वाचक लिहितात   

‘मिशन पाचशे’ अडचणीत?

अमेरिका फर्स्ट अशी घोषणा करून त्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी करकचून पावले टाकायला सुरुवात केली आहे. भारताचे पंतप्रधान आणि ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापारासाठी ’मिशन ५००’ची घोषणा फेब्रुवारीला केली होती. या माध्यमातून २०३० पर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापाराची उलाढाल दुपटीहून अधिक वाढवत ५०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अवघ्या दोन महिन्यांतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापार नितीमुळे या ’मिशन ५००’ समोर संकट उभे ठाकले आहे. जगभरात ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डची चर्चा सुरू असून, जगभरातील विविध शेअर बाजारांना त्याचा फटका बसला आहे. पंतप्रधान मोदी व ट्रम्प यांच्या उपस्थितीत वॉशिंग्टन येथे वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकार्‍यांची बैठक झाली होती. बाजारपेठेतील व्यापार वाढविणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि शुल्कासंबंधीचे अडथळे कमी करण्यासाठी दोन्ही देशांत सखोल चर्चा झाली होती. पाच वर्षातील आकडेवारीकडे लक्ष टाकले तर चीनपेक्षा अमेरिकेशी झालेला व्यापार भारताला फायदेशीर ठरला आहे. आता मात्र ’ट्रम्प टॅरिफ’नंतर ही वाढ कायम ठेवण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर असेल. ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डनंतर अनेक आव्हानांना भारतालाच नव्हे, तर अनेक राष्ट्रांना सामोरे जावे लागणार आहे.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

गडचिरोलीत विकासाची संधी

गडचिरोली दाट जंगल आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी शासनाने खनिकर्म प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारला पर्यावरणीय सुरक्षा, विस्थापित समुदायांसाठी योग्य मोबदला आणि शाश्वत विकास योजना याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या भागाचा आर्थिक विकास आणि समृद्ध नैतिक व सांस्कृतिक वारशाचे संरक्षण होणार आहे, असे झाल्यास खनिकर्म प्राधिकरणाची स्थापना या क्षेत्रासाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकते. त्याचबरोबर तेथील आदिवासी समुदायांच्या हक्कांचा आणि मूल्यांचा आदरदेखील केला जाऊ शकतो.

आशालता काकडे, पुणे

देशप्रेम जपणारा कलावंत

देश प्रेमाच्या, देशभक्तीच्या चित्रपटांसाठी आवर्जून ओळखले गेलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते हरिकृष्ण गिरी गोस्वामी उर्फ मनोजकुमार यांचे निधन झाले. एकेकाळी चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणार्‍या आणि पुन्हा समाजासमोर न येण्यामुळे काहीशा विस्मृतीत गेलेल्या अशा अभिनेत्याच्या अवचित जाण्याची अवचित बातमी येते आणि मन विव्हल होते! चांगले आयुष्य लाभून देखील त्यांची चित्रपट कारकीर्द काहीशी मर्यादितच राहिली! देश प्रेमाचे, देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणार्‍या त्यांच्या शहीद, उपकार, रोटी कपडा और मकान, क्रांती आदी चित्रपटांमुळे ’भारतकुमार’ हे टोपण नाव त्यांना अलगद चिकटले! ’मेरे देश की धरती...’, ’ए वतन ए वतन..’ , अशी कितीतरी त्यांच्यावर चित्रित झालेली अवीट गोडीची गाणी रसिकजनांचे अनंत काळ मनोरंजन करीत राहतील १९९२ मध्ये त्यांना ’पद्मश्री’ किताबाने भूषविण्यात आले. २०१५ मध्ये प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने ते सन्मानित झाले. या अभिनेत्याने चंदेरी दुनियेत आपले 
वेगळेपण जपले!

श्रीकांत जाधव, अतीत जि.सातारा

जखमेवर मीठ चोळले

नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ, वार्‍याने राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे, फळबागांचे, कांद्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीने पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सहानुभूती दाखवून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदतीबाबत सहानुभूती दाखविण्याऐवजी शासनाच्या आर्थिक मदतीचा वापर लग्न व शुभ कार्य व इतर घरकामासाठी शेतकरी करतात. योग्य वापर करत नाहीत, असे जाहीररित्या सांगणे म्हणजे शेतकर्‍यांना अवकाळीने केलेल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

कृषीमंत्र्यांचे वक्तव्य असंवेदनशील 

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ’कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्नांमध्ये उधळपट्टी करतात’ या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्यंतरी ’भिकारीही एक रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा देतो!’ असे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. राज्याचे कृषिमंत्रीच जर शेतकर्‍यांप्रति इतकी असंवेदनशील वक्तव्ये करीत असतील, तर अशा व्यक्तीस राज्याचे कृषीमंत्री बनवण्यामागे नेमके कोणते निकष लावले गेले? असा प्रश्न उपस्थित होतो. काही वर्षांपूर्वी ’शेतकरी कुटुंबातील विवाह सोहळे आणि नशेबाजीमुळे कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात’ असे विधान एका मंत्र्याने केले होते, तर भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांचा उल्लेख ’साले’ असा केला होता. लोकप्रतिनिधी ’एकदा आमदार आयुष्यभर पगार’ घेतात. सवलतीच्या दरात सरकारी योजनेतून स्वस्तात सदनिका लाटतात, आजन्म भत्ते इतर सोयीसुविधा उपभोगतात; मात्र शेतकरी, जनतेसाठी काही करायचे म्हटले, तर मात्र उपकाराची भाषा करतात. तथापि लोकप्रतिनिधींची सारी मिजास ही जनतेच्या - शेतकर्‍यांच्या घामाच्या पैशातूनच तर चालते हे विसरता कामा नये. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे 

 

Related Articles