वाचक लिहितात   

सईसदेचा वेळ सभकारणी लावा
 
१८व्या लोकसभेचे चौथ्या अधिवेशनाचे कामकाज नुकतेच संपले. या अधिवेशनात अनेक वादळी चर्चा झाल्या. मुख्य म्हणजे वक्फ विधेयक बहुमताने मंजूर झाले. एकूण १६० तास कामकाज चालले. एकूण १६ विधेयके मंजूर करण्यात आली. एकूण कामकाज ११८ टक्के झाले. १७ तास चर्चा राष्ट्रपतींच्या भाषणावर झाली, तर केंद्रीय अंदाजपत्रकावर १६ तास चर्चा झाली. राज्यसभेचे कामकाज १५९ तास झाले. एकूण १६ विधेयके मंजूर करण्यात आली. कामकाजाचे प्रमाण ११९ टक्के एवढे होते. १७ तास वक्फ विधेयकावर चर्चा झाली. लोकसभेत शून्य प्रहरात एकाच दिवसात उपस्थित केलेल्या विषयांच्या संख्येचाही २०२ एवढा विक्रम झाला. एकूणच विचार करता लोकसभा व राज्यसभा या दोन्ही ठिकाणी संसदीय कामकाज चांगले झाले. अनेक सदस्यांनी विविध चर्चात भाग घेतला. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सभासदांना चर्चेची संधी मिळाली, संसद हे सर्वोच्च सभागृह आहे. सभासदांनी याचा विचार करून संसदेचे कामकाज १०० टक्के यशस्वी केले पाहिजे.
 
शांताराम वाघ, पुणे 
 
धक्‍कादायक प्रकार
 
दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन सौ. तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी धक्कादायक वाटली. पुण्यातील धर्मादाय रुग्णालयात ही घटना घडली. मनाला खूप क्लेश देणारी ठरली. काय त्या नवजात चिमुकल्यांचा दोष? आता त्यांना कोण आईच्या मायेने सांभाळणारी व्यवस्था होणार? असे असंख्य प्रश्‍न मनात थैमान घालू लागले. यथावकाश सर्व सुरळीत होईल अशी प्रार्थना करणे आपल्या हाती आहे एवढेच. कारणीमिमांसा शोधायला वेळ लागेल; परंतु नवजात चिमुकल्यांचा दोष काय? तोपर्यंत त्यांच्या पालनपोषणाची खंबीर नातेवाईक घेतली तरच निभावून जाईल.
 
नीलम सांगलीकर, पुणे.
 
संघर्षाशिवाय यश नाही!
 
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाशिवाय आयुष्याला रंगत नाही. आज कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. ती संघर्षानेच मिळवावी लागते. जेवढा मोठा आपला संघर्ष असतो. तेवढे यशदेखील मोठे असते. त्यासाठी सातत्याने संघर्ष करा. मनापासून संघर्ष केला, तर यश हमखास मिळते. संघर्षाला सामोरे जात असताना आपल्याला खूप काही शिकायला मिळते. आयुष्याचा धडा शिकायला मिळतो, अनुभव येतो. हाच अनुभव आयुष्यात उपयोगी पडतो. संघर्ष करुन मिळालेल्या यशामुळे आत्मिक समाधान मिळते.
 
संतोष शिंदे, मु.पो.काष्टी, ता.श्रीगोंदा
 
’भारतकुमार’ आणि संयत अभिनय
 
केसरी (दि.०५ एप्रिल) मधील मनोजकुमार कालवश, ही दिवंगत मनोजकुमार या हिंदी चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व निधनाची तसेच पंतप्रधानांनी त्यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद‍्गारांची बातमी वाचून मनोजकुमार यांनी केलेल्या ५० एक चित्रपटांमधील त्यांची कारकीर्द आठवली. भारतीय जनतेला आपल्या चित्रपटांमधून देशभक्तीची प्रेरणा देण्याचे ’उपकार’ त्यांनी केले आहेत. ’उपकार’, ’पूरब और पश्‍चिम’सारख्या तिकिटबारीवर धमाका केलेल्या चित्रपटांतून त्यांची ’भारतकुमार’ ही छबी बघताना हळवा अभिनय जाणवायचा. ’गुमनाम’, ’वो कौन थी’ या रहस्यपटांमध्येही त्यांनी योग्य वातावरणनिर्मितीसाठी लागणारा गोंधळलेल्या नायकाचा संयत अभिनय उत्तम केलेला जाणवला. त्यांच्या सिनेकारकिर्दीला सलाम आणि स्मृतींना अभिवादन.
 
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
 
फास्टफूडमुळे कर्करोगाचा धोका
 
संशोधकांनी असा दावा केला आहे, की फास्टफूडमुळेच मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. संशोधकांचा हा दावा मुलांसह पालकांच्याही डोळ्यात अंजन घालणारा आहे. आहारातील घटकांवर आरोग्य अवलंबून असते. रोजचा आहार चौरस असावा म्हणजे त्यात शरीराला आवश्यक असणार्‍या सर्व पदार्थांचा समावेश असावा असे आहारशास्त्र सांगते; पण धावपळीच्या सध्याच्या काळात लोकांना स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी वेळ नाही, मग आधार घेतला जातो तो फास्टफूडचा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण फास्टफूड आवडीने खातात. विशेषतः शाळकरी मुलांना तर फास्टफूड म्हणजे पर्वणीच वाटते. जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ प्रकृतीला मात्र चांगले नसतात. झटपट तयार होणार्‍या या फास्टफूडमध्ये साखर आणि मीठ यांचे प्रमाण खूप असते, शिवाय ते भरपूर तळलेले देखील असतात. अतिप्रक्रिया केलेल्या या पदार्थात कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे या पदार्थांपासून दूर राहावे, असा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ देत असतात, तरी लोक त्यांचे ऐकत नाही. याचा हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलतेचा धोका आहे. आतातरी पालकांनी मुलांना फास्टफूडपासून दूर ठेवायला हवे.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे.

Related Articles