निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा   

सूर्यकांत सराफ 

‘झिब्राच्या कथा’ ही संजय ऐलवाड यांची लेखनकृती तिच्या आगळ्या शैलीमुळे अगदी कालसापेक्ष अशी उतरली आहे. विज्ञान रंजनाची झालर असलेल्या या कथा भवतालाची, निसर्गाची उत्तम ओळख वाचकांना करून देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. कथा नायिकेच्या -झिब्राच्या मनात विविध प्रश्न उभे राहतात, ती त्यांचा पाठपुरावा करते. त्या क्षेत्रातली कुणी अधिकारी व्यक्ती तिचे शंका समाधान करते, असा या कथांचा एकूण शिरस्ता. आपापल्या जागी अगदी अगदी परिपूर्ण योग्य वाटणारी स्वतंत्र व्यक्तिमत्व बाळगणारी पात्रे, त्यांचे चपखल असे संवाद, त्या संवादातून, प्रसंगातून वाढणारी उत्कंठा असे जे रसायन निर्मिले आहे त्याला तोड नाही. 
 
बालसाहित्याच्या निर्मितीचा उद्देश बालरंजना पुरता मर्यादित कधीच असू नये. बाल वाचकांच्या अंत:प्रेरणा जागे करण्याचे महत्वाचे कार्य मौलिक साहित्य अगदी सहजगत्या, नकळत करत असते. हे पुस्तक वाचून झालेले बालवाचक भोवतीच्या जगाकडे एका वेगळ्या, सजग नजरेने बघायला शिकलेले असतील अशी खात्री वाटते. झिब्रा प्रमाणेच त्यांच्या मनातही सृष्टीच्या रचनेबद्दल विविध प्रश्न उभे राहायला लागतील आणि त्या उत्तरामधून भविष्यात काही चमत्कार घडायला लागतील. 
 
फास्टर फेणे ज्यांचा आवडता नायक होता अशी पिढी आजही आपल्यात आहे. सवंगडी वाटावा असा हा किशोरवयीन मुलगा अफाट धाडस करतो, चाणाक्षपणे आव्हानात्मक समस्या सोडवतो या सुप्त कौतुका सोबतच आपणही असे काहीतरी करावे ही प्रेरणा वाचकांच्या मनी जागी असे. त्यामुळेच त्या नायकाचे शब्द, कृती व्यवहारात अनुकरण करण्या इतके लोकप्रिय झाले होते. झिब्रा या नायिकेच्या कृतीत मला वर्तमान काळातला फास्टर फेणे अवतरलेला जाणवतो. एखाद्या समस्येच्या मुळाशी पोहचण्याची प्रेरणा या कथातून बालवाचकांना नक्कीच मिळेल. 
 
दैनंदिन जीवनात सहज समोर येणार्‍या अनेक निसर्ग नवलाचे वैज्ञानिक विश्लेषण या कथांमधून संजय ऐलवाड यांनी समर्थपणे केलेले आहे. लाजाळूचे झाड, टेकराज, मधमाशी यांच्यातली वैज्ञानिक सत्ये मुलांच्या जगात आपलीशी होताना दिसतात. एकदा झोपमोड झाली की नंतर लवकरच झोप लागत नाही. हा मानवी शरीराचा नियम झाडांना सहजपणे लावून त्यांचे सजीवत्व मानव तुलनेत आणून उभे करण्याचे बळ लेखकाने कथानायिकेला दिलेले आहे. चिमणी दुर्मिळ होण्याने झिब्राच्या मनी उठत असलेली भावनिक व्यथा. त्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील. या सामाजिक निष्कर्षापर्यंत पोहोचते हे तिचे यश आहे. रांजणखळगे हा एक परिपूर्ण, उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरीचा विषय नक्कीच आहे. त्यातील संशोधन, भौगोलिक ज्ञान, त्यातून डोकावणारा भूमीच्या इतिहासाचा मुद्दा, त्याविषयी आस्था बाळगणारे  आपल्या देशातील अभ्यासक, त्यांची कार्य पद्धती हे सगळे मुद्दे एका दीर्घ कादंबरीकडे अंगुलीनिर्देश करतात. आणि म्हणूनच किशोर साहित्यात हे पुस्तक आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करील यात शंका नाही. त्यासाठी लेखक संजय ऐलवाड यांना मन:पूर्वक शुभेच्छा...
 
झिब्रांच्या कथा ( बाल कथासंग्रह)
लेखक : संजय ऐलवाड
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
पाने : ६०
किंमत : २०० रूपये.

Related Articles