धायरीत कचरा प्रकल्पास आग   

पुणे : धायरी येथील कचरा प्रकल्पास आग लागल्याची भीषण घटना शनिवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे, मोठा अनर्थ टळला. कचरा प्रकल्पाच्या शेजारी अनेक मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.नर्‍हे - धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ असलेल्या या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. 
 
आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले. या ठिकाणी ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचर्‍याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते.जेसीबी बोलून कचर्‍याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू होते. या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र, सुदैवाने आग पसरली नाही. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, जून २०२२ मधेही या कचरा प्रकल्पास अशाच प्रकारे आग लागली होती. कचरा प्रकल्प हा रहिवाशी वस्तीत असल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच, आग लागली की लावली गेली याबाबत नागरिकात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles