माऊलींच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी प्रस्थान   

आळंदी, (वार्ताहर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढ पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून १९ जून रोजी ‘श्रीं’च्या पालखीच्या मंदिर प्रदक्षिणेनंतर रात्री उशिरा हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे.
 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून आषाढी वारी २०२५ साठी श्रींचे पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात पंढरपूरकडे १९ जून रोजी प्रस्थान होणार आहे. आषाढी एकादशी ६ जुलै रोजी पंढरपुरात राज्यातून आलेल्या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात साजरी होईल. आषाढ पायी वारी २०२५ पालखी सोहळ्याची नियोजन पूर्व आढावा बैठक पंढरपूर येथे झाली. या बैठकीत पालखी सोहळा दिंडी समाज मान्यवर दिंडीकरी, फडकरी, पालखी सोहळा प्रमुख, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. पालखी सोहळ्याची पत्रिका लवकरच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या वतीने जाहीर करण्यात येईल, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.   श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक आळंदी येथे ‘श्रीं’चे प्रस्थान सोहळ्यासाठी येत असतात. शेकडो दिंड्या आळंदीतून हजारो भाविकांच्या हरिनाम गजरात मार्गस्थ होत असतात. भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा, सुसंवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. पालखी सोहळ्यासाठी हरिनाम गजर करीत पंढरीस ‘श्रीं’च्या दर्शनासाठी वारकरी भाविक निघतात. सोहळ्याच्या तारखा निश्चित करण्यासाठी पंढरपूर येथील माऊली मंदिरात सोहळ्यातील ठराविक दिंडी प्रमुखांची, पालखी दिंडी समाजाची बैठक झाली. या बैठकीत परंपरेने १९ जून रोजी आळंदीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 
 

Related Articles