शिर्डीचे बसस्थानक अद्ययावत, पण समस्यांची मालिका कायम!   

शिर्डी (दिलीप खरात) : बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर अवैध रिक्षा व इतर प्रवासी वाहनांचा अडथळा प्रवाशांना पाकीटमारी, अरेरावी व कमिशन एजंटचा सहन करावा लागणारा त्रास, छापील किमतीपेक्षा जास्त दराने विकल्या जाणार्‍या वस्तू तसेच बसस्थानकावरील वाढत्या चोर्‍या, महिलांमध्ये असुरक्षिततेची भीती मनोरुग्ण व भिक्षेकर्‍यांचा ससेमिरा, अशुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या, उघड्यावर केल्या जाणार्‍या मलमुत्रामुळे मोठ्या प्रमाणात असलेली दुर्गंधी अशा एक ना अनेक समस्यांचा शिर्डी बसस्थानकावर प्रवाशांना सामना करावा लागतो.
 
आकर्षक व भव्य-दिव्य असलेली शिर्डी बसस्थानकाची इमारत सर्वांचे प्रथमदर्शनी लक्ष वेधून घेत असली तरी काही वेळातच हे बसस्थानक प्रवाशांना नकोनकोसे वाटते. ही परिस्थिती बदलण्याकरता राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या अधिकार्‍यांनी विशेष लक्ष देवून इतर राज्यांसाठी शिर्डी बसस्थानक ‘रोलमॉडेल’ कसे बनेल, याकरिता विविध उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. अन्यथा ‘नाव मोठे व लक्षण खोटे’ अशीच अवस्था शिर्डी बसस्थानकाच्याबाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
‘श्रद्धा व सबुरी’चा संदेश देणार्‍या जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची इमारत राज्यातील बसस्थानकांपैकी साई संस्थानने बीओटी तत्त्वावर विकसित करून दिलेली सर्वात मोठी व देखणी वास्तू आहे. या चारमजली वास्तूमध्ये खालील दोन मजले भाविकांसाठी निवासी व्यवस्था तर चौथ्या मजल्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांसाठी विश्रामगृह आहे. 
 
बसस्थानकावर दिवसभरात राज्यासह गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश या परराज्यांतून सुमारे साडेचारशेच्या दरम्यान बसेस व हजारो प्रवासी ये-जा करतात. प्रवासी बसमधून उतरल्यानंतर मंदिर दर्शनरूम अशा प्रकारची विचारणा करत प्रवाशांना कमिशन एजंट गाठत नाही तोच भिक्षेकरी त्यांच्या अवतीभोवती गोळा होवू भिक्षा मागतात. दुर्गंधी झेलत बसस्थानकाबाहेर पडत असतानाच समोरून अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक अथवा गाड्या भरून देणारे एजंट, रिक्षावाले यांच्या तावडीत प्रवासी सापडतात. त्यानंतर रिक्षावाले भाविकाला अव्वाच्या सव्वा भाडे सांगतात. या सर्व गोंधळात भाविकाला भावनिक बनवले जाते. 
 
दर्शन घेतल्यानंतर भाविक पुन्हा बसस्थानकावर येतात. दरम्यान चौकशी कक्षात भाविकांना वेगळाच अनुभव येतो. बसस्थानक परिसर फूटपाथ अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून याठिकाणाहून चालावे लागते. राज्यासह परराज्यातून प्रवासी याठिकाणी येत असल्याने अनेकांना संवाद साधण्यासाठी भाषेचा अडसर येतो. त्याचा गैरफायदा अनेकजण उचलतात. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मात्र तेथील पिण्याचे पाणी शुद्धतेविषयी प्रवाशांच्या मनात एक ना अनेक शंका निर्माण होतात. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक भिक्षेकरी, आजारी रुग्ण या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी गुळण्या करतात, गुटखा-तंबाखू, पान खावून तेथे घाण करतात. त्यामुळे तेथे पाणी पिण्याची अनेकांची इच्छा होत नाही. बसस्थानकावर वॉटर कुलर कार्यान्वित असणे गरजेचे आहे. मात्र त्याचा अभाव असल्याचे प्रवासी सांगतात.
 
बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर भिक्षेकरी, मनोरुग्ण, बेघर झालेले तळीराम झोपलेले असतात. बाकड्यांवर प्रवाशांना अनेकदा बसायला जागा नसते. जागा असली तर भिक्षेकरांच्या कपड्यांमधून दुर्गंधी येत असतो. त्यामुळे अनेकजण तेथे बसत नाहीत. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असली तरी धुम्रपान करणार्‍या अथवा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणार्‍यांवर कारवाईचा बडगा प्रभावीपणे उगारला जात नसल्याने परिसर अस्वच्छतेमध्ये वाढ होताना दिसत आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने बसेस येत असल्यामुळे रात्री मुक्कामी असणार्‍या बसेस पार्क करून ठेवण्यासाठी चालकांमध्ये चढाओढ सुरू असते. 
 
प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था पुरेशी नसल्याने अनेकदा नागरिकांना पोलिसांचा तर दुसरीकडे परिवहन महामंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रस्त्यावर वाहने लावावी तर दंडाची कारवाई, बसस्थानकात लावावी तर बसचा धक्का लागण्याची शक्यता, त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या कुटुंबियांना ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण होते. बसस्थानकावरील स्वच्छतागृह व मुतारी रात्री लवकर बंद केली जात असल्याने अनेक प्रवासी बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसच्या पाठीमागे जावून लघवी करतात, शौचाला बसतात. त्यामुळे याठिकाणी मोठी दुर्गंधी पसरते. वास्तविक बसस्थानकावरील सुलभ शौचालय अथवा स्वच्छतागृह २४ तास सुरू ठेवणे गरजेचे आहे. 
 
पाकीटमार बसमध्ये चढउतार करताना होणार्‍या चोर्‍या, बतावणी करून वयोवृद्धांना फसवणार्‍या टोळ्या यासह कमिशन एजंटकडून होणारी अरेरावी, महिलांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने बसस्थानकावर पोलिस चौकी निर्माण करून कायमस्वरूपी पोलिसाची नेमणूक करणे गरजेचे आहे. बसस्थानकाचे प्रवेशद्वार अवैध प्रवासी वाहनांच्या विळख्यातून मुक्त होणे गरजेचे आहे. बसस्थानकावरील दुर्गंधी दूर करण्याकरिता उपाययोजना करावी. हे बसस्थानक कोपरगाव आगाराच्या माध्यमातून परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आहे. असे असताना याठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षितेला, सोयीसुविधांना प्राधान्य देताना प्रवाशांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. 
 

Related Articles