‘आप’ की भाजप?   

आज दिल्लीचा फैसला

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवारी) होणार असून, सलग चौथ्यांदा ’आप’ सत्तेवर येणार की, २७ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत भाजप सरकार स्थापन करणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला साधे खातेदेखील उघडता आलेले नाही, त्यामुळे यंदा काँग्रेसला किती जागा मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.गेल्या अडीच दशकांपासून सत्तेपासून दूर असलेल्या भाजपच्या पारड्यात जनमत चाचण्यांचा निष्कर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निकाल काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.
 
आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सुरूवातीला टपाली मतांची मोजणी होईल. त्यानंतर, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे प्राप्त मतांची मोजणी होईल. सुरूवातीच्या तास-दीड तासांत सत्तेचा कल लक्षात येईल. दुपारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट झालेले असेल. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी ६०.५४ टक्के मतदान झाले होते.भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पक्षाला किमान ५० जागा मिळतील, असा दावा केला. तर, ’आप’ने जनमत चाचण्यांचे अंदाज फेटाळून लावले असून, ‘आप’चे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील आणि ते पुन्हा सरकार स्थापन करतील, असा दावा केला आहे.
 
मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे ५ हजार कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी असतील, असे दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी एलिस वाझ यांनी सांगितले.आम आदमी पक्षाने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून ‘आप’च्या आमदारांना प्रत्येकी १५ कोटींचे आणि मंत्री पदाचे आमिष दाखविले जात असल्याचे केजरीवाल आणि ‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी म्हटले आहे. 
 
याविरोधात दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णू मित्तल यांनी नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावरुन, नायब राज्यपालांनी ‘आप’च्या नेत्यांच्या आरोपांच्या चौकशीचे लाचलुचपत विभागास (एसीबी) आदेश दिले आहेत. नायब राज्यपालांच्या आदेशानंतर एसीबीच्या पथकाने केजरीवाल यांची भेट घेतली. दुसरीकडे, संजय सिंह यांनी जेव्हा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला; त्यावेळी एसीबीचे लक्ष गेले नाही. मात्र, भाजपच्या तक्रारीनंतर एसीबीला अचानक जाग आली का? असा सवाल केला.
 
निकालाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी सर्व उमेदवारांची काल सकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीस ‘आप’चे नेते, पदाधिकारी आणि सर्व ७० उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा ‘आप’चे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजपकडून भ्रम फैलावला जात आहे. जनमत चाचण्यांच्या आधारे ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ‘आप’चे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी ५० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा केला. तसेच, सात ते आठ ठिकाणी निकराची लढत असल्याचे सांगितले.
 
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोघांचा पराभव करत दिल्लीच्या राजकीय नकाशावर ‘आप’ने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यावेळी ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा पटकावल्या होत्या. २०२० मध्ये ६२ जागा जिंकताना ‘आप’ने पुन्हा सत्ता स्थापन केली होती.भाजप १९९८ पासून सत्तेच्या बाहेर आहे. अडीच दशकापासून सत्तेत परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच आशा यंदा आणखी वाढल्या आहेत.  २०१३ पर्यंत सलग १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणार्‍या काँग्रेसला मागील दोन निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसचा पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल.

Related Articles