संतोष देशमुख हत्या, जातीयवाद, गुन्हेगारी आणि राजकारण   

समाज मनाचा कानोसा , सुरेश कोडीतकर 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. राजकीय वैर, मतांची स्पर्धा हे राज्याला नवे नाही. पण आता या वादातून थेट क्रूर हत्या हे टोक गाठले जाणे हे मानवतेला लज्जित करणारे आहे. बीड जिल्ह्यात आज जे काही चालले आहे ते गेल्या अनेक वर्षातील गैर कारभाराचा परिपाक आहे. अराजक एक दिवसात माजत नसते. त्याची एक साखळी असते. एकातून दुसरे, आणि दुसर्‍यातून तिसरे असा त्याचा बेकायदेशीर कामांचा पसारा असतो. 
 
दादागिरीला राजाश्रय, खंडणीखोरीला अभय, लुटालूटीला संरक्षण हे जर सत्तेच्या आधाराने केले जात असेल तर ती बेबंदशाही आहे. आणि याहीपुढे जाऊन  जर दोन जातीत वैरभाव दृढ केला जात असेल तर ते सामाजिक एकोप्याला चूड लावणारे आहे. बीड जिल्ह्यात काहीशी अशीच परिस्थिती आहे. समाजात भेदभाव निर्माण न होणे, कायद्याचे राज्य प्रस्थापित होणे, सगळ्यांना समान वागणूक मिळणे, नियमांचे पालन होणे, याची चोख व्यवस्था शासन, प्रशासन यांनी पाहायची असते. पण अव्यवस्था, अयोग्य, अनाचार याकडे जर नामदार दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्या बाहुबली यांच्या दडपशाहीला समर्थन देत आहेत, असे मानले जाणे स्वाभाविक आहे. कष्टाने धन कमावणे याला कोणाची ना असायचे कारण नाही. पण सत्ता, गुंडगिरी, पिस्तौल याचा आधार घेऊन गैरमार्गाने अन्याय, अत्याचार करून पैसा लुटणे हे तळतळाट, वैमनस्य, धुमसणारा प्रतिशोध याला जन्म देत असते. आज बीडमध्ये हेच घडलेले आहे. आणि आता झालेला राजीनामा हा या अंताचा आरंभ ठरणार आहे का ?
 
सत्ता ही समाजसेवा आणि समाजकार्याचे साधन आहे. सत्ता हा मलिदा कमावण्याचा मार्ग नाही. आपल्या नावाआड आणि छत्रछायेखाली जर गुंड आणि दांडगे समाजाला घाबरवत असतील तर त्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे होत्या. ते झाले नाही. त्यामुळे त्यांना राखले आणि पोसले आहे असा समज दृढ झाला. समाज म्हणजे सर्व जातीधर्माचे लोक. कोणी उच्च नाही, कोणी निम्म नाही. सारे समान. पण बीड जिल्ह्यात एकाच समाजाला प्राधान्य दिले जात होते, हे विविध माहीतीतून समोर आले आहे. असंतोष निर्माण झाला तो असा. पंथ, जात कोणतीही असो अखेर आपण एकाच समाजाची लेकरे आहोत. हा भाव दृढ करणे हे नेत्यांचे कसब असते. जातीजातीत गैरसमज, शंका, वाद मिटवणे आणि सामाजिक समरसता निर्माण करणे हे घटनेची शपथ घेणारे यांचे कर्तव्य असते. मग हे बीड येथे का घडले नाही ? 
 
जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. त्याच काळात आवादा या पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनीचे काम मस्साजोग भागात सुरु झाले. हे गाव फक्त २४५० मतदार संख्येचे. संतोष देशमुख हे तीन वेळा निवडून आलेले आणि आता सरपंच झालेले. कार्यकर्ता शब्दाला जागणारा माणूस म्हणून संतोष देशमुख यांची ख्याती. आपल्या नेत्या पंकजा मुंडे यांचा सत्कार आपल्या गावात झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. या आवादा कंपनीच्या सुनील शिंदे नामक कर्मचारी याला विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड याने काम बंद करण्याचा दम दिला होता. तसेच त्याच्याकडे तत्पूर्वी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पवन ऊर्जा प्रकल्पातील सुरक्षा रक्षकाला राजकीय वरदहस्त असलेले काही गुंड, खंडणीखोर मारहाण करतात. संतोष देशमुख हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने हे प्रकरण त्यांच्या अमानुष हत्येपर्यंत पोहचते आणि समाजमन हादरून आणि हेलावून जाते. आज बीड जिल्ह्यातील समाजमनाचा कानोसा घेतला तर जातीय विव्देष, तणाव, प्रशासनाची वासलात, कायदा सुव्यवस्थेबद्दल संशय हे सारे समोर येते आहे.
 
