कर्मचार्‍यांशी माणसांसारखे वागा   

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे वक्तव्य

मुंबई : कर्मचार्‍यांनी आठवड्याला ७० तास काम करावे यासाठी आग्रही असलेले इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे आणखी एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांशी माणसांसारखे वागवले पाहिजे. कंपन्यांमध्ये सर्वात कमी पगार आणि सर्वाधिक पगारातील तफावत कमी केली पाहिजे. ते टायइकॉन मुंबई २०२५ शिखर परिषदेत बोलत होते.नारायण मूर्ती म्हणाले, प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचार्‍याचा आदर आणि प्रतिष्ठा राखण्याची गरज आहे. कर्मचार्‍यांचे कौतुक जाहीरपणे केले पाहिजे, आणि टीका खासगीत करावी. शक्य तितका कंपन्यांचा नफा सर्व कर्मचार्‍यांमध्ये न्याय्य पद्धतीने वाटला पाहिजे. 
 
भविष्यात भारताचा विकास होण्यासाठी आणि गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, दयाळू भांडवलशाहीचा अवलंब करणे आवश्यक आहे. दयाळू भांडवलशाही म्हणजे भांडवलशाहीचे एक मॉडेल आहे, ज्यामध्ये केवळ नफा कमविण्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही. तर, समाज आणि पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी देखील जपली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या भूमिका व व्यवसायाकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टीकोनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्मचार्‍यांनी आठवड्यात किती तास काम केले पाहिजे? यासंदर्भात केलेल्या विधानाची बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी नारायण मूर्तींच्या या भूमिकेवर टीकाही केली होती. तरी देखील त्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली होती.

फक्त मोठ्या गोष्टी बोलून होणार नाही... 

भांडवलशाही म्हणजे लोकांना नवीन कल्पना आणण्याची संधी देणे जेणेकरून ते स्वतःसाठी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमवू शकतील. असे काम करणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून सर्वजण म्हणतील भांडवलशाही चांगली आहे, हे सिद्ध करण्यासाठी, आपण सर्वांनी कृती करण्याची गरज आहे, फक्त मोठ्या गोष्टी बोलून काहीही साध्य होणार नाही, असे नारायण मूर्ती म्हणाले.
 

Related Articles