कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात   

चाकण, (वार्ताहर) : चाकण नगरपरिषद, खराबवाडी व बिरदवडी गावचा घनकचरा वाघजाईनगर (ता. खेड) येथील दगड खाणीजवळ टाकण्यात येत आहे. हा प्लॅस्टिक कचरा अधूनमधून पेटवून दिला जातो. कचर्‍याला लागलेली आग नियंत्रणात आली, तरी त्यातून निघणार्‍या घातक धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
 
कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली असून, कचर्‍याचे नियोजित व्यवस्थापन व कायमस्वरूपी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. खाणीजवळ टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. परंतु नगर परिषदेकडे जागा उपलब्ध होइपर्यंत शहराचा कचरा तात्पुरता बिरदवडी-वाघजाईनगर हद्दीतील दगड खाणीत टाकण्याची विनंती करण्यात आल्याने हा कचरा तेथे टाकण्यात येत आहे.
संबंधित गावांमधील रोज हजारो टन कचरा गोळा करून या ठिकाणी टाकला जात आहे. या कचर्‍यात अनेक प्रकारचा घातक रासायनिक व औद्योगिक टाकाऊ कचरा आहे. खाणी लगतच्या मोकळ्या जागेवर कचरा अस्ताव्यस्त टाकला जात आहे. हा कचरा जागेवर कुजून परिसरात खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे. मागील काही दिवसांपूर्वी कचरा डेपोला आग लागून ती आग धुपल्याने त्यातून पडणार्‍या धुराने बिरदवडी येथील ग्रामस्थांना डोळे, घसा, कान आणि श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
 
कचर्‍याची कोंडी फोडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा उपोषण, आंदोलन केली. परंतु  अपेक्षित परिणाम झाला नाही. येथील डम्पिंग एरियाची दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा मागणी उद्योजक शैलेश दिलीप फडके, राहुल जाधव, अमोल परदेशी, अनिकेत फडके, रोहिदास पवार, योगेश पवार, सुनील काळडोके आदींनी केली आहे. 
 
खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वनविभागाच्या जागेत असलेला कचरा डेपो हा अनधिकृत आहे. कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी कचरा टाकला जातो.पण सद्य परिस्थितीत हा कचरा डेपो बिरदवडी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी खुप घातक ठरत आहे.सदर बेकायदेशीर डेपोतील कचरा जाळला जात असल्या कारणाने आजूबाजूच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात धूराचे लोट निर्माण होत आहे.त्यामुळे बिरदवडी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना डोळे, कान, घसा आणि श्वसशनाचे आजार होत आहेत. याला जबाबदार कोण ?

- शैलेश फडके, उद्योजक, बिरदवडी 

चाकण नगरपरिषद व इतर ग्रामपंचायती परिसरातील कचरा वाघजाई नगर येथील खाणीत टाकून पेटवितात. बिरदवडी भागातील नागरिकांना त्यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत. कचरा टाकणारांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. प्रशासनाने तातडीच्या उपायोजना करून या भागात गस्तीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. कचर्‍याचा प्रलंबित प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आणि कचरा विघटनाचे समूळ उच्चटन होण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल.

- नितीन गोरे, सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

 

Related Articles