सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या   

नागपुरमधील हिंसाचार

नागपूर : नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम शमीम खान याच्या मुसक्या बुधवारी पोलिसांनी आवळल्या. तर, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, हिंसाचारानंतर बिघडलेली परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र, संवेदनशील भागात संचारबंदी सुरू आहे, असे पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी सांगितले. पण, त्याचवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी शिथील करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. 
 
नागपूर हिंसाचाराचा आता विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) समांतर तपास केला जाणार आहे. सध्या नागूपर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० जणांना अटक केली असून, या सर्वांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शाळा आणि महाविद्यालये कालही बंद ठेवण्यात आली होती. मेट्रो आणि राज्य परिवहन सेवा सुरू करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या सेवा अंशतः सुरू करण्यात आल्या आहेत.फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष आहे. हिंसाचार उफाळून येण्यास तोच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यानेच गर्दी जमवली आणि जमावाची माथी भडकवली होती, अशी माहितीही समोर आली आहे. फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता. त्याने नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली होती. 
 
सोमवारी रात्री नागपूरच्या महाल परिसरासह अनेक भागात हिंसाचार झाला होता. समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ केली होती. समाजकंटकांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३३ कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर, कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे.संवेदनशील भागात २,००० हून अधिक सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून संवेदनशील भागात नजर ठेवली जात आहेत. शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
छत्रपती संभाजीनगरमधील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर, सायंकाळी साडेसातच्या सुमारास महाल परिसरातील चिटणीस पार्कमध्ये हिंसाचार उसळला होता. शहरातील अन्य भागातही हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात जमावाने अनेक वाहने, घरे आणि रुग्णालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles