वाचक लिहितात   

आश्वासने कशी पूर्ण करणार?
 
‘कल्पनेचाही खडखडाट’ हे संपादकीय (केसरी दि.१२ मार्च) वाचले. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानिमित्ताने शाब्दिक फुलोरा फुलवत अनेक भव्य दिव्य घोषणांचा उल्लेख तर केला; परंतु त्या विषयीच्या तरतुदींचा साधा उल्लेखही केला नाही. आपल्या राज्याची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता यापेक्षा अधिक काही त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतेच! जेव्हा सांगण्यासारखे फार काही नसते, तेव्हा खूप शब्द वापरले जातात आणि जेव्हा खूप काही सांगायचे असते तेव्हा मोजकेच शब्द पुरतात, अशा आशयाच्या वचनाची आठवण मात्र यानिमित्ताने झाली. अजित पवार यांनी तब्बल ४५ हजार ८९१ कोटी रुपये तुटीचे अंदाजपत्रक सादर केले असून ही तूट गतवर्षीच्या दुपटीहून अधिक आहे आणि यामागे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या लोकानुनयी योजना कारणीभूत आहेत. अर्थमंत्र्यांनी ज्या काही घोषणा केल्या आहेत त्या जुन्याच आहेत. त्यातून कल्पकतेचा अभाव आणि राजकीय गरजांचा प्रभावच तेवढा दिसून येतो. सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन, निवृत्ती वेतन, राज्यावरील कर्जाच्या व्याजाची परतफेड, इतर अनुदाने, सरकारी मदत या स्वरुपातील खर्च लक्षात घेता ६५ टक्के रक्कम सरकारवरच खर्च होते;  उर्वरीत ३५ टक्के रकमेवर ’महाराष्ट्र आता थांबणार नाही!’ या घोषवाक्याची पूर्तता कशी होणार हा एक लाख मोलाचा प्रश्न आहे.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 
 
भारताचा दबदबा
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मॉरिशस दौर्‍यावर गेले असता त्यांना मॉरिशचे पंतप्रधान रामगुलाम यांच्या हस्ते मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द इंडियन ओशन’ हा दिला गेला. या सन्मानाने गौरव प्राप्त करणारे मोदी हे पहिलेच भारतीय आहेत. मोदींना एकूण २१ पुरस्कार मिळालेले आहेत. पंतप्रधान मोदींना पुरस्कार म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव... असे म्हटले तर योग्य ठरेल. आज भारत जगात तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. आज भारताचा जगात खूपच दबदबा आहे, त्याचे हे प्रतीक आहे.
 
शांताराम वाघ, पुणे 
 
अपप्रवृत्तीमुळे सणाला गालबोट
 
होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे. सर्वांनी एकत्र येणे हा याचा उद्देश. बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते; मात्र गेल्या काही वर्षात या सणामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तीमुळे या सणाचे पावित्र्य लोप पावले आहे. होळीचा सण साजरा करताना धांगडधिंगा घातला जातो. धुलीवंदनाच्या दिवशी तर एकमेकांना गुलाल लावण्याऐवजी रसायन मिश्रित रंग लावले जातात. पाण्याचा अपव्यय केला जातो. धुलीवंदनाच्या दिवशी मद्यपान करण्याची नवीनच फॅशन निर्माण झाली आहे. मद्यपान करून नृत्य करताना बर्‍याचदा वाद होतो. वास्तविक होळी आणि धुलीवंदन हे अतिशय पवित्र सण आहेत; मात्र या अपप्रवृत्तीमुळे या सणाला गालबोट लागत आहे.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
हेडिंग
 
सध्या तरुणाईमध्ये सायलेन्सर काढून गाड्या पळविण्याचे वेड लागले असल्याचे दिसून येते. हा सारा प्रकार वाहतूक पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात असतात. प्रामुख्याने यामध्ये बुलेट दुचाकीचा आवाज तर कर्णकर्कश, कानठळ्या हृदयात धडकी बसवणारा असतो. वास्तविक सायलेंसर काढून दुचाकी चालविल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात निघतो. सध्या सरकार, सेवाभावी संस्था, सामजिक संघटना प्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करत असताना असली हुल्लडबाजी करणारे महाभाग अनेकांना त्रासदायक ठरतात. यामध्ये वयोवृध्द, गरोदर महिला, अभ्यास करणारे विद्यार्थी, रुग्ण यांना तर या आवाजाचा धक्काच बसतो. आज झपाट्याने प्रदूषण वाढत आहे. श्वास घेणे मुश्किल झाले असून नको त्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात जीवन जगणे कठीण झाले असताना प्रदूषण वाढीस हातभार लावणार्‍या विघ्नसंतोषी, हुल्लडबाजी करणार्‍या तरुणाईवर वेळीच वाहतूक पोलिसांनी कायदेशीर कारवाई करुन पुन्हा असला प्रकार करायला धजावणार नाहीत असली कडक शिक्षा करावी.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  
 
महामार्ग केव्हा पूर्ण होणार
 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. गेल्याच महिन्यात २० फेब्रुवारी २०२५ रोजी बांधकाम मंत्र्यांनी याच महामार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, की मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून युद्धपातळीवर ते पूर्ण केले जात आहे. मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुंबई-गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यावेळी बांधकाम मंत्र्यांनी सांगितले होते. अवघ्या २० दिवसांतच त्यांना आपले विधान का बदलावे लागले? तसेही गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण होण्याचे नाव काही घेत नाही. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून नवीन कालमर्यादा देण्यात येते. आताही तेच झाले आहे. यावेळी तरी जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत असेल का? शंकाच आहे.
 
दीपक गुंडये, वरळी.

Related Articles