमियर  लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा  आता वयात आली आहे. २००८ मध्ये सुरु झालेल्या या क्रिकेट लीगने आता १८ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. कालपासून सुरु झालेल्या आयपीएल २०२५ चे हे १८वे वर्ष. आता  ही लीग क्रिकेट रसिकांच्या अंगवळणी पडली आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की मार्च ते मे हे दोन महिने भारतात क्रिकेटचा हंंगाम सुरु होतो. क्रिकेट रसिकांसाठी हे दोन महिने म्हणजे पर्वणीच असते. साधारण ६०-७० सामने, ८-१० संघांमधली लढाई, देशोदेशीचे खेळाडू भारतीय हवामानात आणि खेळपट्ट्यांवर आपले कसब दाखवणार, देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक खेळाडू आपले नशीब आजमावणार आणि एकूणच दीड-दोन महिने क्रिकेटचा धुमाकूळ असणार याची आता आपल्याला सवय झाली आहे. आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा ही लीग इतकी मोठी होईल याचा विचार कोणीही केला नसणार. पण आयपीएलने क्रिकेट जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अर्थात यामागे भारतीय  क्रिकेट नियामक्क मंडळ (बीसीसीआय) या सारखी मोठी संस्था खंबीरपणे, प्रसंगी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची देखील विकेट काढून, उभी आहे म्हणूनच हे शक्य आहे. क्रिकेट, उद्योगजगत आणि चित्र्त्रपटसृष्टी यांचा अनोखा मिलाफ असलेल्या आयपीएलने भारतीय क्रिकेटला बरेच काही दिले आहे, काही चांगले आणि काही वाईट देखील. पण एक गोष्ट आता कोणीही नाकारू शकत नाही, ते म्हणजे आयपीएलने घेतलेली झेप  आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमाण अजून कमी होऊन, इतर लीग्स आणि आयपीएलचे प्रस्थ अजूनच वाढले तर नवल वाटायला नको. गेल्या १८ वर्षांमध्ये आयपीएलने अनेक गोष्टी बघितल्या. खेळाडूंची भांडणे, मैदानावर झालेली वादावादी, प्रशिक्षक , कप्तान आणि पंच यांच्यामधील वाद, संघमालकांमधील वाद, सामन्यांचीनिकाल निश्चिती( मॅच फिक्सिंग), संघांवर बंदी, नवीन संघ स्पर्धेत उतरणे, संघमालकाने कप्तानाची मैदानावरच शाळा घेणे, एका देशासाठी खेळत असलेल्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळताना आपल्याच साथीदारांवर आगपाखड करणे अशा अनेक गोष्टी घडल्या, पुढे देखील घडतील. पण एक गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही ते म्हणजे आयपीएलने भारतीय क्रिकेटला अजूनच मोठे केले. आज भारतीय क्रिकेटचा क्रिकेट विश्वात दबदबा आहे तो केवळ आपल्या खेळामुळे नाही तर बीसीसीआय आणि आयपीएलने निर्माण केलेल्या मोठ्या प्रतिमेमुळे. 
 
एक छोटेसे उदाहरण म्हणजे, काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा संघ टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेला आहे. पाकिस्तानी खेळाडूंना तर आयपीएल संघांमध्ये स्थान नाही, पण न्यूझीलंडचे खेळाडू मात्र दरवर्षी आयपीएल संघांत असतात. याहीवेळी ते आहेतच. पण या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांसाठी न्यूझीलंडने आपला दुय्यम संघ जाहीर केला आहे. आणि हे प्रत्येकवर्षी होते. न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्टइंडीज सारख्या संघांमधील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्राधान्य देतात. अर्थात त्यामागे त्यांना मिळणारे पैसे हे मोठे कारण आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. 
 
आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा या लीगकडे ’पेड हॉलिडे’, अर्थात पगारी सुट्टी म्हणून बघितलं गेलं. अनेक खेळाडूंसाठी पैशांची दारे उघडी झाली. प्रायोजक, जाहिरातदार, प्रसारणाचे हक्क  यामुळे पैसा दिसू लागला. त्यातच मोठमोठे उद्योगपती आणि चित्रपट  सितार्‍यांनी संघ विकत घेऊन त्यात ग्लॅमरची ’फोडणी’दिली.  या पैशानेच प्रेक्षकांना मैदानावर आणि टीव्हीसमोर खिळवून ठेवले. साधारण १९९० च्या दशकाच्या मध्यावर भारतीय क्रिकेटमध्ये पैसा यायला सुरुवात झाली. आपला खेळ देखील प्रोफेशनल होऊ लागला आणि त्याचे परिणाम खेळाडूंवर देखील दिसू लागले. काही खेळाडू पैशांच्या हव्यासापोटी वाहत गेले तर काहींनी मात्र त्या मिळणार्‍या पैशांचा योग्य वापर केला. साधारण १२-१५ वर्षे हे गणित, इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच क्रिकेटमधील पैसे देखील वाढत होते. पण आयपीएल आल्यानंतर मात्र खेळाडूंना पैशांची मोठी स्वप्ने दिसू लागली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही हजार आणि प्रसंगी लाखभर रुपये मिळवणारे खेळाडू आता करोडोंमध्ये खेळताना दिसू लागले. अर्थात प्रत्येकाच्याच बाबतीत हे झालं असं नाही. पण आता खेळाडूंना त्या करोडो रुपयांची स्वप्ने दिसू लागली होती. एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही, ती म्हणजे आजच्या घडीला अनेक क्रिकेटपटूंना या लीगमुळे आर्थिक, सामाजिक स्थैर्य मिळाले हे देखील महत्वाचे आहे.   याही वर्षी ही स्पर्धा  चुरशीने खेळवली जाईल आणि पुढील २ महिने रोज हा क्रिकेटसंग्राम आपल्या समोर असेल. यावर्षीच्या स्पर्धेत जुने संघ आणि नवीन कप्तान अशी वेगळी  समीकरणे दिसणार आहेत  लखनौ, पंजाब, दिल्ली, बंगलोर सारख्या संघांना नवीन कप्तान लाभले आहेत तर कोलकाता संघाने अनुभवी अजिंक्य राहणेवर विश्वास ठेवला आहे. पंजाब संघाने श्रेयस अय्यर कडे धुरा दिली आहे तर लखनौच्या संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करेल. बंगलोरकडे विराट कोहली सारखा लिजंड असतानाही त्या संघाने कप्तान पदासाठी  रजत पाटीदारची निवड केली आहे, तर दिल्ली संघाचे नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे.एकूण  भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमण होते आहे काय असा विचार मनात येतो. याबरोबरच संजू सॅम्सन, हार्दिक पंड्या, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड सारखे एक-दोन हंगामात  कप्तानी सांभाळलेले आणि पॅट कमिन्स सारखा विश्वविजेता कर्णधार कशी कामगिरी करतो हे देखील बघावे लागेल. 
 
आयपीएलने दर वर्षी आपल्याला नवनवीन खेळाडू दिले आहेत. आज आयपीएल हा यशाचा महामार्ग ठरत आहे. कारण त्याची लोकप्रियता क्रिकेटच्या इतर कोणत्याही प्रकारामधील कोणत्याही स्पर्धेपेक्षा कैक पटीने मोठी आहे. एक आयपीएल सिझन गाजवला तर त्याचा गाजावाजा खूपच मोठा होतो हे देखील खेळाडूंना माहीत आहे. त्यामुळे या मिळणार्‍या संधीची सर्वच खेळाडू वाट बघत असतात. मुळात टी-२० हा वेगवान आणि रोमांच घेऊन येणार प्रकार आहे. त्यात आयपीएलमध्ये खेळाडूंवर एक वेगळंच प्रेशर असतं, अशावेळी एक चांगली खेळी खेळाडूची कारकीर्द बदलून टाकू शकते. यामुळेच क्रिकेटपटू देखील या मिळणार्‍या संधीचे सोने कसे होईल त्याकडे लक्ष देतात. क्रिकेटविश्वात आयपीएल नंतर अनेक लीग्स सुरु झाल्या. त्यातील काही लीग्स अजूनही जेमतेम टिकून  आहेत पण काही बंद देखील झाल्या. आज आयपीएल बरोबरच ऑस्ट्रेलियाची बिग बॅश, इंग्लंडची द हंड्रेड आणि दक्षिण आफ्रिकेची एसए टी-२० या लीग्सचे महत्व वाढले आहे. आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे देखील वेगळ्या नजरेतून बघते आहे. दरवर्षी होणार्‍या आयसीसीच्या वेगवेगळ्या स्पर्धा देखील होत आहेत. पण त्यातही आयपीएल सारख्या स्पर्धेकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असते यामध्येच या स्पर्धेचे यश आहे. २०२५ ची स्पर्धा आत्ताच सुरु झाली आहे आणि येणार्‍या २ महिन्यांमध्ये हा क्रिकेटचा मोसम अजूनच बहरून येईल हे नक्की.   

Related Articles