उस तोडणी मजुरांचा जिल्हा
 
बीड जिल्हा हा उस तोडणी मजुरांचा जिल्हा आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त उस तोडणी मजूर बीड जिल्ह्यातून येतात. पण या उस तोडणी मजुरांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी कोणी झटल्याचे आठवत नाही. आपल्याच समाजबांधवांकडे मतपेटी पाहणारे लोक समग्र समाज हित कसे पाहणार ? या अनागोंदीत मग बीड जिल्ह्यात नेमके चालते काय ? संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यावर बातम्यांमधून जे उघड झाले आहे ते लोकशाही, शासन, प्रशासन यावरील आपला विश्वास डळमळीत करणारे आहे. कारण तिथे आधी वाळूची लुटमार, मग परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा लिलाव आणि त्यावरील वर्चस्व राबविण्याचे सत्र, शासकीय कामांची गुत्तेदारी आणि काम न करता निधीची लूट, जिल्हा विकास निधीची कार्यकर्त्यांना कामे देऊन विल्हेवाट आणि मग बदल्या, शासकीय नोकरीत एकाच जातीची मक्तेदारी, जमिनींच्या मालकीचे दरोडे,  दारू दुकाने, अनुदान लाटणे वगैरे वगैरे. कशाकशाची यादी करायची ? बीडमध्ये व्यवस्था किडली, सडली, बरबटली आहे असे नव्हे तर लाज आणि भीती गुंडाळून खुंटीवर टांगलेल्या अराजकतावादी रानटी जमातीने संपूर्ण व्यवस्थेवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे. आपल्याला पाठीशी घालणारे कोणी आहे आणि त्यांच्या जीवावर आपण वाट्टेल ते करू शकतो. हा अवाजवी विश्वास फोफावला म्हणून या जमातीत क्रौर्य आले आणि ते देशमुख यांना हालहाल करून ठार मारते झाले. खोक्या नामक कोणी वन हद्दीत घर बांधून हरीण, काळवीट यांची शिकार करून त्याचे मांस खाऊ लागला. या नराधमांना माणुसकी, चांगुलपणा याच्याशी काही देणेघेणे नव्हते. त्यांना फक्त गैर मार्गाची संपत्ती, पैसाअडका, सदनिका, दागिने, शस्त्रास्त्रे, दारू, मटन, मारहाण, हत्या आणि जातवाद यातच रस होता. 
 
एखाद्या मंत्री आणि त्यांच्या पोसलेल्या गुंडांमुळे एखादा जिल्हा एकाएकी बदनाम होत नाही. तर त्या पाठीमागे वर्षानुवर्षे चालवलेल्या अनाचार, दहशत, धमकी या वाम वृत्तीमुळे जनमानस भयभीत झालेले असते. त्यावर कडी म्हणजे जातीची एकजूट झाल्यामुळे इतर जातींचे शोषण होत असते. बीडमध्ये तेच घडले आहे. दोन जातीत कटुता, अंतर, वाळीत टाकणे असे प्रकरण ताणले गेले आहे. लोकनेते म्हणवणार्‍या प्रतिनिधींनी हे वेळीच मिटवून भाईगिरीला चाप लावून कायद्याचे, घटनेचे राज्य प्रस्थापित व्हायला हातभार लावला असता तर ही वेळ ओढवली नसती. कायदा हा फक्त सामान्यांना लागू होतो. व्हीआयपींना होत नाही. हे आपल्या देशात वारंवार दिसून येते. बीडचे प्रकरण हिमनगाचे टोक आहे. वाल्मिक, आंधळे, खोक्या, मंत्री ही बीडची पात्रं आहेत. इतर जिल्ह्यात पात्रांची संख्या आणि नावे बदलतील एवढेच. पण कारनामे बदलणार नाहीत. जंगलतोड, गौण खनिज लुट, खाणी उभ्या कर, कंत्राटे ओरबाड, टक्केवारी वसूल कर, लायसन आणि बदल्यांचा सौदा कर, पदांचा लिलाव कर. या आहे कुठे लोकशाही ? कुठे आहे घटनेचे राज्य. सगळे सगळं जाणतात. पण लक्षात कोण घेतो ? जनसामान्यांना कोणी पुसत नाही. त्यांना वाली असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मुकी बिचारी कुणी हाका, त्यांच्या नरडयावर सुरी चालवा अशी त्यांची हतबल अवस्था असते. एका वाल्याने वाल्मिक ऋषी होऊन मानवतेला दिशादर्शक श्रीराम चरित्र समजावले. कलियुगातील बीडच्या वाल्मिकने खुनी वाल्या होत आपले अमानवी रूप दाखवून दयाभाव कलंकित केला. सचिन देशमुख याचे हत्येकरी आज ना उद्या फासावर चढतील. पण जातवाद, गैर व्यवस्था, विकाऊ यंत्रणा, चोर टोळ्या, अवगुणी आत्मे, असंतुष्ट प्रवृत्त्या गावोगावी आहेत. त्यांना आपण फासावर कधी चढवणार आहोत ?  सचिन देशमुख हत्या प्रकरणाने बीड येथील जातीयवाद, गुन्हेगारी आणि राजकारण यांचे विकृत दर्शन घडवले आहे.  

Related Articles