पुण्याच्या लौकिकाला काळिमा   

माझेही मत 

महिलांसाठी सर्वांत सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत एकापाठोपाठ एक घडणार्‍या बलात्काराच्या घटनांमुळे पुण्याच्या या लौकिकाला काळीमा फासला गेला आहे. 
 
मागील दोन वर्षात शहरांत ९१५ बलात्काराच्या घटना घडल्या, तर १८ फेब्रुवारी २०२५ अखेर शहरात ५६ घटनांची नोंद आहे, तसेच विनयभंगाच्या १ हजार ६०४ घटना दाखल झाल्या असून, चालू वर्षात १८ फेब्रुवारीअखेर १२५ घटनांची नोंद आहे. बलात्काराच्या घटनांची दोन वर्षातील आकडेवारी पाहता दर दिवसाला एकपेक्षा अधिक अत्याचाराच्या घटनांची नोंद होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. महिलांकडे वासनांध नजरेने पाहून त्यांचा पाठलाग करत विनयभंग करण्याच्या तीन घटना शहरांत दिवसाला घडतात. यामध्ये नयना पुजारी सामूहिक बलात्कार प्रकरण, ज्योती कुमारी बलात्कार प्रकरण असो वा २७ वर्षीय तरुणीचा कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये निर्घृण खून असो, वा ऐन नवरात्रातील कबड्डीपटूचा कोयत्याने वार करुन खून असो किंवा दारु पाजून दिव्यांग मुलीवर सामूहिक अत्याचार अशी अनेक केवळ उजेडात आलेली प्रकरणे ज्यांना संबंधित पीडितेने वा तिच्या कुटुंबाने ताबडतोब पोलिसात धाव घेतल्याने असेना किंवा समाज व समाजमाध्यमांनी वेळोवेळी आवाज उठवल्याने ठराविक प्रकरण उजेडात आलेली. तसे पाहता ग्रामीण भागातील अशी घटना असती तर कुटुंबाची ’इज्जत’ या सामाजिक दडपणाखाली आजही अशा कित्येक घटना समोर येत नाहीत. 
 
वर उल्लेखित घटना केवळ पुणे शहराशी संबंधित असल्याने अशा अनेकविध घटना राज्यात, तसेच देशातील दिवसागणिक प्रमाण किती असतील (ज्या घटना उजेडात येतात) हे केवळ ऐकूनच अंगावर काटा येतो. आता या घटनेवर आठ दिवस चर्चांचा सोपस्कार होईल. चर्चासत्र आयोजिले जातील; पण केवळ एवढ्यावरच अशा क्लेशदायक घटना थांबतील? याबाबत केवळ सरकार किंवा पोलीसच गुन्हेगार ठरवले जातीलही; पण समाज म्हणून आपलेही जसे हक्कांबाबत ’ओरबडून’ घेण्यात पटाईत आहोत, तसेच ’कर्तव्याबाबत’ मरगळ झटकून सरसावले तर बलात्काराच्याच काय तर सध्या फसवणुकीच्या घटनांना बर्‍यापैकी पायबंद बसेल.
 
सारांश, केंद्र सरकारने अशा संवेदनशील विषयांवर जेलवारी वा वार्षिक शिक्षेची तरतूद न करता जन्मठेप वा फाशीची शिक्षेची तरतूद करावी. तसेच पोलीस वा तत्सम व्यवस्थेने कर्तव्य चोख बजावले पाहिजे, तसेच सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया)ने अशा वा अन्य संवेदनशील प्रकरण उजेडात आणावीत, तसेच शाळांनी मुला-मुलींना गुड टच-बॅड टच याबाबत जागृत करावे. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी महिला व मुलींना स्व-संरक्षणाबाबत कराटे, लाठ्याकाठ्यांसारखे उपक्रम राबवावेत. त्याचबरोबर कुटुंब व समाजव्यवस्थेने आपल्या मुला-मुलींना नैतिकतेचे केवळ धडे न देता प्रत्यक्षात आचरणात आणून सदृढ आणि सशक्त समाज आणि पर्यायाने देशाचा विचार केला गेला पाहिजे.
 
सत्यसाई पी.एम. गेवराई (बीड)

Related Articles