निकाल लवकर लागो (अग्रलेख)   

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी भारतीयांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. तहव्वूर राणा याला भारतात आणण्याने या हल्ल्यामागील कोडे उलगडण्यास मदत होणार आहे. राणा हा या हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो; पण त्याचे सहकारीही शोधणे आवश्यक आहे. त्याला २००९ मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली. राणाचा ताबा भारतास मिळावा या साठी अनेक वर्षे राजनैतिक पातळीवर प्रयत्न करावे लागले. राणा मूळचा पाकिस्तानी असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे. भारतात येणे टाळण्यासाठी त्याने कॅनडा व अमेरिकेतील  कायद्यांचा आधार घेतला. भारतास आपला ताबा देण्याच्या विरुद्धचा त्याचा अर्ज अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दि.४ रोजी फेटाळला. त्यामुळे  त्याला भारतात आणण्याचा मार्ग सुकर झाला. भारतात येताच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतील  काही माहिती  एनआयए उघड करत आहे. २६ नोव्हेंबर ०८ रोजी मुंबईतील अनेक ठिकाणी एकदम हल्ले झाले. त्यात परदेशी नागरिकांसह १६६ जण मारले गेले. अतिरेक्यांशी लढताना पोलिस अधिकार्‍यांनीही प्राणांची आहुती दिली. अजमल कसाब हा एकमेव मारेकरी सापडला. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याला फाशी देण्यात आली; पण कहाणी संपली नव्हती.मुंबईवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना  सूचना देणारे अतिरेकी अजूनही मोकाट आहेत. त्यांना पाकिस्तानातून आणून शिक्षा दिल्याखेरीज हल्ल्याचे प्रकरण संपले असे म्हणता येणार नाही.
 
अटकेचेही राजकारण 
 
हल्ल्यानंतर लगेचच भारताने त्याची चौकशी सुरु केली. त्याची पाळेमुळे पाकिस्तान व अन्य देशांतही पसरल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. या तपासातूनच तहव्वूर राणा व डेव्हिड हेडली ही नावे समोर आली. हेडली पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. त्यालाही २००९मध्येच अमेरिकेत अटक करण्यात आली. मात्र भारताच्या ताब्यात  आपल्याला दिले जाऊ नये यासाठी त्याने तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे कबूल केले त्यामुळे तो तेथील तुरुंगात आहे.मात्र या हल्ल्याची आखणी करणार्‍या राणाला भारतात आणणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार तो दहशतवादी आहे हे सिद्ध होणे त्यासाठी आवश्यक होते. भारतीय तपास यंत्रणांनी अनेक वर्षे अथक तपास करून त्याच्या विरुद्धचा पुरावा गोळा केला. गुन्हेगारांना परस्परांच्या ताब्यात देण्यासाठी अमेरिका व भारत यांनी १९९७ मध्ये करार (एक्स्ट्राडिएशन  ट्रीटी) केला होता. त्याचा आधार घेऊन राणाचा ताबा मिळण्यासाठी  राजनैतिक व कायदेशीर प्रयत्न सुरु झाले. राणाला भारतात आणण्याचे श्रेय  मोदी सरकार घेऊ पाहात आहे व भाजप तसा प्रचारही करत आहे. पण त्यात तथ्य नाही. २००९मध्ये त्याला अटक झाल्यापासून सरकार तशी मागणी करत होते.त्या वेळी पी. चिदंबरम गृह मंत्री होते, त्यांनी या प्रयत्नांची माहिती अलीकडे जाहीर केली. या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा ही संघटना आहे असे भारत तेव्हापासून सांगत आहे. राणा व त्याचा सहकारी हेडली याच्या चौकशीतून या दाव्यास पुष्टी देणारी माहिती समोर आली. या हल्ल्यात गुंतलेले हाफीझ सईद, झकिउर रेहमान लख्वी व ‘लष्कर’चे अन्य अतिरेकी भारताच्या ताब्यात मिळावेत, त्यांच्यावर खटला चालावा यासाठी भारत प्रयत्न करत आहे; पण पाकिस्तानने त्यात कायम खोडा घातला. आताही राणा कॅनडाचा नागरिक आहे या सबबी खाली पाकिस्तान स्वत:ला दूर ठेवू पाहात आहे. मात्र राणा त्यांच्या लष्करात अधिकारी होता हे वास्तव पाकिस्तान नाकारू शकत नाही. मुंबईवरील हल्ल्यापूर्वी जुलैमध्ये   बेंगळुरु मध्ये झालेल्या स्फोटांशीही राणाचा संबंध होता, ‘लष्कर’च्या अतिरेक्यांशी त्याचे निकटचे संबंध होते हे जगजाहीर आहे. त्याचे व हेडलीचे संभाषण भारतीय तपास यंत्रणांच्या हाती आहे. त्याला दोषी ठरवण्यास तेही पुरेसे आहे.  भारतातील  तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आधारे राणावर आता खटला चालवला जाईल. त्याने अमेरिकेच्या एफबीआयला दिलेल्या जबाबाचा आधार त्यासाठी घेतला जाईल. मुंबई वरील हल्ला म्हणजे सार्वभौम देशावरील हल्ला होता. दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे त्यात गुंतले आहे. राणाचा खटला लवकर संपून त्यास शिक्षा झाल्यावर या हल्ल्याचे एक प्रकरण निकाली निघेल.  

Related Articles