अर्ज करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार वसतिगृह   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणार्‍यांमध्ये पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या लक्षात घेऊन भविष्यात अर्ज करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी गेस्ट सुविधा सुरू केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
 
पुणे विद्यापीठात राज्यभरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था असून विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता वसतिगृहे अपुरी पडत असल्याचे दिसून आले. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढणार असल्याने विद्यापीठ प्रशासनाने नविन वसतिगृहे उभारली आहेत. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अद्वैत बंबोली यांनी विद्यापीठातील वसतिगृह सुविधेसाठी किती विद्यार्थी अर्ज करतात? यासाठीचे निकष कोणते? असे प्रश्न अधिसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत विचारले आहेत. बर्‍याचदा निकषानूसार पात्र असून देखील वसतिगृह मिळाले नसल्याची तक्रार विद्यार्थी करतात. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर यांनी वसतिगृहाच्या प्रश्नाला उत्तर दिले.
 
मंठाळकर म्हणाल्या, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये १ हजार ३३ मुली व १ हजार १०७ मुलांनी वसतिगृह सुविधेसाठी अर्ज केले होते. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांपैकी ८१९ मुली व ७८६ मुलांना वसतिगृहाची सुविधा दिली आहे. वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी गेस्ट सुविधा सुरू केलेली आहे. गेस्ट सुविधेची मागणी करणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा दिली आहे. वसतिगृह देताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता व राज्य शासनाने नेमून दिलेल्या सामाजिक आरक्षणानूसार निकष लावले जातात. दरवर्षीची मागणी लक्षात घेऊन वसतिगृह क्र. १० हे लवकरच विद्यार्थ्यांना वाटपासाठी उपलब्ध होणार आहे. या वसतिगृहाची क्षमता ६०० इतकी आहे. तसेच स्थावर विभागामार्फत रिसर्च स्टुडंट होस्टेल अ व ब या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आलेले आहे.मुलींच्या वसतिगृृह क्र. एल-१० या वसतिगृहाची क्षमता २६० इतकी होती. सद्यस्थितीत या वसतिगृहामध्ये जास्तीचे तीन मजल्याचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. या वसतिगृहात मुलींसाठी २०० अतिरिक्त निवास व्यवस्था होणार आहे. 
 
पुणे विद्यापीठात १ हजार २७ सीसीटीव्ही
 
पुणे विद्यापीठ परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १ हजार २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी १ हजार २७ कॅमेरे सुस्थितीत असून सरासरी ३० दिवसांचा बॅकअप उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीप पालवे यांनी दिली. अधिसभा सदस्य विजय सोनवणे यांनी कॅमेर्‍याच्या सुविधेबाबत प्रश्न विचारला होता. विद्यापीठात बर्‍याचदा हिंसक आंदोलने, मोर्चा आणि मारामारीच्या घटनांमुळे सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमरे बसविणे आवश्यक झाले आहे. वसतिगृहात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॅमरे गरजेचे आहेत. तसेच नादुरूस्त असलेले २०८ कॅमरे तातडीने दुरूस्त करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

Related Articles