नीरा-भीमा कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व   

इंदापूर, (वार्ताहर) : शहाजीनगर येथील नीरा-भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. 
 
हर्षवर्धन पाटील यांनी १९९९ मध्ये नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. तेव्हापासून पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत. कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या २५ वर्षांत शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ४६ गावांमधील सभासदांनी व  कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. 
 
पाटील यांचे बिनविरोध  उमेदवार :
बावडा गट - पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील प्रतापराव सर्जेराव, पाटील उमेश अच्युतराव
पिंपरी गट - मोहिते प्रकाश शहाजी, बोडके संजय तुळशीराम, विजय दत्तात्रय घोगरे.
सुरवड गट - शिर्के महेशकुमार दत्तात्रय, घोगरे दादासो उत्तम, गायकवाड सुभाष किसन
काटी गट  - पवार लालासो देविदास, जाधव राजकुमार वसंतराव, वाघमोडे विलास रामचंद्र
रेडणी गट - बोंद्रे आनंदराव नामदेव, देवकर राजेंद्र व्यंकट, सवासे दत्तू यशवंत
अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग - कांबळे राहुल अरुण 
इतर मागास प्रवर्ग - यादव कृष्णाजी दशरथ 
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग - नाईक रामचंद्र नामदेव
ब वर्ग सभासद प्रवर्ग - पाटील भाग्यश्री हर्षवर्धन
महिला राखीव प्रवर्ग - पोळ संगिता दत्तात्रय, शिंदे कल्पना निवृत्ती
 
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहायक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.

उदयसिंह पाटील यांच्या मोठेपणाचे कौतुक!

कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी बावडा गटातून स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा तहसील कार्यालयामध्येच शेवटच्या दोन मिनिटांत घेतला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील यांना तसेच सर्व पदाधिकार्‍यांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु उदयसिंह पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपला निर्णय कायम ठेवला. मात्र, हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीतील अपयशाने राजकीय पदावर नाहीत, त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणे हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठितेसाठी आवश्यक होते. त्यामुळे हर्षवर्धन राजकीय अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी पदासाठी वेळ प्रसंगी नाराज न होता एक पाऊल मागे घेण्याची गरज आहे, असे उदयसिंह पाटील यांनी सांगितले.  
 

Related Articles