शहरातील मोठ्या सोसायट्यांनी पाणी बचत करावी   

पाणीपुरवठा विभागाचे पत्र

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये सध्या केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जूनपर्यंत पुरेल, असा दावा केला जात आहे. परंतु मे महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाई तीव्र हाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा करताना काळजी घेतली जात आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ’पुणेकरांनो पाण्याची बचत करा’ अशी म्हणण्याची वेळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आली असून शहरातील मोठ्या सोसायट्यांना पाण्यात बचत करण्याबाबतचे लेखी पत्र दिले जाणार आहे.
 
वाढत्या उष्णतेमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. शहरासह उपनगर भागातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याबाबत तक्रारी करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात जलवाहिन्यांचे मोठे जाळे असताना देखिल कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या भागात जलवाहिन्या आपुर्‍या आहेत, त्या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही भागात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे  शहरात नागरिकांसह मोठ्या सोसायट्यांकडून पिण्याचा पाण्याचा अपव्यय केला जातो. त्यामुळे, पाणी बचतीसाठी पालिकेकडून नागरिकांना विनंती केली जाणार आहे. राज्य शासनाकडून जल व्यवस्थापन पंधरावडा साजरा केला जाणार असून त्या अंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठीची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
 
शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी १० ते १५ टक्के वाढली आहे. अशा स्थितीत, महापालिकेस धरणातून मिळणारे पाणी मर्यादीत असल्याने पाणी बचतीसाठी पालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे. शहरात अनेक जुन्या सोसायट्या तसेच इमारती आहेत, त्यांना पालिकेकडून सोसायटीच्या भूमीगत टाकीमध्ये पाणी दिले जाते. मात्र, या टाक्यांची सोसायट्या वर्षानुवर्षे दुरूस्ती करीत नाहीत परिणामी टाक्यांना मोठी गळती असते. यातून पाणी जमिनीत मुरते. तसेच, टाकी भरल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जाते. सोसायटी जुनी असल्यास घरांमधील नळांना मोठे लिकेज असते, तसेच पिण्याचेच पाणी स्वच्छतागृहासाठी वापरले जाते. त्यामुळे, सोसायटीतील सर्व प्रकारची पाण्याची गळती रोखावी तसेच सोसायटीचे उद्यानासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे विनंती पत्र महापालिकेकडून दिले जाणार आहे.
 
पाणीटंचाई वाढली
 
राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. सध्या राज्यात १४ जिल्ह्यांतील ७८४ गावे टँकरवर अवलंबून आहेत. त्यात सर्वाधिक ६५ टँकर पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये सध्या केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जूनपर्यंत पुरेल. मे महिन्याच्या अखेरीस टंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यात टँकरची मागणी वाढली आहे. याचा गैरफायदा घेत टँकर पुरवठादारांकडून टँकरचे दर वाढविण्यात आले आहेत. छोट्या टँकरसाठी ५९९ आणि मोठ्या टँकरसाठी तब्बल १२०० रुपये मोजावे लागत आहेत. अनेक सोसायट्यांना दररोज ३ ते ४ टँकर लागतात, ज्यामुळे दररोजचा खर्च ५ ते ६ हजारांवर पोहोचतो आहे. 
 
पाणी गळती रोखण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे. धरणसाठ्यात पुरेशा प्रमाणात पाणी असले तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पिण्याच्या पाण्याचा मोठा अपव्यय होतो. त्यामुळे हे पाणी वाचविल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. पालिका त्यासाठी जादा पाणी वापरत असलेल्या सोसायट्यांना तसेच नागरिकांना नोटीस देते मात्र आता नागरिकांना पत्राद्वारे विनंतीही केली जाणार आहे.
- नंदकिशोर जगताप, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, महापालिका.

Related Articles