भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)   

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे जसे महाराष्ट्राचे श्रद्धेचे आणि अस्मितेचे विषय आहेत, तसेच मराठी भाषा हा देखील आपल्या अस्मितेचा विषय आहे. स्वाभाविकच या श्रद्धास्थानावर हल्ला झाला, तर मराठी माणूस चवताळून उठतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या एका विधानावरून गदारोळ उडाला आहे. ‘मुंबईत येणार्‍यांनी मराठी शिकलेच पाहिजे असे काही नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे,’ ही त्यांची ताजी विधाने वादाचे निमित्त ठरली आहेत. विधिमंडळातही त्यांच्या या विधानांचे पडसाद उमटले आणि भैयाजी जोशी सर्वांच्या टीकेचे लक्ष्य ठरले. त्यानंतर त्यांना आपल्या विधानाबाबत सारवासारवी करण्यावाचून गत्यंतरच उरले नाही. आपल्या विधानाने गैरसमज झाला. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, अशी मल्लीनाथी त्यांनी केली. विधानसभेत हा विषय उपस्थित झाला, तेव्हा सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याची निःसंदिग्ध ग्वाही दिली. महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी बोलले पाहिजे असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या सदस्यांनी भैयाजी जोशी यांच्या विधानावर आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत, तशाच प्रकारे महाराष्ट्रात गुजराती लादण्याचे प्रयत्न होत आहेत का? अशी शंका यावेळी विरोधी सदस्यांनी व्यक्त केली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. आदल्याच दिवशी विधिमंडळात औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचे अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आले होते. औरंगजेबाचे समर्थन त्यांनी करणे अयोग्यच होते. या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी एकमताची भूमिका घेत अबू आझमींच्या निलंबनाची कारवाई केली. २००९ मध्ये विधानसभेत सर्व सदस्य मराठीतून शपथ घेत असताना याच अबू आझमी यांनी आगाऊपणा करीत हिंदीतून सदस्यत्वाची शपथ घेतली होती. तेव्हा संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांंनी आझमी यांना सभागृहातच मारहाण केली होती. त्यावरून मनसेच्या त्या चार सदस्यांचे निलंबन झाले होते. जी बोलीभाषा व्यवहारात वापरली जात नाही, ती कालांतराने अस्तंगत होत जाते. त्या दृष्टीने बोली भाषांतून साहित्य निर्मिती करणे, आणि त्या साहित्याचा प्रसार करणे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
 
मराठीची उपेक्षा नको
 
मराठी भाषकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य स्थापन होऊन अर्धशतक उलटून गेेले आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाची अपेक्षा होती; मात्र मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सातत्याने होणे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. मराठी भाषा इंग्रजीच्या आक्रमणापुढे टिकेल का? अशी भीती अधून-मधून व्यक्त होताना दिसते. मराठीचे अस्तित्व टिकवण्याची इच्छाशक्ती प्रत्येक मराठी माणसात असायला हवी. आपली मातृभाषा हिरिरीने बोलणे, जास्तीत जास्त त्याच भाषेचा वापर करणे हा भाषा संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यात त्या-त्या राज्यांच्या भाषेशिवाय व्यवहार होत नाहीत. मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी भाषेच्या विविध बोली भाषा जोपासणे आणि वाढवणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणे कमी दर्जाचे आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे उच्च प्रतीचे ही मानसिकता दूर झाली पाहिजे. या उलट मराठी माध्यमांच्या शाळात चांगले दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून चांगली मराठीही शिकवली गेली पाहिजे. अमराठी मुलांनाही मराठी शिकवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. मराठीच्या आजच्या स्थितीबद्दल कवी कुसुमाग्रजांनीही खंत व्यक्त केली होती. ती जरी राजभाषा असली तरी ती उपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले होते. सर्वच स्तरांवर मराठीचा आग्रहपूर्वक वापर झाला, तर मराठीच्या अस्तित्वाला कोणताच धोका उरणार नाही. मराठी भाषा अधिक समृद्ध करणे ही सर्वच मराठी माणसाची जबाबदारी आहे.

Related Articles