विजेतेपदात संघ सहकार्‍यांचे कौतुक   

बदलते क्रीडा विश्व , शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

सामना कुठलाही असला तरी मैदानावरील दडपणापेक्षा बाहेरील दडपण वेगळे आणि आव्हानात्मक असते. अर्थात, आता हे दडपण झुगारून जिंकायचे कसे आणि खेळाचा आनंद घ्यायला भारतीय संघाला चांगले उमगले असल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले. चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहितने स्वतःला काहीसे बाजूला करत सहकार्‍यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांची पाठ थोपटली. भारतीय संघामध्ये अपरिमित गुणवत्ता, खोलवर ताकद आणि समजूतदारपणा आहे. यामुळेच संघातील वातावरण आनंदी राहिले आणि बाहेरील दडपणाला झुगारण्याची कला त्यांना अवगत झाली. यामुळेच हे विजेतेपद साकार झाले, असे रोहित म्हणाला.
 
रोहितच्या तिशी किंवा चाळिशीतील खेळीनंतर बाद होण्यावर टीका होत होती. मात्र, अंतिम सामन्यातील त्याच्या ७६ धावांच्या खेळीने त्याच्यातील वेगळेपण उठून दिसले. प्रत्येक खेळाडूला भारताचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्वदेखील करण्याची इच्छा असते. पण या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. यापूर्वी २०१९ मध्ये भरपूर योगदान देऊनही आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही. पण कमी धावा करूनही या वेळी विजेतेपदापर्यंत पोहोचलो याचे समाधान अधिक आहे.
 
रोहितने संघनिवडीपासून अंतिम सामन्यापर्यंतच्या प्रवासावर भाष्य करून पत्रकारांशी मोकळा संवाद साधला. दुबई येथील प्रत्येक खेळपट्टी आव्हानात्मक होती. फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल असे वाटत होते, पण एकही सामना असा झाला नाही की तेथे चेंडू कायम वळत होते. त्यामुळे फलंदाजांना अंदाज घेणे कठीण गेले. चेंडू वळला तर एक वेळेस फलंदाज त्याचा सामना करूदेखील शकेल, पण चेंडू वळणार असे वाटत असताना तो सरळ येणे केव्हाही घातक असते. जे अंतिम सामन्यात विराट कोहलीबाबत घडले. पाच फिरकी गोलंदाज घेऊन जाण्याच्या निर्णयावर टीका झाली. निवड समितीला त्यांच्या रणनीतीबद्दल कधीही शंका नव्हती. दुबईत झालेल्या ’आयएलटी’ २० स्पर्धेतील सामन्यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांनी खेळपट्टीमधील संथपणा अचूक हेरला होता. त्यामुळेच पाच फिरकी गोलंदाज घेण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी पहिले चार गोलंदाज खेळले. चौघांचेही योगदान सारखे होते. कधी फलदाजांना बाद करून, तर कधी धावांचा प्रवाह रोखून त्यांनी भारतीय संघाचे वर्चस्व कायम राखले.भारताला या स्पर्धेत एकाच ठिकाणी खेळण्याचा फायदा झाला अशी टीका होत आहे. पण हा निर्णय आमच्या नियंत्रणाच्या बाहेर होता. व्यवस्थापनाने ही गोष्ट हाताळली. त्यामुळे संघावर उगाच टीका झाली.

Related Articles