एनटीपीसी ग्रीन : हरित ऊर्जेचा निर्माता   

भाग्यश्री पटवर्धन 

औष्णिक ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी). या कंपनीचा ऊर्जा सुरक्षेत असलेला वाटा वाढतो आहे.  एका सार्वजनिक क्षेत्रातील उत्तम उद्योगाच्या पंखाखाली एनटीपीसी ग्रीन भविष्यात चांगली कामगिरी करेल यात शंका नाही.
 
गेल्या आठवड्यातही शेअर बाजाराची घसरण चालूच राहिली. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन काही खंडानंतर पुन्हा सुरु झाले आहे. मधल्या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्या नागरिकांना आणखी दिलासा मिळेल तसेच वस्तू आणि सेवा कर रचनेत बदलाचे सूतोवाच केले मात्र त्याचा परिणाम बाजाराच्या अनिश्चिततेवर झाला नाही. जागतिक पातळीवर ट्रम्प राजवटीने निर्माण केलेल्या भू राजकीय धक्क्यातून अजून बाजार सावरलेला नाही आणि आणखी काही काळ ही स्थिती राहणार असे दिसते आहे. कच्च्या तेलाचे दर उतरले असले, तरी भारत ऊर्जा सुरक्षेबाबत अजून सार्वभौम झालेला नाही. देशातील औष्णिक ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी). या कंपनीचा ऊर्जा सुरक्षेत असलेला वाटा वाढतो आहे.  
या एनटीपीसीने ग्रीन अशी नामावली घेतलेले आणखी एक कंपनी भावंड नुकतेच जन्माला घातले आणि त्याची नोंदणी म्हणजे बारसे झाले. प्राथमिक भागविक्रीवेळी या कंपनीने १०२-१०८ रुपये किंमतपट्टा ठेवला होता. १११ रुपयाला तो नोंदला गेला. आज त्याच्या खाली हा भाव आहे.
 
एनटीपीसी ग्रीन आणखी एका कारणासाठी चर्चेत राहिली. तेल उत्खनन क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी आणि एनटीपीसी ग्रीन एकत्र येऊन आयना रिन्यूएबल पॉवर या कंपनीचा १०० टक्के हिस्सा घेणार आहे. स्पर्धा आयोगाने या व्यवहाराला नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. हा व्यवहार सुमारे १९, ५०० कोटी रुपयांचा आहे. दोन सरकारी कंपन्या एकत्र येऊन एक खासगी कंपनी खरेदी करतात यावरून ऊर्जा क्षेत्रातील स्पर्धा किती तीव्र आहे हे लक्षात येते. त्यातही हवामान बदलामुळे येणारी संधी आणि आव्हाने लक्षात घेता भविष्यात पर्यावरण स्नेही कंपन्यांना अधिक पुढावा मिळत जाणार आहे. जागतिक पातळीवरही तोच कल दिसतो आहे. एनटीपीसी ग्रीनचे निकाल गेल्या तिमाहीत कसे होते हे आता पाहू. कंपनीचा निव्वळ नफा १८ टक्के वाढला आहे. तो ६५ कोटी रुपये झाला आहे. महसुली उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्के वाढले आहे. ५८.७३ कोटी रुपये गेल्या वर्षीचा नफा होता तो वाढून ८९.४२ कोटी रुपये झाला. हि वाढ सुमारे ५२ टक्के आहे. कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ९४,५०१.२९ कोटी रुपये आहे. प्राथमिक भागविक्रीवेळी कंपनीने दहा हजार कोटी रुपये भांडवलाची उभारणी केली.आज जगभरात नवीनीकरणीय ऊर्जेचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे एका सार्वजनिक क्षेत्रातील उत्तम उद्योगाच्या पंखाखाली एनटीपीसी ग्रीन भविष्यात चांगली कामगिरी करेल यात शंका नाही. एनटीपीसी ग्रीनचा कमाल किमान भाव (५२-ुज्ञ हळसह १५५.३५, ५२-ुज्ञ श्रेु ८४.५५) असा आहे.
 
रिलायन्स आणि स्टारलिंक
 
देशातील काही उद्योजक दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतात याचा अनुभव गेल्या आठवड्यात आला. करवसुलीच्या मुद्द्यावरून काहीशा पेचात सापडलेल्या रिलायन्स समूहातील दूरसंचार क्षेत्रातील भावंडं म्हणजे जियो टेलिकॉम बातम्यात झळकले. तेही इंटरनेट सेवा या जगण्यात रोज महत्वाची भूमिका बजावत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी केलेल्या करारामुळे. सध्या घर, पाणी, वीज, हवा या जगण्यासाठी आवश्यक गोष्टीत इंटरनेट सेवा समाविष्ट झाली आहे. देशाच्या ग्रामीण भागात परवडणार्‍या दरात नेट सेवा देणे हे एकट्या सरकारला शक्य नाही. त्यासाठी खासगी क्षेत्राचे योगदान आवश्यक आहे. स्पेसएक्स या जगातील आघाडीच्या कंपनीशी करार करून ही सेवा रिलायन्स जियो देणार आहे. अंबानी यांचा उद्योग क्षेत्रातील दबदबा नवा नाही. आज कोट्यवधी नागरिक नेटच्या बळावर दैनंदिन व्यवहार करतात. त्यामुळे जिओच्या माध्यमातून ही सेवा देण्याने किती महसूल कंपनीला मिळेल याचा अंदाज बांधणे सध्या अवघड आहे. क्षेत्र स्पर्धेचे असले तरी रिलायन्स या नावामुळे मिळणारा फायदा पाहता परकी म्हणजे अमेरिकी कंपन्यांची आणखी गुंतवणूक आगामी काळात अपेक्षित आहे.

Related Articles