मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रूग्णालयात मागील सहा वर्षात १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. केईएम रुग्णालयामध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येत असतात. प्रसूतीसाठी येणार्या महिलांचे प्रमाणही अधिक आहे. २०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये रूग्णालयाच्या नवजात शिशु विभागामध्ये १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये २२५ अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०२० मध्ये २०६, २०२१ मध्ये १७९, २०२२ मध्ये १८८, २०२३ मध्ये १७९ व २०२४ मध्ये १९९ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. मातेचे वजन कमी असणे, प्रसूतीपूर्वी झालेला संसर्ग, प्रसूतीदरम्यान झालेली गुंतागुंत, बाळाला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न होणे अशी महत्त्वाची कारणे अर्भकांचा मृत्यू होण्यामागे आहेत. दरम्यान, यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचा मृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करून पुढील मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजले जात आहेत.
Fans
Followers