पिकांचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सुविधा देणार : जिल्हाधिकारी   

पुणे : केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेल बियावर्गीय सूर्यफुल व करडई या पिकांचे लावडी खालील क्षेत्र वाढविणे, निर्यातक्षम उत्पादन घेणे, उत्पादन वाढविणे तसेच मूल्यवर्धन तथा खाद्य प्रक्रियेची व्यवस्था करून निर्यातीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सर्व घटकंना सोबत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या सर्व सुविधांसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करून तसेच जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 
जिल्ह्याचा समग्र कृषी विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालय (शिवाजीनगर) येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, कृषी उपसंचालक एस.एस. विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी, बारामती नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, शेतकरी उत्पादन कंपन्या, कृषी निर्यातदार कंपन्याचे प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
 
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, केळी पिकाचे जिल्ह्यात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, ते आगामी वर्षात ३ हजार हेक्टर पर्यंत नेण्याचे तसेच प्रति हेक्टरी उत्पादनातही वाढ होण्याच्या दृष्टीने लक्ष्य ठेवावे. त्यासाठी केळी लागवडीसाठी इच्छूक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणे, त्याचे प्रशिक्षण आयोजित करणे, दर्जेदार रोपे पुरविणे, पाण्याची व्यवस्था, मातीचे आरोग्य, जैविक, आरक्षित खते, औषधे आदि निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरण तसेच पीक निहाय उत्कृष्ट उत्पादन पद्धती, लागवडी पूर्वीची पिकाच्या काढणी पूर्वीची आणि काढणी पश्चात प्रक्रिया आदिबाबतच्या तंत्राचा शेतकर्‍यांना लाभ कसा मिळेल आदिचा समावेश प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात यावा. याच पद्धतीने अंजीर, आंबा आदिवरी लक्ष केंद्रीत करावे.
 
शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यामार्फत लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची व्यवस्था, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्राने समन्वयाने करावी. शेतकर्‍यांचे या पिकांच्या अनुषंगाने पीकनिहाय दोन दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या ठिकाणी ७ एप्रिलपासून आयोजित करावे, असे सांगून डुडी म्हणाले, केळीसह पिकांची दर्जेदार रोपे शेततळ्यासाठी मनरेगातून निधी उपलब्ध करून दिला जाईल.यावेळी डुडी यांनी उपस्थित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदा, प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी आदिंना विविध सूचना केल्या या सूचना व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांना आवश्यक सुविधांचे प्रस्ताव कृषी विभागांकडे देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

Related Articles